झोप …

झोप …मोठा सेंसिटिव विषय आहे आमच्या घरात….. म्हणजे मला आणि मुलाला अतिशय कमी झोपायला आवडते (ज्याला आम्ही quality झोप म्हणतो) आणि नवर्‍याला आणि मुलीला प्रचंड झोप येते. आमच्या सरळ सरळ दोन विरोधी पार्ट्या होतात… मग बाकी कितीही एकमत असले तरी झोपेचा विषय निघाला की वाद सुरु होतात. म्हणजे रात्रीचे नऊ वाजले की नवरा घड्याळ बघायला लागतो…. आणि सकाळी मुलाला शाळा आहे रे !!! झोपा आता….. वगैरे त्याचे पेटेंटेड वाक्य यायला लागली की आली याला झोप हे आम्ही ओळखतो.

त्यातही मग मुलाला झोपवायला म्हणुन हे महाराज त्याला बेडरुममधे नेतात  आणि पाचच मिनिटात “मम्मा …बाबा झोपला गं!!!” असे चिरंजिव सांगतात. मला स्वत:ला निद्रादेवी न वाटता निद्राराक्षस वाटतो. म्हणजे बघा ना…उद्या पेपर आहे, बराच अभ्यास बाकी आहे आणि आपले डोळे प्रचंड जड झाले आहेत. आपण मोठ्या मुश्किलिने काहीतरी एकाग्रचित्तने वाचायचा प्रयत्न करतोय आणि आपल्या डोक्यात काहीही प्रकाश पडत नाहीये….हा किती common सिन आहे.  कट टु.…… परिक्षा संपलेली आहे…… सुट्टीचा पहिला दिवस….. उद्या मी खुप वेळ झोपणार आहे हे आपण आधिच डिक्लेअर केलेलं आहे…… आणि पहाटे पहाटे आपल्याला जाग येते, बरं नुसतेच डोळे उघडत नाहीत तर टक्क जाग येते. नंतर काय either अंथरुणात लोळत पडा नाहीतर चरफडत उठा. हीच बाब नौकरीबाबतही, weekly off  ला नेमकी सकाळीच जाग येते. ही तर मोठ्यांची गत… पण कार्टेही सुट्टीच्या दिवशी न उठवता उठतात आणि आपल्यालाही उठवतात.

आमच्या घरात माझ्या नवर्‍याची ८-१० तास झोपुनही झोप पुर्ण होत नाही त्यामुळे त्याला नाइलाजाने उरलेल्या झोपेचा कोटा कंपनीच्या बसमधे पुर्ण करावा लागतो. अनेकवेळा डोक्याला टेंगुळ येउनही हा पठ्ठ्या काही ऐकत नाही. एकदा एक नविन रुजु झालेली मुलगी बसमधे होती. जागा नसल्यामुळे हे महाराज तिच्याशेजारी बसले आणि बस सुरु झाल्या झाल्या ह्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली. त्यातही रस्त्यावरच्या सगळ्या खड्ड्यांमधुन आपली बस गेलीच पाहीजे हा ड्रायवरचा अट्टहास ….. ती बिचारी मुलगी सरकत सरकत आता खिडकीतून खाली पडेल की काय असे वाटत होते….हा झोपलेला नागोबा बसच्या हेलकाव्यांबरोबर मस्त डोलत होता. हा तिच्या अंगावर पडेल की नाही यावर म्हणे त्यादिवशी बसमधे बेटिंग झाले. अशिच माझी एक झोपाळू मैत्रिण…परिक्षेच्या दिवसात हिला रात्री जागून अभ्यास करण्याची हुक्की यायची. मग हिला जागं ठेवण्याची जबाबदारी आम्ही वाटून घ्यायचो. मांडीवर पुस्तक ठेऊन डुलक्या घेणार्‍या डोक्याला हाताचा आधार देऊन ही बसली की हमखास झोपलेली असायची….मग धक्का द्यावा लागायचा…..जरा जागी झाली की आरडाओरडा सुरु ’ ते कपड्यांना लावायचे चिमटे लावा रे माझ्या पापण्यांना…..’

असाच एक किस्सा माझ्या बाबांचा….आमचे एक परिचित एकदा त्यांचा कुत्रा घेऊन आले होते( लोकं कुत्रा का पाळतात???) ….हे गृहस्थ तर त्यांच्या घरी परत गेले पण कुत्रा मागे राहिला. रात्री केव्हातरी आईला आवाजाने जाग आली म्हणून शोधले तर तोपर्यंत घरात या कुत्र्याने मोठा गोंधळ घालून ठेवला होता. मग आरडाओरडा…आवाज करत मी आणि आईने त्याला घराबाहेर काढले. सगळ घर आवरले. हे होत असतांना बाबांच्या ज्या पलंगाखाली लपुन कुत्रा घरात राहिला होता त्यावर ते निवांत झोपलेले होते.

