होळी……

आजची पोस्ट आहे खास माझ्या बालदोस्तांसाठी……..

आज मी माझ्या मुलांना  सांगितलेली होळीची गोष्ट आज सगळ्या बालदोस्तांसाठी इथे टाकतेय. तेव्हा ही पोस्ट ज्यांना वाचता येते त्या मुलांसाठी आहे आणि ज्या मुलांना वाचता येत नाही त्यांच्या आई-बाबांसाठी…(त्यांनी ही मुलांना वाचून दाखवावी म्हणून…..) .

तर, बालदोस्तांनो, फार पुर्वी हिरण्यकश्यपु नावाचा एक राजा होता. तो अतिशय पराक्रमी होता, त्याने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळही जिंकलेले होते. ब्रम्हदेवाने त्याला वर दिलेला होता की त्याला दिवसा किंवा रात्री, घरात वा घराबाहेर, पृथ्वीवर वा आकाशात, मनुष्य वा प्राण्याकडून , आणि अस्त्र वा शस्त्राने मृत्यु येणार नाही. त्यामूळे तो अतिशय गर्विष्ठ झालेला होता. त्याचे सोडून अन्य कोणत्याही देवाचे नाव घेतलेले त्याला आवडायचे नाही. या हिरण्यकश्यपूचा मुलगा होता प्रल्हाद. तो भगवान विष्णूंचा भक्त होता. तो सदैव देवाच्या नामस्मरणात मग्न असे, ही गोष्ट हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नसे.

सुरूवातीला त्याने प्रल्हादाला रागावून पाहिले, मारून पाहिले पण प्रल्हादाने काही देवाचे नाव घेणे बंद केले नाही. मग एक दिवस तर हिरण्यकश्यपू फारच रागावला, त्याने त्याच्या सैनिकांना सांगितले की प्रल्हादाला उंच डोंगरावरून ढकलून द्या…… सैनिकांनी तसे केलेही पण प्रल्हाद देवाचे नाव घेत राहिला, आणि भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. असेच प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या गेल्या पण दरवेळी देवाने त्याचे रक्षण केले. लोक त्याला ’भक्त प्रल्हाद’ म्हणत असत.

या हिरण्यकश्यपू राजाची एक बहिण होती तिचे नाव होते ’होलीका’.  या होलीकेला एक वर मिळालेला होता , तो असा की तिला आगीपासून कुठलेही भय नाही. मग हिरण्यकश्यपू आणि होलिकाने असे ठरवले की ’होलीका’ प्रल्हादाला मांडीत घेउन जळत्या आगीत बसेल आणि त्या आगीमधे ’भक्त प्रल्हाद’ जळून खाक होइल……. पण याहीवेळेस भक्त प्रल्हादाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विजय झाला आणि त्या आगीत ’होलीका’ जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. (या हिरण्यकश्यपूचा पुढे विष्णूने नरसिंहाचा अवतार घेउन वध केला!!!)

याच ’होलीका’ च्या नावावरून आजच्या दिवसाचे नाव आहे ’होळी’….. या दिवशी संध्याकाळी जी आग पेटवली जाते त्यात सगळ्या वाईटाचा अंत होतो आणि जे जे पवित्र ते वाचते असे मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा ’होलिकोत्सव’ साजरा केला जातो.

याच दिवसाची आणखीन एक कथा अशी की याच दिवशी श्रीकृष्णाने पुतना नावाच्या राक्षसिणीला मारले होते. आणि लोकांनी तिची ’होळी’ केली होती. संपुर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता.

महाराष्ट्रात होळीच्या आगीत नारळ भाजला जातो आणि या आगीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळीला शिमगा असेही म्हटले जाते. पौर्णिमेनंतर पाच दिवसानी येते रंगपंचमी. वेगवेगळ्या रंगांची उधळण करून हा रंगीबेरंगी सण साजरा केला जातो.

होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची रक्षा कपाळाला लावून धुळवड केली जाते. ही रक्षा आपलेही दुष्ट शक्तीपासून रक्षण करते असे मानले जाते.

तेव्हा आजच्या या होळीत आपण आपल्यातल्या दुर्गूंणांना आगीत टाकून देउ या, आणि ्होळीचा आशिर्वाद घेउन उद्यापासून एक नवी सुरूवात करूया!!!

तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, ईशान आणि गौरीकडून होळीच्या अनेक अनेक रंगीबेरंगी शुभेच्छा!!!!!!

