कोंबडी आणि उपवास….

कोंबडीची शंकरावर भलती भक्ती….. तशी ती होतीच देवभोळी…. शंकरभगवान, गणपतीबाप्पा, सगळ्या देवी-देवता सगळेच तिचे लाडके…. तिचे वागणे, बोलणे ही स्वच्छ असायचे तिच्या पांढऱ्या शुभ्र रंगासारखे….

कोंबडा तसा तापटच… तो रागावला की ती म्हणे, “अहो का तांडव करताय ??? ” … पण कोंबडीही कधी वैतागायची मग कोंबडा म्हणायचा, “अगं आज माझ्या पार्वतीने दुर्गेचं कालीमातेचं रुप का हो धारणं केलेय… ” …. कोंबडीचा राग तो कुठला… क्षणा दोन क्षणात राग पळून जाई… मग ती खुदकन हसे नी तुरूतूरू खुशीत इकडुन तिकडे पळे…. पंखांची उघडझाप करत तिने केलेला नाच पाहिला की कोंबड्याला कोण आनंद होई…. सकाळ आहे की दुपार तो विसरून जाई .. तो आपला जोरदार ललकारे “कुकूचsssssss कू !!!!” :)

कोंबडी त्या कुटूंबाची लाडकी… चिमणी सात आठं पिल्लं सतत तिच्या अवती भोवती बागडतं… आई म्हणेल ती पुर्वदिशा होती त्यांच्यासाठी…..

अशातच आली महाशिवरात्र…. कोंबडीने नवऱ्याला आणि पिल्लांना स्पष्ट बजावले, ’उद्या शंभो महादेवाचा दिवस…. समोरच्या घरातल्या काकू काय दाणे घालतील ते तेव्हढे खायचे पण किडा मुंग्यांवर ताव मारायचा नाही…. पवित्र दिवस आहे उद्याचा… :) ’ …. चिमूकली पिल्लं हसली…. :) .. कोंबड्याने मान तुकवली!!!!

महाशिवरात्र आली… पिल्लं उठली…. आईचा कुठे पत्ता आहे ते त्यांना कळेना… ती जरावेळ घूटमळली नी खेळायला पळाली….. दुपारची भूक लागली तर काकूंच्या अंगणात जाऊन कलकलाट करू लागली…. काकू आल्या त्या उशीरानेच… आल्या त्या फणकाऱ्यातच… बडबड करत होत्या काहितरी… कोंबडीच्या पिल्लाला काही कळेना…. त्या सगळ्यांनी दाणे खाल्ले…. आपली आई कुठे गेलीये या प्रश्नाने भंडावले आता पिल्लांना….. होता होता संध्याकाळ झाली…. पिल्लू कोंबड्याकडे आलं आणि म्हणालं ,” बाबा आई कुठेय ?? काकू काहितरी बडबडत होत्या आज…. म्हणाल्या या चॅनलवाल्यांना काही विधीनिषेध नाही उरलेला आजकाल…… मेलं शिवरात्रीच्या फराळाचं ताटं घेऊन बसावं तर चॅनलवर चिकनच्या रेसिप्या दाखवताहेत….. तो शेफ मस्त खाऊन स्वस्थ झोपला असेल आता… :( :( …. पण बाबा एक सांगा ’विधीनिषेध’ म्हणजे काय हो ???? ” …. पिल्लू निरागसपणे विचारत राहिलं…

“विधीनिषेध!!!!! ” ………….. “विधीलिखीत!!!!! ” …. कोंबडा अस्पष्ट पुटपूटला आणि मंद पावलं टाकत दुर निघून गेला….त्याच्या चालीतला नेहेमीचा डौल पिल्लू शोधतं राहिलं…..

पिल्लू बिचारं “विधीनिषेध” आणि “विधीलिखीत ” च्या घोळात अडकलं…………………

तिकडे कोंबडीचा उपास, महाशिवरात्र वगैरे गोष्टींशी सोयरं सुतकं नसलेल्या मस्त खाऊन स्वस्थ झालेल्या शेफने कॅमेरा बंद झाल्यावर विचार केला की आजच्या कोंबडीला काही चव आली नाही गड्या……..

