फुलपाखरू….. (भाग २ )

(पहिला भाग इथे आहे. )

पुढचे काका- काकू , आणि मग त्याच्या पुढचे काका किंवा नुसत्या काकू …. दिवस पुढे सरकत होते. पिल्लूच्या शाळेतला अभ्यास वाढत होता…. अभयच्या ऑफिसमधलं कामंही छान चाललं होतं. रमाला निवांत वेळ हाताशी कमीच लागत होता तसा . कधीतरी चहाचा कप आणि जरा सवड हातात एकत्र आली की त्याबरोबर काकूंची आठवण मनात आल्याशिवाय रहायची नाही. सरिता मॅडमला काकूंबद्दल विचारू हा विचार मनात यायचा आणि मग घाईत ते राहून जायचे…..

त्यात पिल्लूच्या शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर रमाच्या सासूबाई तिच्याकडे रहायला आल्या…. ’समाजाची कशाला हवीये सेवा , त्यापेक्षा एखादी नोकरी करावी ’ हा विचार रमाला येता जाता कानी पडायला लागला. रमाने त्यांचे बोलणे मनावर न घेता त्यांच्याशी संवाद साधायचा नेहेमीचा प्रयत्न चालवला होता. सगळं म्हणायला सुरळीत चाललेले होते.

एक दिवस मग ते सगळे या भागातल्या प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात गेले होते…. या शहरात आल्यापासून अभय रमाला कित्येकदा तिथे चलण्याबद्दल म्हणत होता, रमाने ते कायम टाळले होते. आज सासूबाईंची इच्छा म्हटल्यावर रमाला जावेच लागले….. अनेक साड्यांची खरेदी झाली…. एकीकडे ती स्वत:, मधे अभय आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई बसलेल्या होत्या…..  रमाला वाटले नात्यांची ही एक साडीच आहे ही, सासूबाई मुख्य साडी , अभय जोडणारा धागा आणि आपण काठाला उभे आहोत….

साड्यांच्या राशीतून एक बेंगनी रंगाची, हिरवे सुरेख नाजूक काठ असलेली साडी रमा हातात घेउन पहात होती. तिच्या मनातल्या फुलपाखराचे आवडते रंग….जांभळा रंग आणि हिरवे काठ असलेलं जरतारी फुलपाखरू….  तिच्या सासूबाई फणकारल्याच तितक्यात, काय तरी साडी निवडलीस गं रमा, वेगळच काहितरी शोधतेस नेहेमी ….. भिरभिरणारे फुलपाखरू बिचकले, पुन्हा कोषात गेले :(

” ती साडी घेऊयात तूला “, असे अभयने म्हटल्यावर मात्र तिने नकार दिला….

रमाच्या मनात एक विचार चमकला परत येताना , जुनी रमा असते नं मी तर आत्ताच्या आत्ता सासूबाईंना अर्धा तास डिवोर्स दिला असता … बोललेच नसते… बालिश इलाज होता तिचा हा… कट्टी नाही म्हणायची ती, डिवोर्स म्हणायची …. तिच्या कॉलेजमधे सगळे हसायचे तिला या शब्दाबद्दल. जुन्या आठवणी तरळल्या मनात आणि तिला वाटलं ’लहान आहोत आपण .. पिल्लूयेव्हढे किंवा जरासे मोठे ’ …. अधेमधे असे बालिश वागता येण्यासाठी तरी काकूंसारखी सासू हवी होती मला…. वयानेच नाही तर खरंखूरं मोठेपण असणारी….  मनात विचार आला खरा पण त्या विचारासरशी रमा चपापली. तिने सासूबाईंच्या हातातले सामान घेतले आणि ते सगळे घराकडे निघाले…. नाजुकश्या पंखाची उघडझाप झाली क्षणभर मनात आणि पुन्हा ते उदास मिटले ……

सासूबाई गावी गेल्यानंतर पुढचे जवळपास आठ -दहा दिवस रमाला सरिता मॅडमकडून फोन आला नव्हता… पिल्लूच्या शाळेची सुट्टी संपून शाळा सुरु झाली. रूटिन सुरू….