आणि हो, संध्याकाळी होळीजवळ जाल तर जरा जपूनच, आईचा हात सोडू नका……आणि बाकिच्या अनेक ब्लॉग्स मधल्या मावशी काकांनी त्यांच्या (म्हणजे आम्हा सगळ्यांच्या) लहानपणीच्या होळीच्या आठवणी नमुद केलेल्या आहेत त्या वाचायला विसरू नका हं!!!!

हा आहे आजचा आमचा होळीचा प्रसाद……

आज संध्याकाळी होळी पेटल्यावर जोरात बोंब ठोकायला विसरू नका, आज सबकुछ माफ असते, एरवी कराल तर आई रागावेल….. :)

होळी रे होळी…………………

I’ll get back to u on this…………..

‘मम्मा……………………’……चिरंजीव

’ओ रे……………….’ अस्मादिक किचनमधे कुकर लावताना…..

’ईज करिना कपूर सेक्सी??????……………..’ ……चिरंजीव

’हं………………’ …..गरगरणे या प्रकाराच्या पहिल्या स्टेजमधली मी……..

तीनताड उडाले होते मी…..हातातले तांदुळाचे भांडे सुटून गेले तर नंतर बरचं निस्तरावं लागेल येव्हढा विवेक शाबुत राहिल्यामुळे ते वाचले…. सध्यातरी या अनपेक्षित प्रश्नाची उकल करावी या हेतूने ते भांडे ओट्यावर आदळून आमची स्वारी लेकाकडे……………त्याला गाठून आधी त्या प्रश्नाचं उगमस्थान शोधलं………त्यांच्या कुठल्यातरी लाडक्या गाण्याच्या यू-ट्युबवरील व्हिडिओ खाली म्हणे ही   उपरोक्त ’शंका’ उपस्थित करण्यात आलेली होती. आता दचकण्याची वेळ पुन्हा माझी होती………. (लहान मुलांच्या कुठल्यातरी सिनेमाच्या गाण्यात हे असले आगाउ प्रश्न विचारणाऱ्या महाभागाला गाठावे असेही वाटले क्षणभर!!!!!!!!!!!!!!!!  )बरं ’हो ’ म्हणू की ’नो ’……हा ’मम्मीकी सुनू या टम्मीकी’ छाप प्रश्नही मनात आला………………..त्यातही काहिही उत्तर दिले तरी ’सेक्सी’ म्हणजे काय गं मम्मा????? ही शंका चिरंजीव विचारणारच होते लगेच…………… ’गोची’ म्हणजे काय याचा प्रत्यय येतो बरेचदा………..

प्रत्यक्षात माझी हे असले काही स्वत:शीही विचारायची प्राज्ञा आजवर झालेली नाही…………….. असल्या संदर्भाला 1/ Cos C वर माझी मजल गेलेली नाही…………. पण आज म्हणजे!!!!!! …………… ’आहे का ती सुंदर किंवा छान??????’……………मी त्याला विचारले……..’ She is not so beautiful Mumma……तुला पण नाही ना आवडतं…………..”तो म्हणाला……………श्रावण बाळं ते माझं…………..तात्पुरती सुटका झाली होती………पण वरवरच्या मलमाने मुळ प्रश्नाला फक्त बगल दिलेली होती…………..

आजकाल हे प्रसंग वरचेवर येताहेत….स्वैर सुटलेला मिडीया, शाळेत अठरापगड ठिकाणची ’हुशार’ मुलं……टि.व्ही.,ईंटरनेट, पेपर्स………….कश्याकश्यापासून वाचवणार आपण मुलांना…….बरं ही पिढी अतिशय ’ज्ञानी’ आहे……. प्रत्येकच पालकांपेक्षा मुलांची पिढी बदललेली असणार, प्रगत, आधुनिक असणार हे मलाही समजतेय…………..फक्त हा प्रश्नांचा ’सामना’ मात्र नुकताच जरा जास्तच हातघाईचा व्हायला लागलाय…………. एक विचार असाही येतोय की आपणच विचारपुर्वक व्यवस्थित मुलांच्या वयाचे भान ठेवत, त्यांना झेपेलसे सांगावे म्हणजे उगाच मित्रवर्यांकडून मिळणाऱ्या माहितीची खरी बाजू त्यांना समजेल……… त्यांचा आपल्यावर विश्वास असतो तेव्हा त्याच आधारावर आपण त्यांना चर्चेत घ्यायला हवेय…… मगर ईस थेअरी का प्रॅक्टिकल उतना ईझी नही है!!!!!!!!  अचानक जेव्हा असे हल्ले होतात तेव्हा त्यांना त्याच सफाईने तोंड देण्याईतका माझा सराव अजून झालेला नाहिये…………..