कोंबडा हळूहळू चालतं शंकराच्या देवळाशी पोहोचला तेव्हा पहाट होत होती….. पुर्वेचा दूत रोजच्यासारखा देवाचे निरोप घेऊन येता झाला…. कोंबड्याच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला सगळे धुसरं दिसत होते…. कोंबड्यासमोर यायचे आज सुर्या्चेही धाडसं होइना….बराचवेळ तो ढगांआड लपला…. शेवटी सुर्याने हिंमतीने पाठवलेला एक किरण कोंबड्याकडे पोहोचला आणि म्हणाला ,” कोंबड्या तुझं ’पांढरं ’ फूल महादेवाला मिळालं रे!!!!!!!!!!!!!!!!!! “

ता.क.

मी स्वत: शुद्ध शाकाहारी असले तरीही ही पोस्ट मांसाहाराच्या विरोधात टाकलेली नाही. अर्थात पोस्टमधे दिलेली लिंक पाहिली की माझा मुद्दा स्पष्ट होइलच :) …. कुठल्याही कार्यक्रमाचे चित्रीकरण आधिच झालेले असते आणि त्यात शेफचा काहीही दोष नाही असे गृहित धरले तरी महाशिवरात्रीच्या दिवशी ’चिकन’  शिकवणे खटकले … आणि त्या अनूषंगाने आलेले विचार इथे मांडलेले आहेत!!!

ये दिल मांगे मोरया……

हे आमचं पहिलचं वर्ष गणपतीचं… म्हणजे आमच्या घरी गणपती बसवण्याचं…… आखाती देशात रहायला येताना अनेक शंका मनात होत्या, खरं तर शंका न म्हणता कुशंका हा शब्द जास्त योग्य होईल इथे!! आपले देव सोबत आणता येता येतील का? पुजा करता येईल का? स्तोत्र म्हणता येईल का? एक ना अनेक……. मस्कतला आल्यावर मात्र गेल्या साडे तीन वर्षात यातले एकूण एक प्रश्न सुटले….. ईथल्या दोन्ही मंदिरांमधले प्रसन्न वातावरण पाहिल्यावर तर आपण भारताबाहेर आहोत असेही वाटत नाही. एक आदर वाटत आलाय कायम ईथल्या राजवटीबद्दल…. शिव मंदिराबाहेर असलेल्या ओमानी फुलवाल्याबद्दल तर नेहेमीच कुतूहल वाटत आलेय मला!!!

तसे आता जग लहान झालेय सगळीकडे सगळे सामान मिळते, सणसमारंभ साजरे करणे तितकेसे अवघड राहिलेले नाही वगैरे विचार मनात आणत यावर्षी पासून गणपतीचा श्रीगणेशा करावा हे निश्चित केले…… :) आजची पोस्ट मुळी या गणपतीच्या निमित्ताने आलेल्या अनेक सुखद अनुभवांची उजळणी करण्यासाठीच आहे……

माझ्या माहेरी आणि नवऱ्याच्याही माहेरी गौरी गणपती आहे…… पण दोन्ही घरच्या रिती अगदीच वेगळ्या…… माझ्या माहेरी गणपती पाच दिवसाचा तर सासरी दिड  दिवसाचा…… मग आता या आमच्या नव्या घरात तो किती दिवसाचा हा कळीचा मुद्दा आला आणि गणपती हॅपनिंग होऊन फटाकेबाजीसह होणार याची खात्री पटली….. ;) अश्यावेळी मी नेहेमी माझ्या आजेसासुबाईंच नाव पुढे करते……… माझ्या लेकाच्या जावळाच्या वेळेस “जावळ रितीनुसारच झालं पाहिजे ” म्हणणाऱ्या सगळ्यांना आजीने उत्तर दिले होते, “रीत तरी काय असते, कोणितरी एकाने बनवलेली असते…..त्याच्याआधि नसतेच ना ती, मग ती न पाळल्याने नुकसान होणार हे कसे मानायचे?? एखाद्यात जर बदल करण्याची ईच्छा आणि कुवत असेल तर ते आपण स्विकारलेच पाहिजेत….. सणवार करणारच नाही असे नाही ना म्हणत ती, पद्धतच बदलतेय ना, बदलू दे!!! ” आजीला शरण गेल्यावर मराठवाडा Vs प.महाराष्ट्र या मुद्द्यात अर्थातच प.महाराष्ट्र जिंकला!!! :) आणि गणपती पाच दिवस येणार हे नक्की झाले!!!