झोपणार्‍यांमधेही अनेक प्रकार आहेत….सतत वळवळ करणारे आणि घोरणारे हे त्यातले त्रासदायक टाईप. बरं हे घोरणारे लोक सकाळी उठल्यावर आपण झोपेत घोरतो हे अमान्य का करतात हे एक न उलगडलेले कोडे आहे. त्यातही ट्रेनमधे, बसमधे, विशेषत: कोणाच्या घरी गेल्यावर झोपु शकणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो. या लोकांची झोप आवाज, डास असल्या यत्किष्चित घटकांमुळे मोडत नाही. हुकुमी झोप हा असाच एक प्रकार…. हे लोक त्यांना केव्हाही झोप म्हटले की मिनिटभरात गाढ झोपेत असतात. ट्रेनमधे झोपेच्या नादात आपले स्टेशन सोडुन पुढे जाण्याच्या कथाही घडतात अश्याच. दुपारची झोप हा ही एक प्रकार….. माझं डोकं दुपारी झोपले तर जडं होतं आणि नवर्‍याचं नाही झोपला तरं. आहे की नाही भांडणाचा मुद्दा.

हे इंग्लिश्मधे टाईप करुन मराठी लिहिणे किती जिकिरिचे काम आहे नाही!!!! आई गं!!! जाम झोप आलीये……Good Night.  

मातृदिन

परवा एका मॉलमधे भाजी खरेदी करत असतांना सहज शेजारच्या दहा बारा वर्षाच्या मुलीकडे लक्ष गेले. ही मुलगी तिच्या आई बरोबर भाजी घेत होती. मायलेकी कैरी खरेदी करत होत्या.आई मुलीला कैरी कशी निवडायची ते समजावत होती आणि त्याप्रमाणे मुलीने ती निवडुन आईला दिली.नंतर त्या section मधे फिरताना पुन्हा त्या दोघिंशी गाठ पडली, पुन्हा तेच दृष्य. बिलाच्या रांगेतही लेक पुढे, मग आईचा सल्ला… टोमॅटो, केळी वर ठेव…. कांदे, बटाटे खाली ठेव ई. ई……….

माझं मन २०-२२ वर्षे मागे भुतकाळात गेले. अशीच आईबरोबर भाजी आणायला जाणारी मी…… बटाटे शक्यतो एकाच आकाराचे आणि वजनाचे निवडावे, मेथी लाल काठाची घे, पालेभाजी ची जुडी नेहेमी मधे check करावी नाहीतर ती खराब निघु शकते, भरताची वांगी वजनाला हलकी बघ, टोमॅटो हलक्या हाताने दाबुन बघावा………. एक ना दोन. किती सहज सांगायची आई सगळं. पण आज ती शिदोरी जवळ असल्यामुळे संसारात किती मदत होते.

आखाती देशात २१ मार्च ला मातृदिन साजरा करतात. इथल्या पपेर्समधे, मॉलमधे त्यानिमित्त वेगवेगळ्या जाहिराती, स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आपल्या आईला मेसेज पाठवा… सर्वोत्तम मेसेजला बक्षिस किंवा यातलं कोणते गिफ़्ट तुम्ही तुमच्या आईला द्याल छाप contest ही आहेत.

आज अनेक विचार आहेत मनात…… मला माझ्या आईने काय दिले ते मी एक आई म्हणुन माझ्या मुलांना मी काय देणार पर्यंत. त्यामुळे आज मनं माझ्या आईची लेक ते माझ्या मुलांची आई या माझ्या प्रवासाचा आढावा घेतयं. खरं तर “ आमची आई” या विषयावर आजवर अनेकांनी लिखाण केलेलं आहे.तरिही माझी आई कशी आहे हे सांगण्याचा मोह मात्र आवरत नाही!!! कठिण आहे ते, कारण जिने मला जन्म दिला, या जगात येतांना केवळ जिच्या ह्र्दयाच्या ठोक्यांची ओळख होती तिच्याबद्दल लिहिण्याची संधी सोडण्याचा करंटेपणा मला करायचा नाहीये.

आई ….. प्रामुख्याने दोन रुपे आहेत तिचे. एक कणखर बायको, मुलगी, बहिण, आई, आजी, सासु या रुपात भेटणारे तिचे पहिले रुप. सतत सगळ्यांच्या मदतीला धावणारी…प्रसंगी त्याबद्दल तीला आमच्या कटकटीलाही सामोरे जावे लागते. एक सक्षम शिक्षिका… एक जबाबदार पत्नी, आई. वैयक्तिक आणि घराच्या प्रगतीबाबत जागरुकतेने निर्णय घेणारी… त्यासाठी गरज पडली तर कठोरपणे निर्णय घेण्याची क्षमता असणारी. तितकीच प्रेमळं…. मुलांना, नातवंडाना काहिही झाले तर पटकन घायकुतीला येणारी. खुप काळजी करणारी अशी…… तिचे दुसरे रुप मात्र मजेशिर आहे. आईला कधिही विचारले की “ आई अगं तांदुळ कुठल्या डब्यात आहेत?” की तिचे हमखास ठरलेले उत्तर येते “ बघ बाई वरच्या नाहीतर खालच्या डब्यात असतीलं.” किंवा आम्ही घरात नसतांना आमच्यासाठी कोणाचा फोन आला तर त्याचे नाव सांगायची तिची पद्धत मोठी unique आहे, त्या अनिल की सुनिल की रमेश का सुरेश कोणाचा तरी होता बाई फोन. नावं अजिबात लक्षात ठेवायची नाही हा गुण मी अगदी सही रे सही उचललाय तिचा. मागे एक खुप जुनी मैत्रीण रस्त्यात भेटली आणि म्हणे “ ओळखलसं का?” आता चेहरा वाटत होता ओळखीचा पण नावाबाबत मेंदुच्या कानाकोपर्‍यात शोधलं तरी नाव आठवेना… बरं याबाबत धाकटी बहिण नेमकी बाबांवर गेलेली तिला लोकांचे नावच काय कुंडलीही पाठ. पण पठ्ठीने काही माझी बाजु सांभाळली नाही …..मस्तपैकी मंद स्मित करत माझी फजिती बघत होती कार्टी. अरे !!विषयांतर होतेय….