रमा घरातली कामं आवरत असताना बेल वाजली , सरिता मॅडमकडून तिच्यासाठी काही सामान आले होते.

पार्सलमधल्या एका पाकिटात एक पत्र होते रमासाठी…. रमा पत्र वाचू लागली आणि नकळत डोळे भरून वहायला लागले तिचे….तिच्या काकूंचे पत्र होते ते…

रमा वाचत गेली ओळींमागे ओळी…..

” प्रिय रमा, …….तुझ्या काकांनी निवडलेली आणि मी तुझ्यासाठी खरेदी केलेली भेट पाठवतेय…. काका म्हणू की सर म्हणू गं… तू सर म्हणायचीस नं त्यांना… तुझे लाडके सर… आणि सरांची लाडकी विद्यार्थीनी तू. आधि तू हरहून्नरी मुलगी म्हणून आवडायचीस त्यांना, मग त्यांना तुझ्यात त्यांची सुन दिसली म्हणून तू अजून लाडकी झालीस. मला घरी तुझ्याबद्दल सतत सांगत ते.  एकूलता एक मुलगा त्यांचा आणि अनेक स्वप्न… सतत म्हणत मी आणि माझी सुन मस्त पेपर वाचन करणार सकाळी , एक चहाचा कप हातात हवा आणि भरपुर गप्पा. मला सुन नकोय , मुलगी हवीये…. मला तर सक्त ताकिद होती, सुनं म्हणायचं नाहीस कधिही तूला…. तू मुलगी आमची. :)   तूला पहायला येऊ असे ठरवलेही मी पण राहूनच गेले ते…. मग आमची आमच्याच गावी पुन्हा बदली झाली … तुझं शिक्षण पुर्ण झाल्यावर तुझे सर निघालेही होते तूला मागणी घालायला पण तोपर्यंत तुझे आणि अभयचे लग्न तुम्ही ठरवलेले होते. ते हिरमूसले , म्हणाले मी आधि बोलायला हवे होते….

आमच्या मुलाचे लग्न होइपर्यंत ते काही थांबले नाहीत बघ पण !! मी ही निघालेय आता त्यांच्याकडे…. तू अशी अचानक सामोरी आलीस, सगळे संदर्भ जुळले. त्यांची मुलगी मला भेटली हे त्यांना सांगेन न विसरता…..  “

रमाच्या मनात तिचे सर तिच्याशी बोलत होते, सरिता मॅडमने सांगितलेल्या त्या भागाच्या नावाने, त्या घरावरच्या पाटीने मनात दाटलेली हुरहूर तिचा अर्थ समजावत होती… आठवणींची दाटी होत होती…. अभयशी लग्न ठरताना मैत्रीणींची ’रमा अगं लग्न एकाशी नसतं गं होत, संपुर्ण घर येत नं त्यात , त्या घरात कशी रमशील तू ?? त्याच्या आईच्या हेकट वागण्याकडे कानाडोळा का करते आहेस ?? “  वगैरे वाक्य रमाच्या मनात डोकावत होती….. वेडं फुलपाखरू घायाळ होत होतं…. काय कमावलं काय गमावलं हे हिशोब फुलपाखराला येतच नव्हते, आणि मांडायचेही नव्हते …. एक सल मनात उमटत होती तिला नाव मात्र त्या बिचाऱ्याला देता येत नव्हते…..

पत्र हातात ठेवून बराच वेळ रमा बसून होती… त्या पत्राबरोबर एक लहानशी चिठ्ठी होती …

” रमा, सासूबाईंनी हे पार्सल आणि पत्र तुझ्यासाठी ठेवले होते…. त्यांच्या शेवटच्या काही इच्छांपैकी एक की हे पत्र तूला पोहोचवावे. ….. तुझ्याबद्दल खूप बोलल्या त्या, अगदी आनंदी होत्या जाताना ….. “

काकूंच्या सुनेने तिचा पत्ता आणि फोन नंबर दिलेला होता. त्या कोण होत्या हे समजल्यावर,  आता त्या आपल्यात नाहीत हा विचार रमाला अजूनच कष्टी करत होता.तिचे डोळे सारखे भरून येत होते…..