गणपतीची मुर्ती पहायला म्हणुन चार दिवस आधि गेलो ते परतलो मुर्ती घेऊनच….. ईद आणि गणपती हातात हात घालून येत होते त्यामूळे दुकानं बंद असण्याची शक्यता आणि गणपती बाप्पाच्या मोजक्याच मुर्त्या असणार हा धोक्याचा मित्रमंडळींनी दिलेला ईशारा!!! गाडीतून परत येताना ’गणपती बाप्पा’…. मोरsssssयाsssss  :) ….. असे मस्तपैकी म्हणत म्हणत मुर्ती घरी आली. आणि घरचं नव्हे तर मनंही अमाप उत्साहाने भरून गेली….. कोणितरी वडिलधारं आलय घरी असेच वाटत होते सारखे!! मंगलमुर्ती हे नावं किती सार्थ आहे याची प्रचिती येण्याचे ते क्षण!!! :)

पुन्हा आला कळीचा पुढचा मुद्दा …. ’आरास’… आताचे युद्ध मराठवाडाVs प .महाराष्ट्र असे नसून बामू Vs पुणे युनिवर्सिटी असे रंगले….. आमच्याकडे होणाऱ्या प्रत्येक भांडणात हा मुद्दा आल्याशिवाय वादाला रंग येत नाही….. ’हो हो माहितीये तुम्ही ग्रेट पुणे युनिवर्सिटी वाले” …. ’आहोतच हं !! तुमच्यासारखे नाही बामू…. आमचे नावं बघ कसे मस्त!!!” वगैरे मुद्द्यांची आजकाल मुलं पण उजळणी करतात :) नशीब दोघेही BE अशीच डिग्री लावतो नाहितर वादाचा तोही एक महत्त्वाचा मुद्दा असता….. तर शेवटी एकमत होत आरास झाली….. पण शेवटी पुणे आणि बामू ने हे मान्य केले की only together च we can आणि भांडण मिटले!! :)

गणपती बाप्पा विराजमान झाले… घरं भरल्यासारखे वाटत होते अगदी….. पण ईद आल्यामूळे खरी अडचण झाली फुलांची… फुलेच मिळेनात… दुर्वा मिळवण्यात यश आले होते… मग फुलांच्या दुकानात खेटे घालून फुलं मिळवली…. गाडं अडलं ते जास्वंदाच्या फुलावर…. ते काही केल्या मिळेनात…… शेवटी लाल गुलाबाचे फुलं वाहून समाधान करून घेतले!! मुलं तर मनसोक्त गप्पा मारत होती बाप्पाशी… त्यांच्यासाठी माय फ्रेंड गणेशा हीच गणपतीची जवळची ओळख!!! खरं तर त्यांच्याचसाठी कशाला आपल्यालाही तर गणपती मित्रच वाटतो!! गौराबाईंनी मात्र धमाल केली, बाप्पाला नाच करून दाखव, गाणी म्हणून दाखव…… मोदकासाठी असलेल्या देवाच्या हातावर जेव्हा ती टाळी द्यायला लागली तेव्हा मात्र मी घाबरले….. असे करू नको म्हटल्यावर म्हणे की बाप्पानेच हात पुढे केलाय म्हणून टाळी देतेय :) …. त्या हातावर एक मोदक ठेवून हा प्रश्न मिटवला पण काही वेळाने मोदक काढून ठेवून तीने टाळी देणे सुरूच ठेवले…. या मुद्द्यावर रागावल्यावर ,” त्याला नकोय तुझा मोदक, केव्हाचा दिलास खाल्ला तरी का त्याने ? ? ” असा प्रश्न विचारून तिने मलाच गप्प केले!!!

रोज येणारे मित्रमंडळ, गप्पा, आमच्याच बरोबरचे ईतरही अनेकांकडचे गणपती…. आहाहा!! धमाल आली खरचं!!! गेल्यावर्षीच्या गणपतीच्या पोस्टवरून मला आमच्याच घराजवळ रहाणाऱ्या करंदीकर दादांचा फोन आला होता…. ब्लॉगमूळे झालेल्या अनेक उत्तम ओळखींपैकी दादांची एक… त्यांच्याकड्चे सहस्त्रावर्तन आणि महाप्रसाद यावेळेस मिळाले… गेले दहा वर्ष इथे त्यांनी हा स्तुत्य उपक्रम चालवलेला आहे!!! ब्लॉग नसता तर ही ओळख व्हायला उशीर झाला असता किंवा कदाचित झालीही नसती!!!  मराठी माणूस गणपती म्हटलं की हळवा होतोच याची प्रचिती तर येतच होती पण माझ्या बिल्डिंगमधल्या आणि आजूबाजूच्या बऱ्याच साऊथ ईंडियन मैत्रिणींनी आम्हीही अपवाद नाही हे या ४/५ दिवसात दाखवून दिले!!