आईमधे एका सुशिक्षित आणि सुसंस्कारी स्त्रीची प्रतिमा मला कायम दिसते. ’दिसते’ म्हणण्याचे कारण माझे लग्न होईपर्यंत अस्मादिकांना आई हिटलर वाटायची. सतत अभ्यास कर, घर आवरुन ठेव, अगं अशी अजागळ राहु नकोस छाप अनेक सुचनांचा भडिमार करणारी आणि त्या न पाळल्यास रागावणारी आई जवळची न वाटता बाबा कायम मित्रासारखे वाटले. अनेक वेळा आईचा हळवेपणा, प्रेम जाणवायचे पण हा आपला हक्क आणि तिचे कर्तव्य आहे अश्या आविर्भावात तिला कायम गृहित धरले गेले.

लग्न झाले मग सासरी ’ए आई गं!!’ आणि ’ अहो आई!!’ मधली सुक्ष्म रेषा तिच्या अस्तित्वाची जाणिव करुन देत् गेली. संसारातल्या स्वयंपाक करणे, भाज्या चिरणे यासारख्या अनेक लहानमोठ्या जबाबदार्‍या पार पाडताना मला माझ्यातल्या ’मी’ मधे तिच असलेलं अस्तित्व जाणवत होतं. जे काही लहानमोठ यश आपल्याला मिळतय त्यात तिच्याकडुन कळत नकळत झालेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे हे उमजत गेलं.आणि हळूहळू मी आईच्या जवळ येत गेले. आपल्या आईला कितीतरी गोष्टी न सांगताच समजतात आणि ती किती सहजपणे solutions देते हे ही जाणवलं.माझीच आई मला नव्याने मिळत होती. मला आठवतयं एरवी कणखर असणारी आई माझ्या पहिल्या डिलिवरीनंतर बांध कोसळुन रडली होती. मला रुममधे शिफ़्ट केल्यानंतर सगळेजण बाळाकडे धावले आणि आई माझ्याकडे. तेव्हापासुन तिच आईपण पुन्हा नव्याने समजलं. तिचे कष्ट, तिने केलेली जागरण….खरच निरपेक्षपणे ही बाई किती करत असते मुलांसाठी.

आज वाटतय “ माझी आई कशी होती!!!!” याचबरोबर “ मी एक मुलगी म्हणुन कशी होते !!!” याचाही हिशोब मांडावा. आज माझ्या संसाराला आठ वर्षे पुर्ण झाल्यावर आईनी घेतलेल्या कित्येक निर्णयांमागची तिची भुमिका मला समजू शकते. बरेचदा मला कोडे वाटत असे की ही का अशी वागतेय? पण आता सगळं समजते तेव्हा ती दर वेळी कशी योग्य होती हे जाणवते. आता तर मीदेखिल एका मुलीची आई आहे, आता समजतेय तिची काळजी. तिने आम्हाला जागरुकतेने वाढवण्यासाठी केलेली धडपड.

आज मला आई खुप खुप भावते….. पटते…. समजते. त्याचबरोबर जाणवते की उतारवयात आपण आपल्याच आईचं मातृत्व स्विकारायच आहे आणि आपल्याला मोठे करतांना तिची जी हौस करायची राहिलीये ती सगळी पुर्ण करायची. तिचे माहेरपण करायचे…….

किती लिहिणार आता…..

या मातृदिनाबद्दल सगळ्या आयांना (माझ्यासहित) मनापासुन सलाम!!!

 

व्यंगचित्रे….

 

मागे लोकसत्ता मधे व्यंगचित्रे स्पर्धा होती त्यासाठी मी केलेला हा प्रयत्न…..तेव्हा पाठवणे झाले नाही …. पण म्हणतात ना Better late than never……

ही ईंग्लिश मिडियमची जादू!!!!!

आजी: चिऊताई चिव चिव करते आणि काऊ?

नातु: हम्मा sssss !!!!!!

(फोटोवर टिचकी मारली की तो मोठा दिसेल…)

इगतपुरी — आमचे आजोळ !!!

