रक़्स करना है तो–


सुख़न -21

एखाद्या वळणावर आयुष्य इतकं गुंतागुंतीचं होत जातं की पायांना चालायला वाट सापडेनाशी होते. चालण्याची इच्छा, सवय असते आणि मग हे पाऊलवाट न सापडणं फार क्लेशदायक अगतिक ठरत जातं… अश्याच एका वळणावर एक शेर भेटीला आला…

देख ज़िंदाँ से परे रंग-ए-चमन जोश-ए-बहार
रक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख

जिंदॉं म्हणजे तुरूंग… ह्या कैदेच्या पलीकडे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले रंग, उमललेली बहार बघ असं पहिल्या ओळीत अर्थाने म्हणणारा हा शेर… पुढील ओळीत, ‘रक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख’ म्हणतो… नृत्याची अभिलाषा मनात असेल तर पायातील बेडीत अडकू नकोस असं सहज सांगून जातो. मजरूह सुल्तानपुरींचा हा शेर मग आयुष्याचं जणू ब्रीदवाक्य ठरतो…

अर्थात पायातली ही ‘जंजीर’ एक रूपक असलं तरी ही जंजीर नेमकी कसली याचा शोध मन घेऊ पाहतं. परिस्थितीने पायात अडकवलेली की आपल्याच विचारांनी बांधलेली, समाजमान्य चौकटी रुढींची की अन्य कसली परंतु प्रत्येकाच्या पायात जणू एक साखळी नियतीने बांधलेली आढळून येते… कारागृह, कैद आणि पायी बांधलेली ही शृंखला हे रूपक घेऊन कवी आणि शायरांना कायमच व्यक्त व्हावं वाटलं हे सत्य मग मनापाशी पुन्हा पुन्हा येत जातं.

कृष्ण बिहारी नूर यांचा एक शेर इथे आवर्जून आठवतो. शेर म्हणतो…

ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं
और क्या जुर्म है पता ही नहीं

‘और क्या जुर्म है पता ही नही’, आयुष्य नावाची ही शिक्षा नेमकी का मिळालेली आहे याचं उत्तर नाही म्हणणारा हा शेर. अर्थात शेर दोन ओळीत त्यांच्या प्रकट अर्था इतकंच बोलून सहसा थांबत नाहीत. काव्याचे वेळोवेळी अनेक अन्वय लागणे हेच काव्याचे सौंदर्य. प्रत्येकाला आपल्या अनुभवानुसार क्षमतेनुसार शब्दांचे अर्थ गवसत जातात आणि वेळोवेळी कविता नव्याने पुन्हा उमजत जातात.

अवघ्या जगालाच बंदी शाळा म्हणताना गदिमा देखील सहजपणे ‘जग हे बंदी शाला जो आला तो रमला’, असं लिहितात …

कोणी न येथे मला चांगला, जो तो पथ चुकलेला

ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सवंगडी
हातकडी की अवघड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला…

गदिमा म्हणतात तेव्हा काव्यातील शब्दांची आशय संपन्नता जीवनातील अनुभवांच्या तराजूत मोजताना झळाळून उठते आणि ते काव्य कायम स्मरणात स्थान मिळवून जातं. ह्या अवघड बेडीबद्दल, जंजीर बद्दल फ़ानी बदायूनी लिहितात…

ज़िंदगी जब्र है और जब्र के आसार नहीं
हाए इस क़ैद को ज़ंजीर भी दरकार नहीं

‘जिंदगी जब्र है’, अन्याय तर होतोय पण ‘जब्र के आसार नहीं’, अन्यायाची सकृत दर्शनी लक्ष नाही दिसत नाहीत. अन्याय सहन करण्याची हतबलता इथे अधोरेखित होत जाते. आयुष्य नावाची ही कैद इतकी गमतीशीर की याच्यातील साखळदंड देखील प्रत्यक्षात दिसत नाहीत, शायर म्हणतो. अर्थात ते दिसत नसले तरी मनाला, भावनांना, अस्तित्वाला करकचून बांधून टाकणारे अदृश्य पाश असतात जे माणसांना अपार वेदना देणारे ठरतात.

‘फिर छिडी रात, बात फुलों की’, सारख्या गज़लेत

फूल खिलते रहेंगे दुनिया में
रोज़ निकलेगी बात फूलों की

सारखा विलक्षण आशावादी शेर लिहिणारे मख़दूम मुहिउद्दिन जिंदॉं बद्दल एक शेर लिहितात…

न किसी आह की आवाज़ न ज़ंजीर का शोर
आज क्या हो गया ज़िंदाँ में कि ज़िंदाँ चुप है

‘आह की आवाज, जंजीर का शोर’, तुरुंगातील काही आवाज अगदीच गृहीत धरलेले असतात आणि तेच जगण्याच्या बाबतीतही घडतं. या कैदेत आपली व्यथा मांडताना सहसा माणसं दिसून येतात. क़मर जलालवींचा एक शेर मग आठवतो… पिंजऱ्यात बंद पक्ष्याची उपमा देत आयुष्याविषयी भाष्य करताना शायर म्हणतो…

ज़ब्त करता हूँ तो घुटता है क़फ़स में मिरा दम
आह करता हूँ तो सय्याद ख़फ़ा होता है

माझ्या वेदनेच्या उच्चाराबाबत मी संयम बाळगला तेव्हा या तुरुंगात माझी घुसमट थांबेना, परंतु ज्या क्षणी मी दुःखोद्गार काढले त्या क्षणी मात्र मला या पिंजऱ्यात बंद करणाऱ्याची नाराजी मी ओढवून घेतली. पायातील बेडीचा आवाज, वेदनेचा हुंकार किंवा हताशपणे व्यक्त होणाऱ्या अश्रूंच्या उच्चारापाशी बाबा आमटेंची कविता आठवल्या शिवाय राहत नाही…

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही

‘हे गतीचे गीत’ किती मोलाचे असते या निष्कर्षाप्रत माणसं आवर्जून येतात आणि मग मजरूह सुल्तानपुरींचाच एक शेर म्हणतो…

रोक सकता हमें ज़िंदान-ए-बला क्या’ मजरूह’
हम तो आवाज़ हैं दीवार से छन जाते हैं

वेदनेची ही कैद ‘ज़िंदान -ए- बला’, आम्हाला कितपत अडकवून ठेवू शकेल याविषयी आम्ही साशंक आहोत कारण आम्ही ‘आवाज’ आहोत, भिंतींचा अडसर पार करून पुढे जाऊ शकतो.