जवळच असलेल्या एका रेस्टॉरंट मधल्या मॅनेजर आणि बाकिच्या ७/८ जणांनी आम्ही दर्शनाला येतो असा निरोप पाठवला….. भर उन्हात ती सगळी मंडळी चालत आली….. देवाचे दर्शन सहज होते का? असा त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच कळेना….मुलांशी गप्पा मारणारे, मराठी म्हणुन त्यातल्या एकाची ओळख, पण आज वेगळ्या रुपातले हे सगळे जण अजुनच आवडून गेले!!!मिठाईचा मोठा बॉक्स देवासमोर ठेवल्यावर मात्र माझ्या चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह त्यांना दिसले असावे कारण “ताई अहो बिल केलेय या बॉक्सचे, तसाच नाही आणलाय काही!!! ” असे उत्तर त्यांनी हसत दिले!!!

आमच्याकडे येणारे दुधवाले आपल्या कोकणातले पण गणपतीच्या दिवसात नेमके आजारी….. मला सारखी मनात रुखरुख की दादांना आता काही गणपतीचे दर्शन होत नाही….. चौथ्या दिवशी ते आले आणि देवासमोर हात जोडून १० मिनीट डोळे मिटून बसून राहीले….. गणपतीला जास्वंद मिळत नाहीये ही माझी रोजची कुरकूर अर्थातच त्यांच्यासमोरही झालीच….. ते गेले आणि अर्ध्या तासाने पुन्हा आले ते पिशवीभर जास्वंदाची फुलं/कळ्या घेऊनच…. :) मस्तपैकी मोठा हार घातला देवाला…..

आले गेले सगळे विचारत होते जास्वंद कूठे गं मिळाला… म्हटलं देवाने पाठवला :)

शेवटी आला पाचवा दिवस, विसर्जनाचा दिवस…… अजिबात करमत नव्हतं….. गौराची भोकाडारती सुरू होती… गणपतीबाप्पाला मी पाण्यात टाकू देणार नाही या मतावर ती ठाम होती….. शेवटी बाप्पाला स्विमिंग येतं हा मुद्दा जरासा पटला असावा तिला, पण आम्हाला परवानगी मिळाली!!! नाही म्हटले तरी विसर्जन कसे पार पडते याबद्दल जरा धाकधूक होतीच….. म्हणून घरीच आरती केली, म्हटलं समुद्रकिनारी पटकन विसर्जन करायचे !!! किना्ऱ्याला पोहोचलो….. बाप्पाला बॉक्स मधे घे हा नवऱ्याचा सल्ला मी ऐन वेळेस विसरल्यामूळे मी अगदी भारतीय पद्ध्तीने मुर्ती हातात घेतली होती.

गाडी थांबल्यावर एक  ओमानी नावाडी बोटीत बसायचे आहे का म्हणून विचारायला आला…… हातातली मुर्ती पाहून म्हणाला, “God, Ok come!!!”… त्याच्या मागे बोटीत जाऊन बसलो, एकीकडे रुखरुख एकीकडे जरा काळजी असा प्रवास होता….. समुद्रात बरेच पुढे गेल्यावर बोट थांबली आणि आम्ही मुर्तीचे विसर्जन करायला सुरूवात केली आणि अचानक त्या अरेबिक नावाड्याने विचारले, “No prayers, say some prayers!!!” आम्ही घरीच आरती केल्याचे त्याला सांगितले , पण मुर्ती विसर्जन करताना तो अचानक म्हणाला, “ला ईलाह ईल्लिल्लाह…..” आधि खरचं समजेना हा काय करतोय तर तो हसून म्हणाला, “God blessings to all of us!!! :) “…….

न विसरण्याजोगे बरेच काही अनुभवले या पाच दिवसात….. मन तृप्त झाले अगदी…… माणसातला ’माणुस’ किंवा माणुसकी असलेली अनेक माणसं भेटली की जीवन समृद्ध होतं याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला!!!

म्हणूनच म्हणतेय ,” ये दिल मांगे मोरया!!! :)

होळी……

आजची पोस्ट आहे खास माझ्या बालदोस्तांसाठी……..