इगतपुरी आमचे आजोळ……………काय आणि किती लिहु असं होतय नुसते नाव आले या गावाचे तरीसुद्धा !! जवळजवळ संपुर्ण बालपण इथेच गेले आमचे. सुट्टी संपली की नाइलाजाने आम्ही पुढच्या सुट्टी पर्यंत मनमाडला जात असु… तेव्हा आमच्या बाबांची ट्रांस्फर तिथे होती. एकदाचा परिक्षेतला शेवटचा पेपर देण्याची पीडा आटोपली की चंबुगबाळ आवरुन आम्ही पहिली ट्रेन पकडुन इगतपुरी गाठत असु. एक दोन दिवसाच्या फरकाने मामे , मावस भावंड येत असत. मग धमाल सुरु.

माझे आजी आजोबा रेल्वेमधे सर्विस करत, तिथल्या रेल्वेच्या शाळेत आजोबा मुख्याध्यापक होते. त्यांचे घर म्हणजे रेल्वेचे मोठ्ठे् क्वार्ट्रर. छानसे टुमदार कौलारु घर. मोठ मोठ्या ७/८ खोल्या….उंच उंच व्हेंटीलेटर्स, आणि उंचावर असलेले पंखे. आताच्या बिल्डिंगमधल्या घरांमधल्या बेडरुमपेक्षाही मोठे बाथरुम….मागे पुढे मोठे अंगण .घराच्या दारापासुन गेटपर्यंत सिमेंट्चा फुटपाथ. तो ओला असतांना आम्ही उमटवलेली पावले आणि आमची कोरलेली नावे…… आंबा, पेरु, जांभुळ, चिंच, काजु ,कारंज्या अशी अनेक झाडे अंगणात होती. त्यामुळे उन्हाळ्यात कधिही सावलीची कमतरता नसे.

आम्ही रेल्वे लाईन ओलांडून घराकडे जातांना आधि आजीची शाळा लागत असे. मग आम्ही धावत जाऊन तिला आणि आजोबांना भेटुन आमच्या येण्याची खबर देत असु. शाळेत चारच वर्ग. पहिली ते चौथी. चारच शिक्षक….त्यामुळे आम्ही गेलो की सगळ्यांना भेटुनच घरी जात असु. ही शाळा फार सुंदर आणि स्वच्छ होती. मोठे आवार , आणि अंगणात कारंज्याची झाडे. आमचा मुक्काम बरेचदा या शाळेतच असे…कारण तिथल्या मोठमोठ्या कपाटात अनेक पुस्तके होती. वाचनाची आवड लागली ती या शाळेमुळेच…. इसापनिती, पंचतंत्र, जादुच्या कथांची अनेक पुस्तके, खजिनाच होता ह्या शाळेत. आता मुलांसाठी ही पुस्तके शोधतांना होणारा त्रास पहाता आम्ही किती नशिबवान होतो असे वाटते. घरी पुस्तके आणण्यासाठी आजोबांची (ज्यांना आम्ही बापु म्हणायचो…. ते गावातही बापुसाहेब म्हणुनच प्रसिद्ध होते) परवानगी लागायची. कारण पुस्तके हा त्यांचा वीक पॉइंट त्याबाबत आबाळ त्यांना चालत नसे.

खाण्यापिण्याचीही मोठी चंगळ असायची. आजी सुगरण. तिच्या हातच्या वरणाची चवतर आजही जिभेवर रेंगाळते.मला आठवतेय एकदा तिने आम्हाला नारळाच्या करवंटीला भोक पाडुन जिलेबी करुन खाउ घातली होती. एका रांगेत आम्ही आठही नातवंड जेवायला बसत असु. तोच क्रम चहा प्यायलाही असे.भराभर खाउन खेळायला पळणे हाच उद्योग असे. उन्हाळ्यात कैर्या, आंबे खाणे हा आवडता कार्यक्रम. स्वताच्या झाडाच्या नाही बरं!!!शेजारच्यांच्या चोरलेल्या…तिथुनच आम्ही काजुगरही चोरत असु. त्यांच्या कोणत्या झाडाला किती फळ आहेत याचे रेकॉर्ड आमच्याकडे असे. मग मामीला विचारुन आम्ही आमच्या घराच्या कौलावरुन शेजारच्यांच्या झाडाची फळे तोडायचो.विलायती चिंच हा प्रकार इथेच कळला आम्हाला. भेळ खायची ती चौकोनी कागदावर मस्तपैकी अंगणात बसुन. घरामागच्या जोश्यांच्या फ्रिजमधे ठेवलेले आईसक्रिम खाणे किंवा रात्री उशिरा येणार्या कुल्फिवाल्याकडची कुल्फि खाणे ही तर पर्वणी होती.