आयुष्याच्या वाटचालीत एका आखीव सीमारेषेपर्यंतच जाण्यामध्ये कधी कधी शहाणपणा ठरतो. ‘अपनी अपनी हदों मे कैद होते है सब’, हे कैद असणंही अस्तित्वाच्या निरंतर अव्याहत गतीसाठी आवश्यक असतं हेही माणसं जाणून असतात. किनाऱ्यावर आलेली लाट भरतीच्या अखेरच्या सीमेला ओलांडून आली तर त्यातून साध्य परिणाम हा नुकसानच असतो इतकी शहाणीव माणसाला उपजतच असते.

आपल्या जन्माबरोबरच आपल्या असण्याच्या अनेक रुळलेल्या चौकटींचे बंधन आपल्याही नकळत आपल्याला वारशात मिळत जातं. या बंधनांचे पूर्वग्रह घट्ट होत आपणच आपल्या भोवती चौकटीची कैद आखत जातो. कधीतरी शिकता शिकता साधलेल्या लर्निंगला ‘अनलर्न’ करण्याच्या टप्प्यापासून पुन्हा एक नवी सुरुवात होते आणि भोवतीची चौकट उलगडून पक्ष्यांप्रमाणे आपल्याच पंखांचं बळ माणसं आजमावून पाहतात… ‘अपनी ही कैद से आप ही रिहा हो जाना बेहद जरुरी होता है’, माणसं कधीतरी नक्की शिकतात…

आणि मग ग़ालिब म्हणतो…

क़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ

‘कैद – ए – हयात ओ बंद – ए – ग़म’… आयुष्य नावाची कैद आणि त्याला असणारी दुःखाची किनार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मृत्यू हीच यातून सुटका असणार आहे त्यामुळे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते परिपूर्णतेने जगलं पाहिजे. त्याच्या साऱ्या रूपांना तितक्याच आनंदाने आत्मीयतेने स्वीकारलं पाहिजे…

मौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ

ग़ालिबचं म्हणणं थेट समजतं… पटत जातं…

आणि मग पहिलाच शेर पुन्हा आठवतो…

देख ज़िंदाँ से परे रंग-ए-चमन जोश-ए-बहार
रक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख

✍🏻 तन्वी अमित

पूर्वेकडचा प्रवास… १

कामानिमित्त आणि भटकंतीच्या सोलो ट्रिप साठी सिंगापूरला निघाले तेव्हा उत्सुकता, हुरहुर, प्रवास कसा होईल याची थोडी काळजी, नुकताच सर्जरीतून पार पडलेल्या लेकाची काळजी सगळ्या संमिश्र भावना मनात होत्या… आजवर आपण एकटीने अनेक प्रवास केलेले आहेत. वयाच्या सतराव्या वर्षापासून इंजिनिअरिंगसाठी होस्टेलला, नंतर नोकरीसाठी, अगदी भारताबाहेरही एकटीने केलेले सगळे प्रवास हे कायम पश्चिम दिशेला होते… परंतु पूर्वेला असणारा हा आपला पहिलाच प्रवास आहे ही जाणीव मनामध्ये एक हलकंसं हसू उमटवून जात होती. वयाच्या या टप्प्यावर देखील नवेपणाची गंमत वाटते हे छान वाटत होतं…

एकट्याने प्रवास करताना आपण एकटे आहोत एकाकी नाही हा विचार सोबत असणं किती छान असतं… मग प्रवास शोधासाठी होतो किंवा नेमकं काय शोधायचं आहे ह्या बोधासाठी होतो… गंमत म्हणजे प्रवास बाहेर सुरु होताना तो मनातही होत जातो आणि जाणवतं की ही प्रदक्षिणा स्वतः भोवतीच होत असते…

विमानतळावर पोहोचून बॅग क्लियरन्स वगैरे सोपस्कार पार पाडत बोर्डिंग पास हातात आला. आपण ज्या देशात चाललेलो आहोत तिथली करन्सी हवी असं काहीसं मनाशी ठरवत इकडे तिकडे पाहत असताना अचानक दिसली भारतीय कराटे टीमची लहानशी मुलं… ध्रुव, पार्वती व नाया ही मुलं थायलंडमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला निघालेली होती. त्यांचे कोच आणि त्यांच्याबरोबर उत्साहाने बागडणारी ही मुलं दिसली मग त्यांच्याशी जाऊन बोलणं आणि सेल्फी काढणं क्रमप्राप्त ठरल्याप्रमाणे तिथे गेले… छानशा गप्पा झाल्या, मुलांबरोबर फोटो काढले. सेल्फी मला काढता येतच नाही असं मुलांना सांगितल्यावर, ‘छान दिसतोय की पण आपण सगळे’, असं मुलं म्हणाली तेव्हा त्यांचं तेज माझ्याही चेहऱ्यावर नकळत उमटलं… ध्रुव मग हळूच जवळ येऊन मला म्हणाला, “मला आईची आठवण येत होती… बरं झालं तुम्ही भेटल्या”… ‘छान परफॉर्म करा, खूप शुभेच्छा’, असं मुलांना म्हणत मी पुढे मनी एक्सचेंज कडे निघाले…

अर्धा प्रवास होताना गाढ झोप लागलेली होती. त्यापूर्वीचा संपूर्ण आठवडा अतिशय धावपळीचा, टेन्शनचा, आज सकाळी नासिकहून निघताना मुळात आपल्यालाच बरं नव्हतं वगैरे अनेक विचार मनाने स्वतःपाशी ओढून घेत आपण दमलेलो आहोत वगैरे स्वतःला सांगितले असावे… त्याच भावनेतून जाग आली आणि समोरच्या स्क्रीनवर विमान पोर्ट ब्लेअर जवळून जात असल्याचं दिसलं. आता माझं विमान उडत होतं तो होता अंदमान समुद्र… केवळ शरीरानेच नव्हे तर मनानेही जाग येण्याचा तो क्षण. ज्या भगूर जवळून मी निघाले होते…तिथूनच इथे आलेले तात्याराव, त्यांच्या हालअपेष्टा, कष्ट आणि त्यातूनही त्यांनी कायमच केलेला तेजाचा लखलखता उच्चार सारं जाणवलं आणि मला तक्रार करायला खरंच किती जागा आहे या जाणिवेपाशी ‘भान’ परत आलं… एरवी सावरकरांविषयी फारसं न बोलणार आपलं मन, आपल्याच शहरात असणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाशी किती जोडलेलं असतं, ती आपुलकी किती हृदयस्थ असते असं वाटताना पूर्वेकडच्या प्रवासाची एक वेगळी बाजू जाणवली… आत्ता आलेली जाग आपल्याला बराच काळ साथ देणार आहे हे मग लक्षात आलं. ‘पूरब से सूर्य उगा… फैला उजियारा… जागी हर दिशा दिशा… जागा जग सारा…’ असं मनात आलं आणि तेव्हा बाहेर पहाटेने हळूहळू एक पाऊल टाकायला सुरुवात केली होती…