आज मी माझ्या मुलांना  सांगितलेली होळीची गोष्ट आज सगळ्या बालदोस्तांसाठी इथे टाकतेय. तेव्हा ही पोस्ट ज्यांना वाचता येते त्या मुलांसाठी आहे आणि ज्या मुलांना वाचता येत नाही त्यांच्या आई-बाबांसाठी…(त्यांनी ही मुलांना वाचून दाखवावी म्हणून…..) .

तर, बालदोस्तांनो, फार पुर्वी हिरण्यकश्यपु नावाचा एक राजा होता. तो अतिशय पराक्रमी होता, त्याने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळही जिंकलेले होते. ब्रम्हदेवाने त्याला वर दिलेला होता की त्याला दिवसा किंवा रात्री, घरात वा घराबाहेर, पृथ्वीवर वा आकाशात, मनुष्य वा प्राण्याकडून , आणि अस्त्र वा शस्त्राने मृत्यु येणार नाही. त्यामूळे तो अतिशय गर्विष्ठ झालेला होता. त्याचे सोडून अन्य कोणत्याही देवाचे नाव घेतलेले त्याला आवडायचे नाही. या हिरण्यकश्यपूचा मुलगा होता प्रल्हाद. तो भगवान विष्णूंचा भक्त होता. तो सदैव देवाच्या नामस्मरणात मग्न असे, ही गोष्ट हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नसे.

सुरूवातीला त्याने प्रल्हादाला रागावून पाहिले, मारून पाहिले पण प्रल्हादाने काही देवाचे नाव घेणे बंद केले नाही. मग एक दिवस तर हिरण्यकश्यपू फारच रागावला, त्याने त्याच्या सैनिकांना सांगितले की प्रल्हादाला उंच डोंगरावरून ढकलून द्या…… सैनिकांनी तसे केलेही पण प्रल्हाद देवाचे नाव घेत राहिला, आणि भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. असेच प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या गेल्या पण दरवेळी देवाने त्याचे रक्षण केले. लोक त्याला ’भक्त प्रल्हाद’ म्हणत असत.

या हिरण्यकश्यपू राजाची एक बहिण होती तिचे नाव होते ’होलीका’.  या होलीकेला एक वर मिळालेला होता , तो असा की तिला आगीपासून कुठलेही भय नाही. मग हिरण्यकश्यपू आणि होलिकाने असे ठरवले की ’होलीका’ प्रल्हादाला मांडीत घेउन जळत्या आगीत बसेल आणि त्या आगीमधे ’भक्त प्रल्हाद’ जळून खाक होइल……. पण याहीवेळेस भक्त प्रल्हादाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विजय झाला आणि त्या आगीत ’होलीका’ जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. (या हिरण्यकश्यपूचा पुढे विष्णूने नरसिंहाचा अवतार घेउन वध केला!!!)

याच ’होलीका’ च्या नावावरून आजच्या दिवसाचे नाव आहे ’होळी’….. या दिवशी संध्याकाळी जी आग पेटवली जाते त्यात सगळ्या वाईटाचा अंत होतो आणि जे जे पवित्र ते वाचते असे मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा ’होलिकोत्सव’ साजरा केला जातो.

याच दिवसाची आणखीन एक कथा अशी की याच दिवशी श्रीकृष्णाने पुतना नावाच्या राक्षसिणीला मारले होते. आणि लोकांनी तिची ’होळी’ केली होती. संपुर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता.

महाराष्ट्रात होळीच्या आगीत नारळ भाजला जातो आणि या आगीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळीला शिमगा असेही म्हटले जाते. पौर्णिमेनंतर पाच दिवसानी येते रंगपंचमी. वेगवेगळ्या रंगांची उधळण करून हा रंगीबेरंगी सण साजरा केला जातो.

होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख कपाळाला लावून धुळवड केली जाते. ही राख आपलेही दुष्ट शक्तीपासून रक्षण करते असे मानले जाते.

तेव्हा आजच्या या होळीत आपण आपल्यातल्या दुर्गूंणांना आगीत टाकून देउ या, आणि ्होळीचा आशिर्वाद घेउन उद्यापासून एक नवी सुरूवात करूया!!!

तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, ईशान आणि गौरीकडून होळीच्या अनेक अनेक रंगीबेरंगी शुभेच्छा!!!!!!