आमचा आवडता खेळ म्हणजे बाहेर बसुन कारंज्यांची फळं तोडणे.त्यातल्या बियांपासुन तेल बनवतात ज्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आम्ही फोडलेल्या बिया विकुन आम्हाला पैसे मिळत जे आम्ही आजीकडे देत असु.मग त्या टरफलांचा पसारा अंगणात…मामा अतिशय रागावत असे पण आम्ही मात्र स्थितप्रद्न्यासारखे आमचे उद्योग चालवत असु. मधेच एका सुट्टीत आम्हाला निलगिरीपासुन विक्स बनवता येइल असा जावईशोध लागला होता मग ती पाने दोन दिवस कुटली. एकदा तर पाच वर्षाची असतांना मी खायचे पान समजुन कण्हेराचे पान त्यान गंध टाकुन खाल्ले होते…मग दवाखाना आणि आईचा मार…….झाडावर चढणे, कौलावरुन उड्या मारणे, खेकडॆ पकडणे हे जोडधंदे. ते पकडलेले खेकडे आउटहाउस मधल्या लोकांना देणे मग ते तो कसा खातात ते बघणे हे आजीला न कळु देता केलेले उद्योग. यातुनही वेळ उरला तर कट्ट्यावर बसुन जाणार्या मालगाड्यांचे डबे मोजणे.

पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत असे त्यामुळे साप भरपुर. त्यामुळे आयुष्यात पुन्हा कधिही सापाची भिती वाटली नाही. कपडे वाळवणे मोठे जिकिरीचे असायचे पावसाळ्यात, ते शेकोटीवर वाळवावे लागत. सापाची नाही पण डरकु ची फार भिती होती…. हा प्राणी किंवा राक्षस किचनसमोरच्या चिंचेच्या झाडावर असतो ही माझ्या मामेभावाने मारलेली थाप आहे हे कळेपर्यंत रात्री तिकडे पहायची हिंमत होत नसे. अश्याच एका झाडावर वाढलेला हरितवेल वाळुन तो लोंबत असे तो म्हणजे डरकुच्या अंगावरचे केस आहेत ही माहितीही त्याचीच. ट्रेनच्या इंजिनमधे बसुन कसारा घाटात मामाबरोबर जाणे आणि करवंदाच्या जाळ्यातुन ताजी करवंद खाणे, कैर्या तोडणे …मस्त मजा होती. आमच्या मामाचे मित्रही मोठे वल्लि होते. त्यातला राजेशमामा बोबडा नाहिये हे मला माझी दहावी झाल्यावर कळले होते तोवर या पठ्ठ्याने ते सोंग इतके अफ़लातुन वठवले की शंकाही येउ नये.

खरचं काय आणि किती लिहु? माझ्यासाठी हा विषय न संपणारा आहे……

मागे एकदा आम्ही लोणावळ्याला गेलो होतो, सगळे खुश होते पण खर सांगु का व्यवसायिकरण न झालेले आमचे इगतपुरी मला जास्त आवडते…… आज तिथे कोणिही नाही. आजी नासिकला स्थायिक झाली आहे …..पण आठवणीतले ते क्वार्ट्रर मात्र आमचेच. आजही आम्ही भावंड हा विषय निघाला की भरभरुन बोलतो….आम्हाला जोडुन ठेवलय ते याच आठवणिंनी. आजही मुंबईला जातांना इगतपुरी आलं की डोळे पाणावतात…….

बाप रे !! ही मुले !!

परवा ’एकापेक्षा एक’ हा Z TV वरचा कार्यक्रम पहातांना सहज म्हणाले “ या लोकांच्या तोच तो पणाचा कंटाळा आला आहे…आता सचिनचे बोलणे ढोंगी वाटायला लागले आहे आणि एकुणातच सगळं आधि ठरवलेले आहे असे वाटते , नाटकीपणा सगळा. किती वेळा तेच तेच बोलणार आहेत हे लोकं!!”

लगेच चिरंजीव म्हणाले “मम्मा खोटे बोलते तू, आधि म्हणाली होतिस की हा सचिन खुप हुशार आहे. एकदा ठरव तो हुशार आहे की ढोंगी आहे ते !!! मला confuse करू नकोस.” विचारात टाकले हो लेकाने. आपण मोठे अनेकदा असे परस्परविरोधी मते मांडतो मग मुलं गोंधळात पडली तर हा दोष कोणाचा?

तेव्हा मतं मांडतांना विचार करावा आणि मुले आपल्या मतांकडे लक्ष देतात हा धडा मला मिळाला.

मुलांची खेळणी आपण आवरून ठेवायची हा रूल असतो, आणि त्याबद्दल कटकट करून काहिही उपयोग नसतो हे मला आता कळालेले आहे.

ह्या खेळण्यातल्या गाड्या लेकाला सतत हव्या असतात आजपर्यन्त अनेक प्रकारच्या गाड्या माझ्या मुलाने घेतल्या आहेत. बरं आजकालच्या मॉल संस्कृतीमधे या गोष्टींची उपलब्धता वाढली आहे. ही मुले तिथे गेल्यावर त्यांना प्रलोभन वाटावेच अश्या प्रकारे ही खेळणी मांडुन ठेवलेली असतात. मुले मोहात नाही पडली तरच नवल. बरं ही महागडी खेळणी आणावी तर नव्याचे ९ च काय पण २/४ दिवसही कौतुक नसते. त्यातच शेजार पाजारच्या मित्राने काही तोडले तरी गम नाही. पुन्हा माझ्या मित्राकडे हा सेट आहे , रिमोटची ती कार आहे चे पालुपद सुरु होते.याविषयी आम्ही मैत्रिणी चर्चा करत होतो तेव्हा असे आढळले की ही फक्त माझी समस्या नसुन थोड्या फार फ़रकाने हीच परिस्थिती त्यांच्याही घरी आहे.