सिंगापुरात उतरले. विमानाबाहेर आले… पायलट तिथे उभा होता. ‘आजवरच्या माझ्या जवळपास पंधरा वर्षांच्या विमान प्रवासात मला पहिल्यांदाच मराठी भाषिक पायलट आहे, माझा प्रवास खूप छान झाला’, वगैरे त्याला सांगितलं आणि तन्वी नावाच्या या प्रवाशासाठी तन्मय नावाचा पायलट होता या गमतीवर दोघेही छान पैकी हसलो…

विमानातून आतापर्यंत एक काका बाहेर आले होते… त्यांच्याकडे नजर गेली आणि बाबांची आठवण आली. बाबांसारखेच दिसणारे हे काका पाहताक्षणी आवडून गेले. नकळत एकमेकांबरोबर चालतच आम्ही इमिग्रेशन पर्यंत आलो. “कुठल्या दिशेला जायचं आहे बघूयात.. आपण जाऊया, तुम्ही थांबा माझ्यासोबत”, वगैरे जुजबी बोलणं होत आम्ही इमिग्रेशनला उभे राहिलो… ‘On arrival health declaration form वगैरे सगळं आहे ना तुमच्याकडे?’, मी त्यांना विचारत असतानाच त्यांचा नंबर आला आणि या फॉर्मचं नाव ऐकताना त्यांच्या गोंधळलेल्या चेहऱ्याचं उत्तर पुढील दोन मिनिटातच मिळालं… फॉर्म नसल्यामुळे काकांना पुन्हा मागे जाऊन तो फॉर्म भरण्यासाठी पाठवलं तर माझं एमिग्रेशन पुढच्या एक दीड मिनिटात व्यवस्थित पार पडलं… तिथून निघावं की त्यांच्यासाठी थांबावं या विचारात उभी असताना विमानातील माझ्या सहप्रवाश्याला परिस्थिती लक्षात आली… ‘मी आहे काकांसोबत, तू हो पुढे’, त्याने मला खुणेनेच सांगितले. बरंच अंतर मधे असल्यामुळे केवळ हात जोडून काकांना नमस्कार केला आणि मी निघते असं सांगितलं… हवेतच हात उंच करून त्यांनी दिलेला आशीर्वाद मग मनापाशी पटकन ठेवून घेतला…

मुंबई विमानतळावर आई होत एका बाळाला जवळ घेतलं आणि सिंगापूरला उतरताना लेक होत काकांचे आशीर्वाद घेतले…

ओळखीच्या गर्दीतून आपली ‘ओळख’ हरवून जाताना अनोळखी वाटेचा अनोळखी लोकांमधला प्रवास बरेचदा खूप काही देणारा ठरतो. जागृतीचे क्षण साठतात… Awareness, Staying in the moment वगैरे केवळ शब्द न उरता अर्थापर्यंत पोहोचण्याच्या या क्षणांनी भरलेला एक संपूर्ण प्रवास असा मग पार पडला…

पुढे चार दिवस सिंगापुरात भरपूर भटकले… अनेक लोकांना भेटले. खूप काही शिकले आणि अनलर्न करत बरंच काही विसरूनही गेले… त्या साऱ्याविषयी लिहिण्याचा मानस आहे… लिहीनही…सध्या मात्र पूर्वेकडच्या प्रवासाविषयी इतकंच…

#सिंगापूर #singapore #solotravel

नवी नजर आणि स्वर्गाचा रंग !!!

मराठी किंवा हिंदी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांचे चित्रपट मी पहावे असे काही ठरवून झाले नाही, माझा सगळा कारभार ’सहजच’ या सदरात मोडणारा :). त्यात या दोन भाषांव्यतिरिक्त इंग्लिश सिनीमे पहाणे म्हणजे ते हिंदीत डब झालेले किंवा सबटायटल्स असलेले असेच आत्ता पर्यंत जणू ठरलेले होते. उगाच कान ताणताणून संवाद ऐकायचे कशाला, हा मुळचा आळशी स्वभावाला धरून असणारा प्रश्न पडायचा आणि मी इतर भाषिक चित्रपटांच्या वाटेला जायचे नाही.त्यामूळे पाहिलेल्या इंग्लिश चित्रपटांची यादी तशी लहानशीच होती / आहे !!

गेल्या सुट्टीत भारतातून येताना विश्वास पाटलांचं ’नॉट गॉन विद द विंड ’ पुस्तक सोबत आणलं…. इतकं अभ्यासपुर्ण नजरेने चित्रपटांकडे पहाता येतं हे नव्याने समजलं !!

तर याच नव्या दालनात एक लोभस दालन अचानक उघडलं माझ्यासाठी…. ’माजिद माजिदी’ नावाचं !!! एखाद्या प्रवासाला निघावं, वाट ठरलेली नसावी पण नेमक्या स्थळी जाऊन पोहोचावं असं काहिसं झालं या ठिकाणी !! माजिदीचा ’बरान’ पाहिला आणि लक्षात आलं हे वेगळं रसायन आहे…. हे झेपेल, आवडेल आपल्याला !!!

मी माजिदीबद्दल लिहावं किंवा एकूणात एखाद्या चित्रपटाबद्दल लिहावं असा काही माझा अभ्यास नाही हे माझं मत होतं, अजूनही आहे तरिही आज एक नोंद करावी वाटली म्हणून ही पोस्ट!!!

The Color of Paradise ” …. Rang -e- Khoda … नावाचा सिनेमा पाहिला आणि पोस्ट लिहायला घेतली … हे परिक्षण नाही हे आधि नमूद करायला हवे …. हे आहे एक भारावलेपण !!

मोहम्मद हा आठ वर्षाचा मुलगा… जो पाहू शकत नाही !! तो तेहेरानच्या एका शाळेत शिकतोय . ब्रेल लिपीत भराभर लिहू वाचू शकणारा मोहम्मद हा चुणचूणीत मुलगा आहे. शहर आणि त्या अनूषंगाने येणारे टेपरेकॉर्डर, मोबाईल फोन हे बारकावे लहानश्या प्रसंगातून सामोरे येतात. शाळेला सुट्टी लागलीये, सगळ्या मुलांचे पालक येऊन मुलांना घेऊन गेलेत…. मोहम्मद एकटा आपल्या वडिलांची वाट पहातोय ….. तितक्यात बाजूच्या झाडांमधे पक्ष्याचं एक पिल्लू घरट्यातून खाली पडलय…. त्या पिल्लाला लहानसा मोहम्मद ज्या आत्मियतेने घरट्यात परत ठेवतो ते फक्त पहात रहावे. गंमत म्हणजे डोळ्यांनी सिनेमा पहाताना आपली नजर मोहम्मदच्या त्या पक्ष्यावर अलवार फिरणाऱ्या बोटांबरोबर फिरते. घरटं मोडू नये म्हणून अलगद्पणे घरट्याला तो चाचपडत शोधतो तेव्हा त्याची धडपड मनात उतरते.