आणि हो, संध्याकाळी होळीजवळ जाल तर जरा जपूनच, आईचा हात सोडू नका……आणि बाकिच्या अनेक ब्लॉग्स मधल्या मावशी काकांनी त्यांच्या (म्हणजे आम्हा सगळ्यांच्या) लहानपणीच्या होळीच्या आठवणी नमुद केलेल्या आहेत त्या वाचायला विसरू नका हं!!!!

हा आहे आजचा आमचा होळीचा प्रसाद……

आज संध्याकाळी होळी पेटल्यावर जोरात बोंब ठोकायला विसरू नका, आज सबकुछ माफ असते, एरवी कराल तर आई रागावेल….. :)

होळी रे होळी…………………

॥ विजयादशमी ॥

280920092589आज दसरा…….ब्लॉगच्या सगळ्या वाचकांना दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा……..

’दश-हरा’ म्हणजे वाईटाचा अंत…….अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी नवरात्रीनंतर येणारा हा दहावा दिवस………याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून याला ’विजयादशमी’ असेही म्हणतात.संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात हा सण विविध प्रकारे साजरा होतो. केवळ भारतातच नव्हे तर भारताबरोबरच हा सण जावा, सुमात्रा व जपानमधेही साजरा केला जातो. नेपाळचा तर हा राष्ट्रीय सण आहे.

या दिवशीचे आणखी एक विशेष असे की याच दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला.सलग नउ दिवस चाललेले हे युद्ध दहाव्या दिवशी संपले….तोच हा दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणुन द्यायचे आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करायची. मनातले राग, दु:ख सगळ काही दहन होणाऱ्या रावणाच्या पुतळ्याबरोबर तिथेच सोडायचे आणि एक नवी प्रसन्न सुरुवात करायची. अज्ञातवास संपवून निघालेल्या पांडवांनी याच दिवशी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली हत्यार बाहेर काढून त्यांची पुजा केली होती. ह्यादिवशी सिमोल्लंघन केले जाते…….पुर्वी राजे याच दिवशी नवे प्रदेश काबिज करण्यासाठी निघत असत.

मुलांची आद्याक्षरे गिरवण्यासाठी हा शुभ दिवस. दसऱ्याला वेदर्षी व्यासांची देखील पुजा केली जाते. स्त्रीच्या दुर्गारुपाचे यादिवशी पुजन होते. सगळ्या फॅक्टरी मधील मशीनची यादिवशी पुजा केली जाते.

आता यासगळ्यात मी काही नवी माहिती देतेय असे नाही पण माझ्या चिरंजीवांचा आदेश आहे की या सगळ्या फेस्टिवल्सची माहिती ब्लॉगवर टाक मी ते वाचेन….तेव्हा वरची सगळी माहिती आणि ही पोस्ट त्याच्या वयाच्या सगळ्या छोट्या दोस्तांसाठी.

माझ्या लहानपणी ’माझा आवडता सण’ या विषयावरच्या निबंधात दसरा किंवा दिवाळी हेच विषय हमखास असत कारण पटापट सुचणारे पानभर मटेरिअल याच सणांचे……..मग त्यात                         ’ दसरा हा सण मोठा….नाही आनंदा तोटा ’ हा उल्लेख आलाच. संध्याकाळी सगळी लहान मुले आवरून आटोपून एकमेकांच्या घरी सोने वाटायला निघत….त्यात एखाद्याकडे सगळ्यात मोठे आपट्याचे पान असे मग त्याचे सगळ्यांना अप्रूप वाटे. सोने लहानांनी मोठ्यांना आणि तिळगूळ मोठ्यांनी लहानांना द्यायचा असतो हे आई सांगायची. दुर्गामातेची पुजा, देवीच्या मंदिरात जाणे……रावणाचे दहन हे आकर्षण होतेच. आजही वणीची सप्तश्रूंगी देवी आठवल्याशिवाय रहात नाही. बाजारात असलेल्या झेंडूच्या फुलांच्या राशी…..पिवळी, केशरी गेंदेदार फुले आणि त्यात आंब्याची पाने ओवून केलेल्या माळा, तोरणे……..सणाची शोभा तर वाढवायचेच पण वातावरणात मांगल्य निर्माण करायचे.

त्या सगळ्याच्या आठवणीत……….आजची ही पोस्ट..मी आणि माझा मुलगा दोघांची. म्हणुनच या पोस्टच्या सुरुवातीलाच त्याने बनवलेले (मी लिहीलेले) कार्ड टाकत आहे.