सोबतचे पार्सल उघडले रमाने…. त्यात एक सुरेख साडी होती….. बेंगनी रंगाची, हिरवे नाजूक काठ असलेली……… तिचा मऊसूत अलवार स्पर्श रमाच्या हातालाच नव्हे तर मनाला झाला आणि आधिच वहाणारे डोळे अजूनच भरून येउ लागले.

त्या साडीकडे रमा एकटक पहात राहिली….. बेंगनी साडीवर त्याच रंगाचं फुलपाखरू गोल गोल फिरत राहिलं…………

बाकी शून्य ……

अंक, बाराखडी, गणित, भाषा, इतिहास, भुगोल, विज्ञान, मग जीव नी भौतिक त्यात रसायनाचा घोळ….. बीजगणित, भूमिती, ट्रिगनॉमेट्री नं बिट्री…. साईन न कोसाईन, टॅन न बिन …… ईंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हज…. डबल नं ट्रिपल…. काळ काम न वेगही त्यात….आपली भाषा, साहेबाची भाषा… हिंदी बिंदी मधेमधे….व्याकरणं बिकरणं, नुसतंच प्रकरण….. प्रोजेक्टाईल नी सरळ , रिलेटिव्ह बिलेटिव्ह मोशन की बिशन ….. हालचाल नुसत्याच नावाची नी खरं तर सगळं थबकवणारी …… व्हेक्टर्स बिक्टर्स , डोक्यावरचे बाण….. वर्तूळ नि चौकोन….. इकडे रेषा,  तिकडे किरण….. वाकड्यात शिरले की डिगीटल नं ऍनालॉग….. डेटा न फेटा…. बायनरी बियनरी ….. मेकॅनिक्स नं ग्राफिक्स …. कंडक्टर नं नॉनकंडक्टर भलती धुडं … मधे सेमी वाल्यांच रिजर्वेशन चं लफडं ….. मिली सेंटी डेसी मिटर …  डेका हेक्टो किलो मिटर… नसती पाठांतर… त्यात मैलाची गणितं …. आर्टस न कॉमर्स…..आम्ही सुखी न तुम्ही दु:खी….. उभ्या दोन रेषा समोरासमोर की कपॅसिटर …आडवं पाडा त्यांना वेड्या वाकड्य़ा ओढा झाली की रेजिस्टर…. डायोड न ट्रायोड, इन्व्हर्टर नं बिन्व्हर्टर ….

आमचं सायन्स तुमचं सायन्स….. तुम्ही डॉक्टर, तुम्ही वकील .. तुमची जात वेगळी आणि आमची वेगळी !!! तुमचे विषय सोप्पे आणि आमची मेली ब्रॅंचच अवघड…… तुम्ही करा मज्जा नं आम्हाला सजा….

एकाचे एक विषय नं एकाचे एक…. तुमचा अभ्यास आमचा अभ्यास… तुमची डिग्री नं आमची डिग्री…… तुमची वर्ष गेली नं आमचीही गेली……

आम्हाला नोकरी मिळते तुम्हाला नोकरी मिळते….. कधी कधी आमचं नं तुमचं ऑफिसही एकच ….. तुमच्या डिपार्ट्मेंटला काम कमी नं आमच्यावर जबाबदारी भारी…… तुमचं लग्न होतं नं आमचं ही लग्न होतं…. तुम्हाला पोरं होतात नं आम्हालाही पोरं होतात… आयुष्याच्या वेव्हज एकाच दिशेला वहातात…. ए सी असो नं डि सी असो… त्यांचा रस्ता ठरलेला  …..

नाती नं गोती जपा फार….. लोकांच्या वागण्याचा भलता भार….. एक न धड चिंध्याच फार …. आमचं माहेर तुमचं सासर ….. आमची घरं तुमची घरं…. आमचा किराणा, तुमचा किराणा ….. आमच्या मुलांचे रिजल्ट नं तुमचे ते निकाल…..आम्ही घरं घेतो तुम्हीही घेता घरं …. आमचं महाबळेश्वर नं तुमचं माथेरान… लंडन बिंडनला तिकीटं फार…..