3 Idiots मधला सीन आठवतोय बोमन ईराणी ऍस्ट्रोनॉट्स पेन दाखवतो आणि त्याची महती गातो…….आमीर कमाल भाबडा चेहेऱ्याने त्याला विचारतो की स्पेसमधे पेन नाही चालत तर पेन्सिल्स का नाही वापरत………….त्यानंतर बोमनच्या चेहेऱ्यावर जे भाव येतात तसलेच काहिसे भाव माझ्या चेहेऱ्यावर आजकाल वारंवार येतात आणि मग मी म्हणते…………..’I’ll get back to u on this……………..’

मध्यंतरी कधीतरी देवापुढे दिवा लावत होते आमचा ’रांचो’ बाजुला उभा होता हात जोडून…..आणि अचानक म्हणाला, ” मम्मा काड्यापेटी ला Sticks Box किंवा Fire Box न म्हणता मॅचबॉक्स का म्हणतात……….” …..मला खरचं त्यापुर्वी नव्हता पडला हा प्रश्न……मग उत्तर शोधले की ’मॅच’ या शब्दाचा अर्थ ’असे काही तरी की ज्यामुळे आग लावता येते” असाही आहे…………तोवर मात्र माझ्या चेहेऱ्यावर ’I’ll get back to u on this……………..’ चेच भावं होते………

आजकाल तर मुलांबरोबर टि.व्ही. बघण्याचीही माझी हिम्मत होत नाही……………..सॅनिटरी नॅपकिनच्या चपला किंवा छत्र्या पहाण्यापेक्षा नकोच ते !!!!! तरिही सुटका नसतेच, मागे याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला काहितरी असेच वेळ काढू उत्तर देउन मी स्वत:साठीच खड्डा खणला होता………………. मग उलट त्याने तो भुंगा जास्त लावला, शेवटी पुन्हा ये रे माझ्या मागल्या होण्यापेक्षा त्याला झेपेल असे समजावले………आणि जादुची कांडी फिरल्यासारखी तो प्रश्नही गायब आणि ते कुतूहलही…………….अनेक जाहिराती येतात तश्या याही येतात आणि जातात…………… पण मुळ मुद्दा रहातोच की अडलय का काही या जाहिरातदारांचेच, उगाच नसत्या माहित्या अगदी सखोल दाखवणे खरचं कितपत गरजेचे आहे??????? लहान मुलांच्या रिऍलिटी शो मधले ऍंकररूपी आगाउ बडबडीचे यंत्र पाहिले की तर हे प्रश्न अजुनच वाढतात……..बरं त्यांच्या त्या बेफाम वटवटीला दाद देण्यात त्यांचे जन्मदातेही असतात…… मग मेले आम्हीच का असे चिकित्सक असेही वाटते कधीतरी!!!!!!!!

मला कळतयं हा काही ’भारत-पाक’ मुद्दा नाहीये…..पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ना ती गतं आहे…… हळूहळू पिल्लू मोठं होतय, प्रश्नांच स्वरुपही बदलतय……………..आज प्रश्नपत्रीकेच्या गट ’अ’ मधे असणाऱ्या मला गट ’ड’ ही सोडवायचा आहे……………आणि नुसतं पास न होता नंबरही काढावा लागेल……… तेव्हा मन कसून कामाला आणि विचाराला लागावं लागणार आहे…………..

काल लेकीचा तिसरा वाढदिवस…….परवा झोपण्यापुर्वी अचानक माझ्यावर चिरंजीवांनी पुन्हा प्रश्नहल्ला केला…………….’मम्मा आता माउ तीन वर्षाची झाली …..मग आता पुन्हा बाळ कधी होणार ……… :) …………..’…………… क्षणभर राग आला मग तो गेला पण विचार आला की या प्रश्नाला काहिबाही उत्तर देउन सुटका होइल खरी पण या प्रश्नोत्सर्गी प्राण्याबाबतचे एक सत्य असेही आहे की प्रश्न आणि उत्तर यांची चेन रिऍक्शन असते………..म्हणजे एका प्रश्नाचे उत्तर पुढचे २/३ प्रश्नांचे जनक असते…………..तेव्हा मी त्याला म्हटले, ” झोप बाळा तू आता……I’ll get back to u on this…………..” :) ………………………..

थोडक्यात काय तर हे ’पार्सल ’ त्याच्या बायकोच्या ताब्यात देण्यापुर्वी मेऱ्येको बहूतच बडे बडे प्रश्न सोडवणेके है ऐसा दिखता है!!!!!!!!!!!!!!!