मोहम्मदचे वडील (हाशेम ) येतात , ते मात्र त्याला परत नेण्यास उत्सूक नाहीत …. शाळा मोहम्मदला ठेवून घ्यायला तयार नाही… तिथे सुरू होतो मोहम्मदचा घरचा प्रवास. वाटेत बसने, घोड्याने होणारा प्रवास अखेर एका निसर्गरम्य प्रदेशात येतो…. बसमधल्या खिडकीतून मुठीत हवा पकडू पहाणारा मोहम्मद अत्यंत निरागस दिसतो. या प्रवासात जाणवते मोहम्मदचे निसर्गाशी असलेले नाते…. पाण्याच्या प्रवाहातल्या गोट्यांमधे त्याला अक्षरं सापडतात. पक्षी त्याला साद घालतात… डोळ्यांनी पाहू न शकणारा मोहम्मद निसर्गाशी मनमूराद संवाद साधतो.

मोहम्मदचं गाव, घर , त्याच्या विलक्षण सुंदर दिसणाऱ्या लहानश्या बहिणी (हानये आणि बहारें ) , त्याची कष्टाळू आजी सगळच अतिशय मोहक आहे. गावातल्या शाळेत डोळस मुलगा चुका करत वाचतोय एक धडा, आणि मोहम्मदने मात्र ब्रेललिपीत तोच धडा न चुकता खणखणीत वाचलाय…. त्यावेळेस शिक्षकाच्या चेहेऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव पहाण्याजोगे. शिक्षकाबरोबरच आपण आधिच मोहम्मदच्या हुशारीच्या, जिवंतपणाच्या प्रेमात पडलेलो असतो. त्याच्या नजरेने जग पहायला लागलेलो असतो.

मोहम्मदच्या आजीची त्याच्यावर असलेली माया ठायीठायी दिसते…. तिचे सुरकुतलेले हात मोहम्मदला जगातले सगळ्यात सुंदर हात वाटतात. नातवासाठी राबणारे ते हात खरोखरीच खूप सुंदर आहेत. पुढे ही आजी जेव्हा घरातून निघून जाते तेव्हा रस्त्यात पाण्याबाहेर पडलेल्या तडफडणाऱ्या मासोळीला उचलून पुन्हा पाण्यात टाकते. हा प्रसंग चटकन विसरला जाणारा नाही…. सुरूवातीच्या एका प्रसंगात मोहम्मद चिमणीच्या पिल्लाचे प्राण वाचवतो आणि त्याची प्राणप्रिय आजी इथे तसाच एक जीव वाचवते…. त्या दोघांचं ते घट्ट नातं पहाताना paradise या शब्दाची महती समजते.

चित्रपटात एक महत्त्वाची किनार अजून आहे….

मोहम्मदच्या वडिलांना , हाशेमला दुसरं लग्न करायचं आहे …. त्यांना मात्र हा मुलगा ही या लग्नातली अडचण वाटतेय. एका साध्या कामगाराची ’मुलगा ’ आणि ’वैयक्तिक स्वार्थ ’ यातली घुसमट साध्या साध्या प्रसंगातून आणि वाक्यातून पुरेपुर उतरलीये. लग्नाची वेळ जवळ येते म्हणून मोहम्मदला दुसऱ्या गावातल्या एका सुताराकडे त्याचे वडिल सुतारकाम शिकायला पाठवतात. हा सुतार स्वत:ही अंध आहे. या सुताराला मोहम्मद सांगतो , “देवाचं माझ्यावर प्रेम नाही नाहितर त्याने मला डोळे दिले नसते का ?? ” एका लहानश्या मुलाचे ते प्रश्न, समज अस्वस्थ करून टाकतात. हाशेमच्या नजरेत वारंवार दिसणारी स्वत:बद्दलची ’दया’ आणि मोहम्मदचा राग करण्याबद्दल स्वत:ची वाटणारी लाज आणि चिड जाणवतात अगदी!!

मोहम्मदची आजी जग सोडून जाते तेव्हा तिच्यासमोर क्षणभर एक दिव्य प्रकाश चमकतो…. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत मोहम्मदचे वडिल त्याला परत आणायला पोहोचतात. येताना एका प्रचंड वेगाने वहाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ ते येतात. प्रवाहावरचा लाकडी पुल ओलांडताना अचानक तो पुल खचतो आणि मोहम्मद त्या पाण्यात पडतो. त्यानंतरचे त्याच्या वडलांच्या चेहेऱ्यावरचे भाव अतिशय सुंदर उमटले आहेत. एका क्षणासाठी थबकलेले , ही आपली मोहम्मदपासून सुटका आहे का अश्या विचारात पडलेले वडिल पुढच्या क्षणी प्रवाहात वेगाने वहाणाऱ्या मोहम्मदच्या मदतीला धावतात. चेहेऱ्यावरची ती अगतिकता स्पष्टच सांगते वडलांच्या मनातलं मोहम्मदबद्दलचं प्रेम…. अक्षरश: खिळवणारा क्षण …..

प्रवाहाच्या प्रचंड वेगापुढे हाशेम आणि मोहम्मद हारतात ….. बऱ्याच वेळाने हाशेम शुद्धीत येतो , समुद्रकिनारी काही अंतरावर त्याला मोहम्मद निश्चल पडलेला दिसतो….. त्याची हालचाल बंद आहे आणि तितक्यात पक्ष्यांचे आवाज येताहेत… आपल्याकडे, कॅमेऱ्याकडे हाशेमची पाठ आहे , त्याच्या कुशीत मोहम्मद विसावलाय…. मोहम्मदचा हात, त्याची बोटं आपल्या दिशेला आहेत…. पक्ष्यांच्या त्या आवाजाला मोहम्मद पहातोय , त्याची बोटं हलताहेत…. एक सुरेख सोनेरी प्रकाश त्याच्या हातावर चमकतोय ….. The Color of Paradise , निसर्गाच्या इतका जवळ असणारा मोहम्मद आता नंदनवनातल्या पक्ष्यांशी बोलतोय!!!

.

.

आपण स्तब्ध… शांत !!!

का आवडला हा सिनेमा इतका की पोस्ट लिहावी वाटली ???

मला वाटतं माजिदीचं अत्यंत साधेपणाने कथा सांगणं हे महत्त्वाचं कारण आहे !! आपली आजी लहानपणी परिची कथा सांगते नं, खूप आवाज नसतो त्यात…. आजीच्या उबेत विसावलेले आपण आणि हळूवार कानावर येणारा तिचा आवाज ….. त्या आवाजाची आठवण माजिदी करून देतो आपल्याला आणि जिंकतो !!! उगाच मोठमोठे संवाद नाहीत, रडारडी नाही… हाणामारी तर नाहीच नाही….. मोहम्मद नकोसा वाटण्याचा , आणि त्याचबरोबर या नकोश्या वाटण्याबद्दल अपराधीपणाने मन पोखरलं जाण्याचा त्याच्या वडलांचा संयत अभिनय असो की मोहम्मदला दुर नेलं तेव्हा मला त्याची नाही पण तुझी काळजी वाटतेय हे त्राग्याने स्वत:च्या मुलाला सांगणारी त्याची आजी असो , अभिनय जेव्हा अभिनय वाटत नाही तिथे आपण गुंतत जातो. लहानश्या प्रसंगातून मोठी कथा सांगण्याची या दिग्दर्शकाची हातोटी खरच वाखाणण्याजोगी आहे.