या मुलांचे समाधान अजिबात होत नाही. आमच्या लहानपणी आम्हाला एखादेच खेळणे असायचे तेच आम्ही जिवापाड जपायचो, आमचे बाबा कधी कधी आम्हाला खाउ साठी २० पैसे द्यायचे तेच आम्हाला खुप वाटायचे, किंवा आम्ही असा हट्टी पणा करत नव्हतो या गोष्टी ऐकण्यात त्यांना काडिचाही रस नसतो.त्यापेक्षा हा मुलांना कार्टुन स्टोरिज जास्त जवळच्या वाटतात.

मुळात आमचे आणि या मुलांचे बालपण यात जमिन आस्मानाचा फ़रक आहे.येव्हढ्या मोठ्या प्रमाणात बाजारपेठ तेव्हा नव्हतीच आणि टि.व्हि. नावाचा उपद्रवही नव्हता. अंगणात सात वाजेपर्यंत आरडाओरडा करत खेळणे हा आवडता कार्यक्रम असे. सुट्टीतदेखिल पत्ते ,कॅरम, लपाछपी,चंपुल हे खेळ असत ज्यामुळे मोठ्या माणसांना उपद्रव कमी असे. आजकाल मी अश्या अनेक आया पाहिल्या आहेत ज्या केवळ मुले घरी बसले तर त्यांना काय काम द्यायचे म्हणुन त्यांना आजारपणातही औषधे देउन शाळेत पाठवतात.

माझ्या नात्यातल्या एका आजींनी एकदा नातवाला विचारले की मी आत्ता तुझे येव्हढे लाड करते तर तु मोठा झाल्यावर माझ्याकडे लक्ष देशील ना? त्यावर नातवाचे उत्तर होते “ मी मोठा होइपर्यंत तु जिवंत असायला हवीस ना!!” नातवाचे वय ४ वर्षे. बालिशपणा म्हणून सोडुन दिले तरी ही पिढी अतिशय स्पष्ट मते असणारी आहे. परवा अंगणात खेळणारी मुले सायकल चालवतांना कुठल्या एअरलाईनची सेवा जास्त चांगली आहे ह्या गंभीर विषयावर चर्चा करत होते. पहिली दुसरीतली मुले पण त्यांचे निरिक्षण मात्र जबरदस्त. एक मात्र नमूद करावेसे वाटते यांना ठामपणे आपली मते मांडून ती पटवता येतात.

 

एकिकडे ह्या मुलांना बालपण नाही, भावनांच्या आहारी जात नाहीत या विषयावर विचार करत असतांना चिरंजीवांनी त्याच्या आजोबांना फोनवर सांगितले की विमानात ते लोक तुम्हाला ज्युस देतील ते पिउ नका बरं, जाम शु लागते नंतर……..

हुश्श!! म्हटलं, चला तर लहानपण आहे तर बाकी. सगळाच पंडितपणा नाहीये.

मग काय आमची नियमीत प्रश्नोतरे सत्र सुरु झालं. किती प्रश्न ते!! उत्तरे देता देता नाकी नऊ येतात.किचनमधे तर दोन लहान खुर्च्याच ठेवल्या आहेत आम्ही. कणिक कशी भिजवायची, ही भाजी कशी चिरायची, तु नक्कि किती तिखट मीठ टाकतेस, कुकर कसा लावायचा, मायक्रोवेव कसा सेट करायचा, वगैरे….. अनेक प्रश्नांची उत्तर मुलाला तिथेच मिळाली. आणि मला तेव्हढाच रिलिफ़… नाहीतरी नुसत्या उत्तराने समाधान होतच नाही.

 

लिहायला सुरुवात कुठुन करतेय आणि पोहोचतेय कुठे …. नुसती विचारांची आवर्तन. निष्कर्ष काय , तर शेवटी आपण घडवणार तशीच घडणार मुले!! याला पर्याय नाही. पद्धत तेव्हढी दर पिढीला बदलावी लागणार. थोडा विचार करून कृती केली तर अपेक्षित रिझल्ट नक्कि मिळणार. हे लिहिल्यावर सुद्धा हुरुप आलाय…………. आता थांबते आणि मुलांना उठवायला जाते. थियरी झाली आता प्रात्यक्षिक ………

माझ्या आजेसासुबाई…..