दमछाक करताना तुम्हीही दमता… दमछाक करताना आम्हालाही थकवा….. आयुष्याचा अर्थ शोधतो आम्ही…. अर्थात आयूष्याला शोधताना रमताय तुम्ही….

आयुष्याची गणितं म्हणे तुम्ही सोडवता… आयूष्याची गणितं मग आम्हिही सोडवतोच….

गणितात असतं काय काय…. अधिक नं उणे….भागाकार नं गुणाकार…. बालपणीच्या वर्गात शिकवतात बाई…. त्यांच्यावर विश्वासायची आपल्याला घाई….

प्रत्येक जण एक अंक असतो खरा…. पूर्णांक असो किंवा अपूर्णांकच बरा…. काही गोष्टी जोडतो काही वजा करतो….. घातांक बितांक शोधायचेच नसतात… पुस्तकाच्या बाहेर सांगा ते तसेही कुठे दिसतात??? वर्गमूळ नं घनमूळ की नुसतं खूळ …..

प्रश्न पडतात आम्हाला बरं , वाटतं तुमचंही असचं असतं हेच एक खरं…..

आयुष्यात गणिताला एकच फुटते वाट…. भागाकाराच्या रस्त्याचा भलताच थाट …..

आयुष्य स्वत:च होतो मग भाज्य एक…  भाजक म्हणजे आपणच अंक नेक….. अंक जितका मोठा भागाकार तितका सोपा… खूप पायऱ्या उतरायच्या नाहीत, उधाऱ्या उसनवाऱ्या करायच्या नाहीत……

अंक असू देत कुठलाही म्हणा….. नियम हाच गणिताचा कणा… पायऱ्यांना इथे मार्क असतात….. चुकारपणाच्या वाटा नसतात ….

काहीतरी भाग मग आम्ही देतो….. वजाबाक्या बिक्या करत असतो…. एक दरी पार की पुढची खाई ओढायची…. सारं बळ्ं एकवटत पुन्हा उडी मारायची…. आमचं ते असं नं तुमचंही असंच….. भागाकारात गुणाकार.. … गुणाकाराचा एक साक्षात्कार…. आम्ही नं तुम्ही रस्ते तेव्हढे वेगळे, आकडेच काय ते नवे …… तुमचं तेच नं आमचंही तेच की …..

गुणाकाराची वजाबाकी …. हे बाकि नं ते ही बाकि…..

आयुष्याचं संचित वर हळूहळू साठत जातं …..स्वत:लाच स्वत:ने भागायचं वळणं येतं….. हा भाग असतो एक भोग बरं का ….. त्याला चुकवणं आपल्याच्याने खरय का????

अंकातून अंक वजा मग होतो…. संचिताला एक अंक जोडला जातो….. ह्याचं संचित , त्याचं संचित…. आमचं वेगळं … तुमचं पुन्हा वेगळं….

तळाशी उरतं त्याला मग ’बाकी’ म्हणतात…… भेदाभेदाची गणितं इथे येऊन विरतात…..

गोल गोल आकडे फेर धरतात…. शुन्यातून विश्व उगाच का म्हणतात !!!!! :)

एक सात्विक वादळ …. अमृता प्रीतम …

अमृता प्रीतमचं तिने स्वत: लिहीलेलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही ,कधी वाचेन ते ही माहित नाही!!!  पंजाबीत असलेलं पुस्तक वाचता येणार नाही कदाचित पण समजणार नाही असं मात्र म्हणता येणार नाही….. ती मराठी नाही, मी पंजाबी नाही…. तिच्या साहित्याची ओळख होण्याच्या टप्प्यापर्यंत येइपर्यंत मूळात माझी साहित्याशी अजून ओळख नाही….  मग असे असूनही , तुटपुंज्या वाटू शकणाऱ्या ओळखीवरही त्या व्यक्तीमत्त्वातलं नक्की काय साद घालतं समजत नाही….