मोहम्मदला दिसत नाहीये तरिही तो खूप काही पहातो त्याच्या हाताने, कानांनी !!! आपण ते सगळं अनूभवू शकतो अगदी त्याच्याबरोबर… परंतू त्याचवेळेस सभोवतालचा हिरवागार सुरेख परिसर, फुलांचे, झाडांचे, पानांचे , पक्ष्यांचे , आकाशाचे अप्रतिम रंग पडदा व्यापून मनात उतरतात. Paradise ’नंदनवन ’ हा शब्द लागू पडतो इथे. फुलांपासून बनवलेल्या रंगाचे धागे , अनेकरंगी गालिच्यांची आठवण करून देतात. इराणचे गालिचे इतके सुरेख का असतात हे पटतं !!

हा संपुर्ण चित्रपटच एखाद्या कुशल हाताने विणलेल्या रंगीबेरंगी गालिच्यासारखा आहे…. मोहम्मदच्या नजरेने म्हणजे त्याच्या हाताने पाहिल्यासारखा तो आपल्याला तितकाच तरल , हळूवार जाणवतो …. “दिसतो ” !!! भावभावनांचा गालिचा !!! ही नजर नक्कीच मिळवण्याजोगी….. त्याने स्वर्गाचे, नंदनवनाचे रंग पहायला हरकत नाही!!

माजिद माजिदीच्या चित्रपटांच्या, दिग्दर्शनाच्या प्रेमात पडलेय मी सध्या …. एक नवी नजर मिळतेय, एका जुन्या ओळखीच्या माध्यमाची एक नवी ओळख होतेय …. तसेही कोणाला नकोय सांगा बरं वाऱ्याची अलगद, मंद झुळूक , पकडता न येणारी तरी जाणवणारी आणि मोहात पाडणारी … !!! 🙂

जो मुंतजिर न मिला वो…

शाळेत प्रांगणात शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने दहावी बारावीतल्या गुणवंतांच्या लागलेल्या मोजक्या फोटोंमध्ये तुझाही फोटो आहे हे आनंदाने सांगणारी मित्रमंडळी फोन – मेसेज करू लागली आणि ‘सोहळ्याला जायला जमणार नाही’ ह्या माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून लेक मला शाळेत घेऊन गेला…

२०२२ ची अखेर… आत्तापर्यंतचं वर्ष काही वेदनेचं, काही आनंदाचं, अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे बरंच थकव्याचं, रुटीन, मोनोटोनस वाटावं असं असतानाच शाळेतला फोटो आणि माझ्या फोटोबरोबर मित्रमंडळींनी अभिमानाने स्वतःचे काढलेले फोटो येऊ लागले तसं घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. तब्येत बिघडली तर बघू, मी आहे ना असं म्हणून लेक हट्टाने आईला गावी घेऊन गेला… फोटो पाहिला, शाळेत, मित्र-मैत्रिणींसोबत, शाळेत मिरवणाऱ्या फोटोसह कौतुकाने फोटोसेशन झाले… सगळ्या शिक्षकांचे मनातल्या मनात ऋण मानले… आपला फोटो इथे असण्यात त्या सगळ्यांचा किती मोलाचा वाटा आहे ह्या जाणीवेची समृद्धी मनभरून उतरली…

नासिकला परत निघताना दुपार झाली आणि मनापासून इच्छा असूनही शिंदे बाईंना भेटायचं टाळलं… पुन्हा कधीतरी निवांत येऊया असं स्पष्टीकरण का कोण जाणे पण त्या गाफील क्षणी मनाला दिलं… “बाईंना तुला भेटायची खूप इच्छा आहे. तुझ्या पुस्तकांबद्दल त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे… गावातून फार दूर निघालेली नसशील तर आत्ताही परत फिर आणि जा बाईंना भेटून ये…” मित्राचा फोन आला… नाही फिरले परत… दुपारी बाईंना त्रास द्यायचा नाही आणि सवडीने भेटायला यायचं हे पुन्हा मनात ठरलं…

डिसेंबर अर्धा सरताना मित्राचा पुन्हा मेसेज आला, ‘जायला हवं होतंस परत त्यादिवशी… बाई गेल्या आपल्या…’ …

आमच्या शिंदे बाई… बाईंच्या वर्गातली मुलं चौथीपर्यंतच एकत्र पण बाईंबदलच्या आदरयुक्त प्रेमाने आजतागायत जोडलेली… आजही भेटताना आमच्या असण्याचा, संवादाचा बाई एक महत्त्वाचा भाग… बाई गेल्या म्हणजे नेमकं काय वाटतंय, काय निसटून गेलं हे उमजून यायला मग खूप वेळ गेला… दिवस त्याच्या गतीने पुढे सरकत असताना मुलांना सहजपणे बोलले, “मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवायला हवी तुमची मस्ती… अभ्यास करताना लक्ष एका ठिकाणी का नसतं तुमचं?”

दिवस संपला आणि आठवली बाईंची दुर्बीण. कितीतरी वर्षांनी पुन्हा आठवली… आजकाल सगळ्यांकडेच असते ती कॅमेऱ्यात वगैरे… पण बाईंच्या दुर्बीणीचा धाक होता, ती ‘भारी’ होती…

इयत्ता तिसरीचा वर्ग, बाई सांगत होत्या, ”माझ्याकडे नं एक वेगळीच मस्त अशी दुर्बीण आहे, त्यातून मला तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरात डोकावता येते. तुम्ही अभ्यास करता की नाही, नीट जेवता का, आईला त्रास देता का, गृहपाठ करता का, शाळेतून घरी गेल्यावर घरात पसारा करता का? वगैरे सगळं मला दिसत असतं….. रोज काही मी प्रत्येकाच्या घरी पहात नाही हं… पण लक्ष असतं माझं…”

’बाई आम्हाला पहायचीये ती दुर्बीण…’ म्हणणाऱ्या आम्हा प्रत्येकाला मग सांगितलं गेलं की तुमच्यापैकी जो कोणी चौथीत वर्गात पहिला येणार त्यालाच ती दुर्बीण पाहायला मिळणार…

मला पहायचीच होती ती दुर्बीण… बाईंच्या घरात गोदरेजचे कपाट होते एक. त्या कपाटात होती ती दुर्बीण, बाईंनीच सांगितलं होतं तसं… त्या कपाटासमोरून जातानाही आतली दुर्बीण आपल्याकडे पहातेय असे वाटायचं… बाईंच्या मुलीला आम्ही सगळे ताई म्हणायचो, ताईला हळूच सांगून पाहिलं होतं एकदा की दुर्बीण दाखव नं आम्हाला. ‘चौथीत वर्गात पहिली ये… आईच दाखवेल तुला दुर्बीण’, म्हणून ताईने पळवून लावल्याचं आजही स्पष्ट आठवतंय 🙂.