ता.क. करिना कपुरच्या नावाला दिलेली लिंक ही तिच्याबद्दल अधिक काही माहिती (!) देणारी असेल असे वाटून तिला क्लिक केल्यावर जर भ्रमनिरास झाला……….. I can get back to u on that…………कारण त्यात माझा दोष नाही ……………. (कोणे एके काळी तिचा उल्लेख असलेली एक पोस्ट मी टाकली होती ती ज्यांनी वाचलेली नाही त्यांनीही ती वाचावी हा एकमेव उदात्त :D हेतू माझ्या मनी होता…………)

बाबाची ही कहाणी…………

सकाळी सकाळी कुठूनतरी गाणं कानावर पडलं, ’तुझमे रब दिखता है…….यारा मै क्या करूँ!!!!!!’ ……………मला हे गाणं आवडतं याचं कारण मला नेहेमी वाटतं की या गाण्यातले बोल माझ्या जोडीदाराला लागू होतात!!!!!!! माझ्यातल्या शहाण्या मी ला माझ्यातल्या वेडू मी सहित त्याने अगदी आनंदाने जपलेय आजवर…………..भरल्या तृप्त संसारातही माझे वेगळेपण सहजतेने जपण्याईतके स्वातंत्र्य मला आहे……कुठल्याही नव्या गोष्टीत रसिकतेने माझ्या पाठीशी तो उभा असतो…………….आता म्हणाल आज असे अचानक असे पतीपुराण का सुरू झालेय…………त्याला कारण म्हणजे मला काल आलेला फोन……….

आम्ही रोह्याला असताना माझ्या नवऱ्याच्या कंपनीत असलेल्या एका मल्याळी फॅब्रीकेटरनी मला फोन केला होता…….भरल्या आवाजाने आणि गळ्याने बोलत होता तो………साहजिकच काळजीने मी त्याला विचारले, “क्या बात है भय्या कोई प्रॉब्लेम है क्या ???”

काहि दिवसांपुर्वी त्याचा व्यवसाय अचानक बंद होउन त्याचे कुटूंब आणि तो अगदी एकटे पडलेत असे मला नवरा बोललाही होता. आपण काही मदत करावी असेही बोलला होता…..त्यानुसार त्याने ती केलेलीही होती…………….इथवर मला कल्पना होती पण आज हा मनुष्य काय बोलतोय हे ऐकण्याची मात्र उत्सुकता होती पण त्याच्या स्वरामूळे मात्र पुन्हा काळजी मनात दाटत होती…………….

तो सांगत होता………..भाभी मुसिबत के वक्त कोइ साथ नही देता, अपने अपने कहने वाले सब छोड गये थे!!!!!! अमितने बिना किसी शर्त के मेरी मदद की!!!! मैने फिरसे अपना बिजीनेस शुरू किया है…….पिछले दो साल ख्रिसमस नही मनाया था!!!! ईसबार धुमधाम से मनाया………तो मेरी बेटी ने पुछा के डॅडी Jesus ने पैसे भेजे क्या आपको??????? भाभी मैने उसे कहाँ के हाँ मेरे Jesus ने ही भेजे है पैसे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!”

पुढेही तो बोलत राहिला आणि त्याच्याबरोबरच माझेही डोळे पाझरत होते……………..अभिमानाने, आनंदाने मलाहि बोलवेना पुढे!!!!!!!!!!!!

ही घटना खरं तर या वर्षाच्या सुरूवातीची……आत्तापर्यंतची पोस्ट कधीचीच टाईप केलेली होती पण टाकली नव्हती कारण या पोस्टमधल्या ’नायकाला’ ते आवडले नसते………….फक्त स्वत:साठी म्हणून ती टाईप करून ठेवलेली होती……

काल मात्र मी किचनमधे काम करत असताना दोन्ही मुलांचा संवाद ऐकला…………….माझी लेक बाबाबद्दल काहितरी रागावून बोलली होती, आणि तिला मुलगा समजावून सांगत होता……………’माऊ असं काही बोलायचं नाही आपल्या बाबाला……………हे बघ बाहेर किती उन आहे आत्ता पण तो गेलाय ना ऑफिसला……………..रोज किती दमतो तो आपल्यासाठी, पण खेळतोच ना घरी आल्यावर आपल्याशी!!!!!!!!!!!!! किती प्रेम करतो तो आपल्यावर……काल आपण मॉलमधे गेलो होतो , आपण तिघांनी काहिकाही घेतलं की नाही….बाबाने काही घेतलं का स्वत:ला…………..तो आपल्याला फिरायला नेतो…..करतो की नाही सगळं आपल्यासाठी…………….” ……..बाबाभक्त ईशानमहाराजांचे पुराण पुढेही सुरू होते आणि बहिणाई ते भक्तिभावाने ऐकत होती……………पुढचे शब्द माझ्या कानात येत नव्हते ईतकेच………

बाबाने विश्वासाचे खत घातलेलं हे लहानसं रोपटं तो विश्वास सार्थ ठरवू पहात होतं तर!!!!!!!!!!!!!!!!!