बरेचदा वाटतं ब्लॉगवर एक पोस्ट लिहीण्याइतकी मी नक्कीच ओळखते तीला… मग वाटतं, छे!! मला जे समजतं , जे वाटतं ते शब्दांमधे बांधण्याइतकी समर्थ मी नक्कीच नाहीये.आणि मग तिथेच वाटतं, ’युरेका ’ …. सापडलं मला की मला काय आकर्षण वाटतं तिच्या व्यक्तीमत्त्वाचं…. माझं ’दुबळं’ असणं, समाजाच्या चौकटीचं सतत भान बाळगणं आणि तिने ते सशक्तपणे झुगारणं …. नुसतं झुगारणं ही बंडखोरी नव्हे तर स्वत:तल्या प्रतिभेला जपत स्वत:च्या नियमांनूसार आयुष्य जगणं !!!

भारतातून निघताना पुस्तकं खरेदी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो माझ्यासाठी नेहेमी . एका पुस्तकाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना त्या दरम्यान सुरू होती. घेतलेल्या कुठल्यातरी पुस्तकावर एक लहानसं पुस्तक हाती आलं , मुळचं ’उमा त्रिलोक ’ या लेखिकेचं आणि  ’अनुराधा पुनर्वसू ’ यांनी मराठीत भाषांतरित केलेलं  ’अमृता इमरोज ’ एक प्रेमकहाणी  नावाचं ते पुस्तकं !!!

अमृता प्रीतम एक मोठ्या पंजाबी लेखिका होत्या इतपतच ज्ञान होते तोवर मला…. केव्हातरी सहज पुस्तक चाळायला म्हणून हातात घेतलं . मात्र जसजशी वाचत गेले तेव्हा मात्र अमृताच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडत गेले. इथे इमरोजना वेगळं काढणं शक्यच नाहीये. ते दोघे वेगळे होतेच कधी…..

एक जिगसॉ पझल येतं इश्वराकडून , आपल्यात एक अपुर्ण आपण असतो … त्या पझलचा दुसरा भाग देवाने पाठवलेला असतो ….. आणि ती दोन अपुर्णत्त्व जिथे भेटतात ते जीवन यशस्वी असते वगैरे प्रेमाच्या संकल्पना मनात कायम होत्या माझ्या , स्वत:ही तसेच काही जगण्याकडे कलही आहे पण बऱ्याच गोष्टी बोलत नाही आपण सहसा!!  ’हसं’  होइल आपलं अशी एक सुप्त भिती बाळगत आपण आपल्यातलं सामान्य असणं मान्य करतो :( …. अमृता आणि इमरोज यांच्या वयातलं ’उलटं’ अंतर आज तितकसं बोचणार नाहीदेखील पण समाजासाठी अश्या बाबींची मान्यता ५०-६० वर्षापुर्वी निश्चित नव्हती . त्यातही लग्नाच्या रूढ बंधनात न अडकता ४० वर्षापेक्षा अधिक काळाचं त्यांचं सहजीवन हा विषयच भुरळ घालणारा. अमृताला आधिच्या लग्नापासून झालेली मुलं आणि इमरोज अविवाहित , वेगळं आहे नं रसायन !!!

समाजाचा समाजानेच रचलेला एक पाया आहे…. वर्षानूवर्षे माणसांच्या अनेक पिढ्या त्या पायाला धरून जगताहेत… आमच्या पायावर आम्ही उभे आहोत हा दावाही ठोकतात…. आपण कसलातरी आधार घेतलाय ही जाणिवच जिथे नाही तिथे त्या आधाराशिवाय उभं रहाण्याचं आपल्यात सामर्थ्य असतं हे भान कुठून येणार ??? एखादा येतो मग चुकार गडी जो समाजाच्या या पायाला आव्हान करतो…. त्याच्या मजबूत भिंतींपलीकडे पहातो…. अवघड असतं हे नेहेमी …. पायाला चिकटलेली माणसं अश्या स्वतंत्र उभ्या रहाणाऱ्या माणसाचे पाय ओढतात ….. त्यात जर ती एक स्त्री असेल तर विचारायलाच नको…. जे आजही कठीण आहे ते आजपासून अनेक वर्षांपुर्वी अजूनच कठीण असणार नाही का ….