टेलिस्कोपसारखी ती दुर्बीण घेऊन बाई एकेकाच्या घरात पहाताहेत, हे दृष्य मीच माझ्या कल्पनेत तेव्हा कितीतरी वेळा पाहिलं होतं. घरात दंगा करताना कधीतरी दुर्बीण विसरायची. आठवली की वाटायचं भिंतीला डोळे आहेत, त्यांच्यापलीकडे बाई आहेत, पहाताहेत आपल्याकडे. स्वत:चं एकदम शहाण्या मुलीत रूपांतर व्हायचं… ती मुलगी मग अभ्यास करायची… बाईंना आनंद वाटेल असंच आपण वागलं पाहिजे असं वाटावं इतक्या बाई आवडायच्या… बाईंचा राग कधी आलाच नाही… घरात छान वागणाऱ्या मुलांना त्यांच्याकडे जास्त खाऊ मिळायचा. मला तर नेहेमीच. म्हणजे नक्की दुर्बीण होतीच हा विश्वास पक्का झाला होता…

मधली सगळी वर्ष आता डोळ्यासमोरून सरकत गेली…. या सगळ्या वर्षांच्या एका बाजूला मी आणि दुसरीकडे बाई. चौथीत पहिला नंबर आल्यावर बाईंकडे जायलाच हवं होतं. पाचवीत शाळा बदलली. तरीही जायलाच हवं होतं. आला होता नं पहिला नंबर, मग हक्काने ते कपाट उघडायलाच हवं होतं…

बाई होत्या उंचीला लहानश्या. आत्ताच्या माझ्या उंचीपेक्षा नक्कीच कमी. शाळेत त्यांच्या साडीला कायम हात लावून पहायचे मी. चिमटीत पकडली ती साडी की चूरचूर आवाज यायचा. मी तो आवाज ऐकण्यात रमले की कधीतरी बाई हसून रागवायच्या, खेळ थांबव तुझा आणि गणितं घे सोडवायला. साड्या तश्याच नेसत असतील की बदलला असावा पॅटर्न बघायला हवं होतं. चांगलं वागलं की बाई बक्षीस द्यायच्या, आयुष्याचा विचार करता ग्रॅटिट्युडच वाटतो, बाई बघतच होत्या म्हणजे माझ्याकडे. मी मात्र वळून पहायला विसरले. बाई किती बेमालूम फसवलंत आम्हाला दुर्बीणीच्या नावाने, त्यांना म्हणायला हवं होतं. त्यांना पुन्हा एकदा स्वच्छ, नितळ हसताना आपणही जुन्या निरागसतेने हसायला हवं होतं…

……………

ग्रुपवर दुसऱ्या दिवशी बाईंचा फोटो आला… तेच तसंच स्वच्छ हास्य… फोटो पाहिला आणि मनातलं मळभ दूर झालं… त्यांचं हसणं माझ्या चेहऱ्यावर उमटायचं तसं पुन्हा उमटलं. छानच वाटलं एकदम… काही माणसं जात नाहीत… ती आपल्या जगण्याचा भाग असतात. एखाद्या प्रसंगात हे प्रकर्षाने जाणवतं इतकंच. बाईंचा फोटो आणि शाळेतला माझा फोटो पुन्हा पुन्हा पाहिला… त्या सोबत आहेतसं वाटलं.

‘उशीर करू नये भेटायला, वाटलं की भेट घ्यावी…’ बाई पुन्हा रागे भरल्या… ‘पुन्हा नाही करणार बाई…’ मनानेच मनाशी कबुली देताना डोळे वहायला लागले…

……………

जो मुंतजिर न मिला वो तो हम हैं शर्मिंदा,
कि हमने देर लगा दी पलट के आने में
(मुंतजिर -वाट पाहणे)

२०२३ चा संकल्प वगैरे काही केला नाही… हो पण उशीर करायचा नाही हे तेवढं मनात ठरलंय पक्कं… बाईंची दुर्बीण पुन्हा आठवणीत आली… माझ्या हसण्यात बाई गवसल्या… काहीतरी गमावताना काय कमावलंय आठवत गेलं… दुर्बीण दिसली नाही, दिसणार नाही पण ‘नजर’ आलीये हे खरं…

#MomentsOfGratitude #सहजच

बिछडना है तो झगडा क्यूॅं करे हम…

The problem is that She thinks he will change
No… He won’t
And
The problem is that He thinks she won’t leave
No… She will

कधीतरी वाचलेलं हे वाक्य वारंवार मनाच्या पार्श्वभूमीवर उमटत होतं The Threshold पाहताना. नीना गुप्ता आणि रजत कपूर, दोन्ही अतिशय लाडके कलाकार असलेला चित्रपट. साधारण साठीतलं एक जोडपं. रूढार्थाने चित्रपटाची म्हणून असलेल्या भाषेचे सगळे संकेत बाजुला ठेवत ह्या जोडप्याच्या आयुष्यातला केवळ एक दिवस पडद्यावर दिसत जातो. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न नुकतंच पार पडलेलं आहे आणि त्यानंतर तिने ते घर सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केल्यानंतरचा तो एक दिवस… अत्यंत महत्त्वाचा निर्णायक दिवस. कथानक संथपणे पुढे सरकणारं आणि त्या संथपणातलं प्रवाहीपण जाणवत जाणारं. कथा केवळ एका दिवसापूर्ती असली तरी संपूर्ण आयुष्याचा पट त्या दिवसामागे घेऊन उभी असलेली.