माझं मन मागे मागे भुतकाळात फिरत होतं दिवसभर…………….माझ्या माहेरी  कोणालाही फारसा पसंत नसलेला मुलगा ते सगळ्यांच्या गळ्यातला ताईत हा नवऱ्याचा प्रवास डोळ्यासमोर होता सारखा!!!!!!!!!!!!  शिक्षण संपल्यावर रिझल्टच्याही आधि नौकरी करायला लागलेला मुलगा ही त्याची माझी पहिली ओळख……..ही ओळख मग परिचय, मैत्री हे टप्पे पार करत करत आयूष्याची साथ या प्रवासापर्यंत आली.  मला आवडतात म्हणून पळसाच्या झाडावर चढून फुले काढून आणणारा, वेगवेगळ्या नकला करून सगळ्यांना हसवणारा, कायम स्वत: आनंदी असणारा हा माझा मित्र नेहेमी ईतरांसाठी जगत असतो हे मला कधीचेच उमगले होते…………….आणि आता मात्र त्याची ही अशी वेगवेगळी ओळख पुन्हा पुन्हा आवडत होती!!!!!!!!!!!!!!!

’तू ना आपल्या गाडीची जनता गाडी करून ठेवलीयेस, हात दाखवा गाडी थांबवा!!!!’ अशी माझी त्याच्याकडे नेहेमी कुरकूर असायची पण परवा त्याचा मित्र सांगत होता ,की नवऱ्याच्या गाडीमागेच त्याचीही गाडी होती, आणि नवरोजी एका ठिकाणी अचानक थांबले म्हणून काळजीने तो ही जरा पुढे जाऊन थांबला हे बघण्यासाठी की याला काही अडचण आहे का…………………पण म्हणे नवरोजी थांबले होते एका वृद्ध ओमानी माणसाला गाडीत बसवून घ्यायला……त्याच्या हातातलं सामान स्वत: गाडीत ठेवून त्याला घेउन मग आमची ’जनता गाडी’ पुढे निघाली ………………..असे एक ना अनेक प्रसंग कधी मला जाणवतात , कधी कोणी कोणी सांगत असतात……………..

ही पोस्ट एकीकडे मी टाईप करतेय आणि दुसरीकडे नवरोजी आणि मुलं ’3 Idiots’ नावाचा नवा खेळ खेळताहेत………….बापाला ’राजू किंवा फरहान’ हा साईड रोल देउन मुलं ’चतूर आणि रांचो’ झालेली असणार…प्रत्यक्षात आमच्या आयूष्यातला हा ’हिरो’ हे असे साईड रोल अगदी आनंदाने करत असतो…………..त्याला जेव्हा समजेल मी हे असे काही लिहीतेय तेव्हा ठरलेले वाक्य यायचेय, ” तू गेल्या जन्मी रामदास स्वामीं च्या शिष्यगणात असावी त्याशिवाय त्यांना येव्हढी सार्थ लक्षण सुचली नसती :) ……………………. काय म्हणतात समर्थ आत्मस्तूती करणारा एक मुर्ख असतो !!!!!!!!!!! “

तरिही मी आज हा मुर्खपणा करणार आहे………….कारण मला पुर्ण कल्पना आहे आमच्या यावेळेसच्या १० व्या व्हॅलेंटाईनबद्दल हा माझ्याकडून काही घेणार नाही, उलट मलाच म्हणेल ,”तुम्ही तिघं आनंदात आहात ना मग मला दुसरं काही नकोय………………” 

आज माझ्या मनातले हे विचार मला एका पोस्ट मधे मांडणे जरासे कठीणच जातयं तरिही न मांडता रहाणंही शक्य नाहीये!!!!!!!!!!!!! तेव्हा आजचा ह्या पोस्टचा कट आहे माझा आणि मुलांचा…………….’बाबाची ही कहाणी…………..’ आज आमच्या मनातली……………..