प्रस्थापिताविरुद्ध बंड करायचाय नं मग समर्थ असायला लागतं !! कणखर , मजबूत वगैरे असावं लागतं …. अमृता तश्या होत्या !! इथे मुळात ’भरकटण्याचा ’ धोका फार …. केलेल्या प्रत्येक कृतीचं समाज स्पष्टीकरण मागत फिरतो अश्या वेळेस ….. ते द्यायचं नसतं कारण ते मुळात ज्यांना समजत नाही तेच ते मागत असतात…. आपला वेगळा सुर आपण लावायचा असतो, समाज ऐकणार असतो तो सुर पण आपण यशस्वी झाल्यानंतर …. मधला काळ मात्र मोठा बाका असतो …..

काही लोक ’आवडून जातात ’ आपल्याला. सुर जुळतात, झंकार ऐकू येतो , ते होत होतं अमृताबाबत.

’ इतिहास माझ्या स्वयंपाकघरात आला आणि भुकेलाच परतला  . ’ ही ओळ असो किंवा , ’तिच्या आयुष्याचे धुमसते निखारे काळाने हलवले , त्या चटक्यांनी त्याच्या बोटांवर फोड आले. ’ असो,  जसजसे अमृताच्या साहित्याचे हलके हलके दर्शन व्हायला लागते मनाचा गोंधळ उडायला लागतो…. शब्दांची वेगळीच बांधणी असते ही…. अमृताच्याच एका पुस्तकाचं नावं आहे ’अक्षरों की रासलीला ’ … किती योग्य आहे हा शब्द तिच्या रचनांसाठीही ….. शब्दच जणू खेळताहेत एकमेकांशी आणि घडवताहेत एक अप्रतिम काव्य !!! वीज चमकते नं क्षणभर कसा लख्ख प्रकाश दिपवतो आपल्याला तशी धारदार रचना मोहात पाडते .

कधी कधी एखादं पुस्तकं वाचायला घेतलं की आवडतं पण उगाच मन साशंक होतं की आपल्या या आलूलकीला तडा तर नाही नं जाणार…. तसे न होता अमृताबाबत कुठेतरी खात्री वाटायला लागते,  इथे मुळातं नातं विश्वासाचं आहे…. निडर, बंडखोर, स्वत:शी प्रामाणिक लोकांबद्दल मला नेहेमी आदर वाटत आलाय , त्यांच्याकडे स्वत:चा विकास करण्याचंच नव्हे तर समाजाला एक सकस दृष्टिकोण देण्याचं सामर्थ्य असतं.

१२२ पानं झपाटलेली …. पुस्तकात अमृता – इमरोजच्या तरल नात्याचे अनेक सुरेख, तरल पैलू , अमृताच्या साहिर लुधियानवीबद्दल कायम वाटलेल्या प्रेमाचे रंग, तिचं प्रसंगी कणखर नं एक स्त्री म्हणून स्वत:तलं स्त्रीतत्त्वाशी प्रामाणिक असणं सगळंच आहे…. काहितरी देऊन जाणारं पुस्तकं !!! आपल्याला अंतर्बाह्य समृद्ध झाल्यासारखं वाटवणारी एक सोबत….

इमरोजसाठीची तिची ’मै तेनू फिर मिलांगी ’ कविता तशी अनेकांना परिचयाची …. गुलजारांच्या आवाजातली ही कविता इथे ऐका !!!

पुस्तक वाचून संपलं पण एक अस्वस्थता सोबतीला आली…. ती अजून खाद्य मागत होती. अमृताचा अजून शोध घे म्हणून सांगत होती….. अमृताचं लिखाणं आता शोधायचं आहे ….. काही काही अपुर्ण पानं हाती लागताहेत …..

फाळणीचं दु:ख अनूभवलेली अमृता…. त्या व्यथेला कायम मनात बाळगलेली अमृता ….. हीर ची दास्तान लिहिणाऱ्या ’वारिस शाह ’ ला फाळणी दरम्यान अत्याचार झालेल्या मुलींबद्दलही लिही रे सांगणारी , ’ वारिस शाह ’ ही  कविता लिहिणारी अमृता ….