दिवसभर ते बोलताहेत फक्त एकमेकांशी. कुठलाही नाट्यमय आविर्भाव नसलेलं, अभिनिवेश नसलेलं एका कुटुंबातलं बोलणं… वाद-संवाद. अश्या प्रसंगी कोणातरी एकाची चूक सापडावी, एकाकडे झुकतं माप असावं, बाजू ’जस्टिफाय’ व्हाव्यात आणि आपणही कथानकाचा नकळत एक भाग व्हावे ही मुभा सामान्य प्रेक्षक म्हणून मिळावी असं कुठेतरी वाटून जातं, मात्र threshold beautifully manages to keep us at the threshold…  समोरच्या कधी हिंदी कधी इंग्लिशमध्ये होणाऱ्या संवादांकडे आपण संवाद म्हणून पाहत जातो आणि कलाकृतीने केवळ दर्शनीय नसावं तर तिने अनुभवातून मनापर्यंत उतरत जावं हा दिग्दर्शकाचा आग्रह मनोमन पटत जातो. एक बाजू घेता येत नाहीही आणि लहानसहान वाक्यांतून, आठवणींतून, प्रसंगांतून स्पष्ट होणाऱ्या ह्या दोहोंच्या वैवाहिक जीवनातल्या इतिहासाच्या दाखल्यांतून ती कधीतरी घेतलीही जाते. 
बॅकग्राऊंड म्युझिक, लाईटिंग, मोठमोठे पल्लेदार संवाद, नाट्यमयता ह्या साऱ्या पलीकडे प्रत्यक्ष आयुष्य असतं आणि ते नेमकेपणाने व्यक्त होणारे संवाद मनात उतरत जातात. कधी शब्दांतून तर कधी देहबोलीतून, कधी मूकपणे पुढे जाणारी भाषा… मागे वाहणाऱ्या नदीचा आवाज ह्यातून प्रसंग पुढे सरकतात तेव्हा, ’अरे हे तर रोजचेच आहे की’ असं सहज वाटून जातं आणि हेच कलाकृतींचं बलस्थान ठरतं. आपल्या सगळ्यांच्या घरात असतात ही दोघं. आपले काका-काकू, आजी- आजोबा, आई-बाबा… फॅमिली फोटोंच्या दोन टोकांना उभे असतात ते. कधी ठाम तर कधी बावरलेले, गोंधळलेले. एकमेकांच्या लहानमोठ्या, आवडत्या नावडत्या सवयींची सवय करून घेतलेले. आयुष्याचा मोठा भाग कर्तव्यपूर्तीसाठी देऊन टाकणारे…एकमेकांशिवाय राहणे हा पर्याय असू शकतो हे विचारातही नसलेले आणि एकमेकांसोबत राहण्याचा कंटाळाही आलेले. ह्यापेक्षा वेगळं आयुष्य असू शकतं प्रसंगी हे ही विसरून गेलेले. आपणही हळूहळू त्यांच्यासारखे होत असतो. त्यांच्या आयुष्याच्या, अस्तित्त्वाच्या, वैवाहिक जीवनाच्या विशिष्ट टप्प्यांवर त्यांना पडणारे प्रश्न आपल्यालाही पडणार असतात. 
अखेरच्या फ्रेममध्ये रजत कपूर एकटाच बसलेला आहे… सारं तसंच आहे जसं आदल्या दिवशी होतं… नदीचा आवाज येतो आहे आणि तरीही अमाप अपार शांतता आहे… ती नाहीये… तिच्या नसण्याची केवळ एक जाणीव आहे.
Threshold – सुरुवातThreshold – सीमारेषा

प्रत्यक्ष कृतीत येण्यापूर्वी किती वेळा मनातल्या मनात ओलांडला असावा तिने हा उंबरठा? 
“मी तुला तेव्हा ते करू दिलं म्हणून तू करू शकलीस”… एका लहानशा प्रसंगात रजत कपूर म्हणतो आणि त्यावर, “You let me? You LET ME?” हा तिचा प्रश्न आणि हा प्रश्न हेच तर साऱ्याचं उत्तर आहे अश्या अर्थाचं क्षणभर उमटलेलं हसू… असं कितीतरी न बोललं गेलेलं, प्रखरपणे वाटलेलं, वाटूनसं गेलेलं, जाणवलेलं, न जाणवलेलं, आयुष्याच्या वाटेवर घडलेलं सारं सारं… दर वेळी मनात साठत गेलेलं तुटलेपण, एकटेपण आणि सार्‍या कर्तव्यांच्या पूर्ततेनंतर आलेला समंजस शांत निर्णयाचा क्षण. 
किती तरी तरंग उमटवून जाणारा निर्णय. “मी नातेवाईकांना तू का गेलीस म्हणून सांगू?” असं तो विचारतो तेव्हा ती नाही देत उत्तर काहीच. आपण नसतोच उत्तरदायी कोणाला. आपल्या आयुष्याची, निर्णयांची, त्यांच्या परिणामांची जबाबदारी आपली असते… काही माणसं काही नात्यांना in comparison to something and someone मोजू शकत नाहीत… बरं वाईट, योग्य अयोग्य ह्या परिभाषा स्वत:साठी मांडू शकतात. ती मांडते इथे… त्याची बाजूही असते अर्थात पण त्या बाजूत तीचं ‘असणं’ गृहीत धरलं जातं आणि तिथून गोंधळ सुरू होतो. वयाच्या पुढल्या टप्प्यांवर ती अबोलपणे फक्त मान डोलावते, कशालाच सहमती असहमती काहीच व्यक्त करेनाशी होते… शून्यपणे केवळ समोरच्या वक्तव्याची नोंद घ्यायला लागते तेव्हा वाटतं ही पाटी कोरी व्हायला सुरुवात खूप काळापासून झालेली आहे… ह्या स्थितप्रज्ञतेची अस्तित्वावरची दाटसर साय खूप खळबळ निवल्यानंतरची आहे.
ह्या निर्णयाशी कधीतरी तो ही असतो पण बहुतेक वेळा तीच असते. Feminism, Male Ego, Patriarchy, विवाहसंस्था, नाती ह्या साऱ्यांवर बोलताना टोकं गाठली जातात अनेकदा… हे विषयही नाजूक आणि विचारही सारासार होण्याची अपेक्षा. शांत प्रगल्भपणे हे विचार होताना दिसतात, मत मांडताना आक्रमक आग्रही भूमिकेचा मोह टाळला जातो तेव्हा नात्यांमधले अपेक्षांचे, अपेक्षाभंगाचे व्रण मिटून जाऊ लागतात. विशेषतः त्या दोघांनी एका ठिकाणी असणं शक्य नसतं तेव्हा उठून जाण्यातला, जाऊ देण्यातला समंजसपणा मोहक वाटतो.
आयुष्याची प्रश्नपत्रिका थोड्याफार फरकाने सारखीच असली आणि प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या कुवतीनुसार उत्तरं शोधत असला तरी काही प्रश्नांची उत्तरं कायमच अपूर्ण राहणार असतात. किती सोसायचं, कुठे थांबायचं, कधी थांबायचं, तसंच पुढे जात रहायचं की दुराव्यातून जोडलेपण राखायचं, दु:खी असायचं की शांत स्वीकार करायचा?… प्रश्न आणि उत्तरं…. प्रश्नांची अखंड मालिका आणि उत्तरांचा अव्याहत शोध…
प्रत्येक क्षण पुढल्या क्षणाची सुरूवात… The Threshold…
मला मग जौन एलिया आठवत जातो… तो म्हणतो….
बिछडना है तो झगडा क्यूँ करें हमएक नया रिश्ता पैदा क्यूँ करे हम!