काही माणसे अशी असतात जी आपल्या कायम स्मरणात रहातात. माझ्या आजेसासुबाई ह्या अश्याच एक व्यक्ती- खर तर मी त्यांना आहो जाहो घालायला हवे पण पहिल्या भेटिपासुनच मी तिला ए आजी म्हणाले आणि त्याबद्दल तिने कधिही आक्षेप घेतला नाही.आमचा प्रेम विवाह, ज्याची थोडीफार कल्पना माझ्या सासुबाईना होती.त्यामुळे आजी आल्यानंतर त्यांनी सहजच म्हणुन मला बोलावले. आजीबाई तेव्हा गार्डनमधे आलेल्या होत्या. वय ९५, डोळ्यांना चष्मा, पाठीत वाकलेल्या. पण दात, आवाज, कान, आणि मेमरी खणखणीत. मी भेटले तेव्हा चिप्स खात सुनबाईंशी गप्पा मारत होत्या. ती भेट तशी औपचारिक होती. नंतर जेव्हा आमच्या लग्नाची बोलणी झाली तेव्हा मिश्किल हसत ती म्हणाली मला महितीये कोण आहे मुलगी मी भेटले आहे तीला …सगळे चकित. आमच्या आईंनी गुपचुप मला का बोलावले आहे हे तिच्या अनुभवी नजरेने तेव्हाच ओळखले होते तर!!!
लग्नानंतर तीचा खरा सहवास घडला. आणि जाणवला तीचा कर्मठ स्वभाव. सोवळे ओवळे पाळण्याबाबत अतिशय कडक नियम. सुनांवर वचक ठेउन होती ती. ज्याप्रमाणे गोष्टी व्हायला पाहिजे त्या व्ह्यायलाच हव्या.पण नातसुनेबाबत अगदी मोकळी. प्रत्येक प्रसंगासाठी तिच्याकडे गाणी तयार असत, आणि ती मोकळ्या आवाजात म्हणण्याची तयारी. आजी कडक आहे बरं! असा तिच्याविषयी मिळालेला रिपोर्ट खोटा वाटावा इतके सहज वागणे. पाठीवर तीचा मायेचा हात आणि तिचे आश्वासक स्मित …खरच ती कधी परकी वाटलीच नाही. काही दिवसातच ती परभणीला परत गेली, आणि आम्ही रोजच्या रहाटगाडग्यात रमलो.
नवी नौकरी, नवा संसार यात भेटी कमी झाल्या, त्यातच पहिलं पिल्लू झालं. मग बाळ लहान म्हणुन जाणे झाले नाही. माझा मुलगा एक वर्षाचा झाल्यानंतर आम्ही तीच्याकडे गेलो तेव्हाचा तीचा आनंद तीच्या वागण्यातून दिसत होता. खर तर नातू, पणतू च काय तीने खापर पणतू सुद्धा पाहिले होते. पण उत्साह तोच. मला म्हणे आता तु काहिही काम करायचे नाहीस, या तुझ्या सासवा आणि माझ्या सुनांना करु दे.तेव्हा माझा आवाज बसला होता म्हणुन मला वाढलेली बुंदी आजिबाईंनी कुरुम कुरुम करत खाल्ली आणि माझ्यासाठी खिर करायला सांगितली. म्हटल का ग! दात आहेत का तुला? म्हणे तोंड उघडते मोजुन बघ मग तुझे तोंड उघड मी तुझे मोजते. अर्थातच मी तिचे दात मोजायची हिम्मत केली नाही.
आम्ही म्हणालो आजी आता तु आमच्याकडे चल…लगेच आजीबाई उठल्या आणि त्यांच्या मोठ्या मुलाला( आमचे मोठे काका) म्हणाल्या , ते मला बरोबर चल म्हणताहेत काय करू? काका नाही म्हणाले त्यांचे मत की त्यांच्याकडे आधिच लहान मुलं आहे आणि आजीचे वयही जास्त आहे. ही मात्र हट्टाला पेटलेली अगदी लहान मुलासारखी. मला म्हणे माझ्या लेकिला( आमच्या आत्या ) फोन लाव. म्हटल दे नंबर तर म्हणे माझ्याकडॆ नाहिये चल तुला बटन सांगते आणि मग बटनांच्या सिक्वेंसनुसार तो फोन लावण्यात आला. आत्यांचेही मत काकांसारखेच होते मग मात्र आजीबाई रुसुन बसल्या.
जेवण आटोपुन आम्ही आत्यांकडे जाउन आलो. येत येत २ तास गेले आलो तेव्हा आजिबाई सामान बांधुन तयार, तिने काय पटवले माहिती नाही पण सगळे तयार झाले होते. मला म्हणे फक्त पाणी घे सोबत. ट्रेनची वेळ होत आल्यामुळे आम्ही घाईत तिचा पणतुकडुन फुले वहाण्याचा कार्य़क्रम केला कारण सगळ्यांची इच्छा होति की फोटोंमधे सगळेच असावेत. झालं रिक्षा बोलावण्यात आल्या, आजीची स्वारी आनंदाने बसली ,सतत चिवचिवाट सुरु होता मला नासिकला हे दाखव, ते दाखव. देवाचे दर्शन घेइन, एक ना दोन. तिचा चेहेरा पाहुन खुप छान वाटत होते. एक समाधान होते की तिची एक लहानशी मागणी आपण पुर्ण करत आहोत.
रिक्षा रेल्वे स्टेशनला पोहोचली आणि आजी अचानक कोसळली, काही कळेना वाटले हिला चक्कर आली. पण ती काही बोलेचना…… ट्रेन येऊन उभी राहिली , काकांनी आम्हाला सांगितले अमितला उद्या कामावर जायचे आहे तुम्ही निघा…लहान मुलाची आबाळ करु नका. आम्ही आता असेच दवखान्यात जातो…..पाय निघेना पण जड मनाने निघालो. आम्ही नासिकला पोहोचायच्या आत बातमी आली की आजी कोमात गेली. नंतर कळले ते तिचे केलेले निदान आणि ती आमच्यात नसल्याची बातमी!!! ते निदान होते अतिहर्षाचा झटका. तिला खुप आनंद झाला होता जे तिचे वय नाही सहन करु शकले.
सगळच अगम्य, अकल्पित. ती शरिराने नाही येऊ शकली आमच्याबरोबर पण मनाने मात्र ती आजही आमच्याचकडे आहे……