फाळणीच्या वेळी पळवून नेलेल्या मुलींचा नंतर शोध घेतला गेला त्यातल्या अनेक मुलींच्या पोटात कोणाचं तरी बीज वाढत होतं :( …. त्या बाळांबाबत अमृता लिहीते , ” उस बच्चे की ओर से – जिसके जन्म पर किसी भी आंख में उसके लिये ममता नहीं होती , रोती हुई मां और गुमशुदा बाप उसे विरासत में मिलते हैं ….. “

” मैं एक धिक्कार हूं -

जो इन्सान की जात पर पड रही …

और पैदाईश हूं – उस वक्त की

जब सुरज चांद -

आकाश के हाथों छूट रहे थे

और एक -एक करके

सब सितारे टूट रहे थे ….

’पिंजर’ पाहिला तो केवळ अमृतासाठी …. तिच्या प्रेमात पुन्हा एकवार पडण्यासाठी !!  फाळणीपुर्वी पाकिस्तानात असलेल्या एका गावातली’पुरो ’ (उर्मिला मातोंडकर )…. तिचे लग्न ठरलेय…पुर्वजांच्या वैमनस्यातून सुडाच्या भावनेने तिला त्या गावातला रशीद नावाचा मुसलमान पळवून नेतो…. हा रशीद मनाने अतिशय चांगला आहे…. त्याच्याकडे राहून आलेल्या पुरोला घरी कोणी स्विकारायला तयार नाही… नाईलाजाने पुरोचा रशीदशी निकाह होतो, तिला त्याला स्विकारावं लागतं …. परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरिही स्वत्व जपणारी…. खंबीर, लढावू वृत्तीची पुरो … आणि शेवटी ’रशीद’ च्या चांगूलपणामूळे, त्याच्यातल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधत धावणारी , त्याच्या नावाने हंबरडा फोडणारी एक साधी , हळवी स्त्री…. खऱ्या प्रेमापुढे सहज झुकणारी, त्याची कदर करणारी स्त्री !!  उर्मिला इथे ’पुरो ’ हे पात्र जगलीये… मात्र त्या पात्रात अमृता शोधता येते इतका तिचा ठसा मनावर उमटलाय….

ही पुरो सिनेमात शेवटी म्हणते, ” चाहे कोइ लडकी हिंदू हो या मुसलमान, जो भी लडकी लौटकर अपने ठिकाने पहूँचती है समझो की उसीके साथ पुरो की आत्मा भी ठिकाने पहूँच गयी…. ” !! स्वत: अमृताचे शब्द आहेत हे….

अमृताच्या सगळ्याच नायिका एक नवा प्रश्न सजगतेने सोडवणाऱ्या आहेत…. प्रस्थापितांविरुद्ध बंड करणाऱ्या तर कधी वेगळीच वाट शोधून पहाणाऱ्या…. मात्र त्या ’चुकीच्या’ कधिही नाहीयेत . म्हणजे अमृता एक शहाणपण स्वत:च बाळगून होती म्हणावं लागेल ….. एक सुधारक विचारांनी भरलेलं सुंदर मन होतं तिच्याकडे. तिची बुद्धिमत्ता तिच्या कथेतल्या नायिकांच्या संवादातून आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेतून दिसून येते.

स्त्री आणि पुरूषाच्या नात्याबाबत अमृताने तिच्या एका कथेतल्या नायिकेद्द्वारे मांडलेले विचार खूप काही सांगणारे आहेत….

मलिका नावाची ही नायिका आजारपणात दवाखान्यात जाते आणि तिथे एक फॉर्म भरून देतेय ….

वय विचारून झालय , आता डॉक्टर तिला विचारतो ’ तुम्हारे मालिक का नाम ?? ’ .. तेव्हा ही नायिका त्याला खडसावते मी घड्याळ किंवा सायकल नाहिये मला मालिक असायला, मी एक स्त्री आहे….. चपापलेला डॉक्टर तिच्या पतीचे नाव विचारतो…  तेव्हा ती सांगते ,” मै बेरोजगार हूं ! ’”  …..

गोंधळलेला डॉक्टर पुन्हा सांगतो मी तुझ्या नोकरीबाबत विचारत नाहीये … तेव्हा ती त्याला समजावते ,” हर इन्सान किसी न किसी काम पर लगा हूआ होता है, जैसे आप डॉक्टर लगे हुए है, यह पास खडी हुई बीबी नर्स लगी हुइ है ….. इसी तरह जब लोग ब्याह करते है, तो मर्द खाविंद लग जाते है और औरतें बिवीयां लग जाती है ….. वैसे मै किसी की बीवी लगी हुइ नही हूं!!! “

आता मात्र पुरत्या गोंधळलेल्या डॉक्टरला मलिका समजावते , की जगातल्या सगळ्या व्यवसायामधे ’तरक्की’ होते, जसे आज मेजर असलेले उद्या कर्नल होतात, परवा ब्रिगेडियर होतात आणि मग जनरल !! मात्र ’शादी- ब्याह ’ च्या या पेश्यामधे तरक्की होत नाही !!!

’ यात कुठली तरक्की होणार ? ’ असा डॉक्टरचा प्रश्न येतो .

तेव्हा मलिका उत्तर देते , ” डाक्टर साहब हो तो सकती है , पर मैने कभी होती हुए देखी नही । यही कि आज जो इन्सान खाविंद लगा हुआ है , वह कल को महबूब हो जाए , और कल जो महबूब बने वह परसों खुदा बन जाए …. “

किती वेगळा विचार आहे हा…. किती खरा आणि ….. साध्या सरळ सहज शब्दात , एका गुंतागूंतीच्या नात्याला बांधू शकणारी अमृता म्हणूनच इमरोजसोबत विवाहाच्या बंधनात न अडकता एक यशस्वी सोबत करू शकली.

ध्यास घ्यावा वाटतो या लेखिकेचा आणि तिच्या साहित्याचा!!! ’वादळ ’ पेलावसं वाटतं हे ….

खूप लिहावसं वाटतं खरं तर पण आटोपतं घेतेय आता…

एक मात्र खरं की …..

अमृताचं वादळी विचारचक्राचं अत्यंत सात्विक असणं , वेदनेचं पचवणं आणि त्यावर मात करून येताना अजून परिपक्व होणं समजलं की अमृता मनापासून खूप आवडते …. ते समजण्यासाठी तिला वारंवार भेटावं लागतं … विशेष मेहेनत नाही लागत अर्थात, तीचं लिखाणं आणि विचार तशी भुरळ घालतात आपल्याला समर्थपणे  !! 

अमृताचीच एक कविता आहे …. समाजाच्या बंधनांतून स्वत:ला न जखडता स्वतंत्र जगणाऱ्यांच्या व्यथांबद्दल आणि प्रवासाबद्दलच्या तिच्या कवितेतल्या काही ओळी….

पैर में लोहा डले

कान में पत्थर ढले

सोचों का हिसाब रुकें

सिक्के का हिसाब चले ….

और लगा -

आज मैने अपने घर का नम्बर मिटाया है

गली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है

हर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है …..

गर आपने मुझे कभी तलाश करना है….

तो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ -

यह एक शाप है – एक वर है

और जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे

समझना – वह मेरा घर है !!!

And that solves the mystery … माझ्यामते जर समाजातल्या काही रुढी परंपरांविरुद्ध मी बंड करत असेन , चुकीला चूक म्हणू शकत असेन तर माझ्यात ’अमृताचा ’ एक अंश नक्कीच आहे…. तेच नातं आहे माझं तिच्याशी !!!

म्हणून वारंवार मलाही तिला म्हणावसं वाटतं असावं ’ मै तेनू फिर मिलांगी ’ :)

_ लोकसत्तामधे ’फिरूनी पुन्हा भेटेन मी ’ नावाचा रवींद्र पाथरेंचा एक सुंदर  लेख इथे आहे.

( फोटो जालावरून साभार !! )