माझे वडिल आणि माझा नवरा..

ब्लॉग सुरु करुन अनेक दिवस झालेत पण सुरुवात कुठून करावी कळत नव्हते…त्यातच आज बाबांनी आम्हा दोघांना लिहिलेली पत्र अचानक हाती लागली… आणि ठरवलं शुभारंभ यापासुनच. हि पत्र माझ्या बाबांनी  ते आमच्याकडे मस्कतला आले असतांना लिहिली होती.

पहिले पत्र माझ्या नवर्‍याला अमितला आहे……

चि. अमित,
इथे येउन आम्हाला आज २५ दिवस झालेत. काळ किती गतीने धावत असतो. अगदी कालच आल्यासारखे वाटते.मुलगी जावयाकडे आलो असे न वाटता मुलाकडे आलो असे वाटते.येथे अनुभवले तुझे अगत्य, दिलदार स्वभाव. हौशी,आनंदी,खेळकर , विनयशील, निगर्वी असे एक व्यक्तिमत्व.
तुझ्या बाल्यापासुन जे वातावरण तुला लाभले त्या तुलनेत तू मोठी झेप घेतलीस. नवा देश, नवीन लोक, सगळ अनोळखी. अंधारातली उडीच होति ती. परंतु तु सगळं छान निभावलेस.एकुण काय वाळवंटात नंदनवन फुलवलेस.
आम्ही अभिमानाने जगाला सांगतो ज्याच मन चांगल त्याच इश्वर चांगलच करतो.त्यानुसार तुला पत्नी, मुले चांगली मिळाली. मुलांबद्दल काय आणि किती लिहावे कळत नाही. फार गोड, लाघवी, समंजस मुले आहेत. त्यांचा गोंडसपणा, लुसलुशीत स्पर्श थेट बालपणात घेउन जातो. त्यांच्याशी खेळतांना सगळी दु:ख विसरायला होते. काळज्या मिटतात. असे वाटते त्यांचे बाल्य असेच अबाधित रहावे.त्यांच्या एका हास्याने दिवसभराचे श्रम, थकवा विसरायला होतो.
इशानला रागावु नका. अत्यंत समंजस व हळवा आहे तो.
३०.१२.०८ ला आम्ही जाउ. जातांना इथल्या तुमच्या सहवासाच्या गोड आठवणी सोबत नेउ .पुढील भेटीपर्यंत त्या पुरतील. असाच आनंदी रहा.यशस्वी हो! पुढे जात रहा.
अमित कसा आहे असे कोणी विचारले तर मी येव्हढेच म्हणीन…

        अमित स्वत:चा आरसा
           शब्दात मी सांगु कसा..

        फुलांचा ताटवा तो
            शुभ्र पाण्याचा झरा..
        चांदण्यांचा गारवा अन
            पौर्णिमेचा चंद्र जसा//

        इशान गौरीचा पिता
           अन तन्विचा आहे सखा..
        देवडेंचा पुत्र अन
            कुलकर्ण्यांचा जणू वारसा//

        वसंताचा बहर तो
           अन आनंदाचा कहर तो..
        समुद्राची लहर तो..
            अन पर्जन्यतुषार हलकासा//

असाच आनंदी रहा. सुखी रहा. हसत आणि हसवत रहा. शुभाशिर्वाद.
                                             आई-बाबा
मधे एका कम्युनिटीवर जावई आणि सासरेबुवा असा टॉपिक होता. त्या दोघांमधील नात्याचे हे हळुवार मधूर रूप मला पहायला मिळाले याचे श्रेय अर्थातच त्या दोघांना . स्त्रीच्या आयुष्यातले महत्वाचे तिन पुरुष म्हणजे वडिल, नवरा आणि मुलगा. ज्याप्रमाणे सासु सुनेमधे तक्रारी असतिल तर नवऱ्याची कुचंबणा होते तसेच वडिल आणि नवर्‍यामधे तणाव असेल तर मुलिलाही त्रास होतोच.
खर तर हे वैयक्तिक पत्र पण या नात्याचा हा मला भावलेला पैलू सगळ्यांसमोर आणण्यासाठी हा खटाटोप.