कोई नहीं है आत्मनिर्भर –


(महाराष्ट्र टाईम्स 15.05.21)

कोई नहीं है आत्मनिर्भर
न चंद्रमा न बादल
न समुद्र न तारे
सब टिके है
एक दुसरे के सहारे
— बोधिसत्त्व

गेल्या वर्षी संपूर्ण विश्वाला घेरुन सुरू झालेला कोरोनाचा प्रकोप आटोपत येतोय असं वाटतानाच त्याने अचानक उग्र स्वरूप गाठलं आणि आपण सगळेच पुन्हा एकदा लॉकडाउनच्या अपरिहार्यतेकडे ढकलले गेलो. यादरम्यान एक विलक्षण बोलकं चित्र अनेकदा समोर आलं, ज्यात कोरोनापूर्वी मानव स्वतःला जैविक साखळीच्या केंद्रस्थानी मानताना दिसत होता, मात्र या अतीसूक्ष्म अदृष्य विषाणूने त्याला जागं केलं आणि ‘हे विश्वची माझे घर’ या भावना विसरत चाललेल्या मानवाला या संपूर्ण वैश्विक कुटुंबातलं त्याचं स्थान दाखवून गेला. आपल्या भोवती संपूर्ण जग फिरत नसून या अखंड अव्याहत चालणाऱ्या विश्वाचा आपण देखील एक भाग आहोत हे सगळ्यांनाच पुन्हा उमजलं. ‘सब टिके है, एक दुसरे के सहारे’ ह्या वास्तवाचं भान येणारे अनेक क्षण गेल्या काळात आपण अनुभवले.

‘जागतिक कुटुंब दिवस’ ह्या शब्दाची व्याप्ती आता आपलं लहानसं कुटुंब ते आपण रहातोय तो भाग, शहर, देश आणि संपूर्ण विश्व अशी पूर्वीपेक्षाही अधिक गांभीर्याने केली जातेय. ह्याच्या अनेक कारणांपैकी लॉकडाऊन हे एक फार मोठं कारण आहे. घरांची दार बंद होत जाताना मनामनांना लागलेली कुलूपं मात्र उघडत गेली.

माणसं घराघरात बंद झाली आणि संवादांची मिटू लागलेली कवाडं किलकिली होऊ लागली. जागतिकीकरणाच्या रेट्यात रॅटरेसमध्ये धावताना परस्परांच्या होणाऱ्या भेटी म्हणजे वर्षाअखेरीस होणारे काही दिवसांचे आऊटींग अशी संकल्पना रूजली होती पण या निवांत भेटी लॉकडाऊन मुळे घरातच झाल्या. कुटुंब पुन्हा एकत्र आली. सुरवातीच्या काळात घरातूनच होणारे काम, मदतीसाठी कामवाल्या बायांचे नसणे अशा सगळ्याशी जुळवून घेतानाच एकीकडे संपूर्ण कुटुंबाने एकत्र स्वयंपाक करणे, घरातली काम करणे, एकत्र जेवणं होणे, गप्पा मारणे, आठवणींमध्ये रमणे, विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले आदल्या पिढीच्या बालपणीचे खेळ घरातील मुलांशी खेळणे यातून नात्यांमध्ये नवे सुरेखसे बंध निर्माण होताना दिसले. अडचणीतून वाट काढताना संपूर्ण कुटुंबाने एकत्र असणे हे किती महत्वाचे आणि हिम्मत वाढवणारे असते ही जाणीव झाली व त्यातून एक आशादायी चित्र सर्वत्र उभे राहताना दिसले.

नात्या नात्यांमधले जिव्हाळ्याचे बंध कधी उलगडले तर कधी दुरावलेली नाती सांधली जाऊ लागली. ‘वेळ मिळत नाही’ या कारणाने मागे पडलेले फोन नातेवाईकांना, ओळखीच्यांना, मित्रमंडळींना, सहकाऱ्यांना, प्रसंगी अपरीचीतांनाही सहज म्हणून किंवा मदतीच्या निमित्ताने केले जाऊ लागले. एकमेकांसाठी शक्य होईल त्या संपूर्ण मदतीसाठी सगळेच जण तयार झाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सोशल मीडिया व्हाट्सअपचे ग्रुप सारेच एकमेकांसाठी सरसावले व जीवनावश्यक वस्तुंपासून ते हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, प्लाज्मा वगैरे गोष्टींच्या मदतीसाठी देखील माणसं माणसांसाठी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे उभी राहिली.

आपल्या मूलभूत गरजा किती मोजक्या असतात या जाणीवेपाशी माणसं येऊ लागली. संकटकाळात केवळ पैसाच नव्हे तर कुटुंबातील आणि जोडलेली माणसं आपल्यासाठी उभी राहतात. आपली विस्तारित कुटुंब म्हणजे नेमकं काय आणि त्यांचं महत्त्व काय याची प्रचिती गेल्या दीड वर्षाच्या या काळात येत गेली. एकीकडे घरात अडकून पडण्याविषयी सोशल मीडियावर विनोद शेअर केले जात होते तर एकीकडे ‘आयसोलेशनमुळे’ कुटुंबातील सदस्यांच्या स्पर्शालाही माणसं पारखी होत होती. स्पर्श, सहवास, आपुलकी, जिव्हाळा, काळजी या लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींचं आयुष्यात असलेलं अनमोल स्थान कोरोनाकाळात अधोरेखित होत गेलं.

एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा पाया आहे. नातेवाईकांचा गोतावळा, व्हाट्सअपचे फॅमिली ग्रुप हे चित्र आपल्याकडे प्रामुख्याने दिसतं. लॉकडाऊन दरम्यान ह्या ग्रुप्सने सगळ्यांना जोडून ठेवलं. एकमेकांना वेळ देणे, संवाद साधताना हातातला मोबाईल दूर ठेवणे, घरातल्या आजी आजोबांकडून गोष्टी ऐकणे, आई-वडिलांनी मुलांचा अभ्यास घेणे यातून नात्यांमधील भावनिक ओलावा वाढला. कुटुंबातील भारतात नसणाऱ्या सदस्यांची एरवी पेक्षा अधिक काळजी केली गेली. पैसा, प्रतिष्ठा, समाज या साऱ्यांचाच साकल्याने उहापोह झाला. जाणाऱ्या माणसांच्या संख्येमध्ये जेव्हा ओळखीची नावंही येऊ लागली तेव्हा एकूणच कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व, अखेरच्या क्षणी कुटुंबांनी एकत्र नसणं म्हणजे काय याविषयी देखील विचार झाले… कुटुंबाचा आधार म्हणजे नेमकं काय हे गेल्या दीड वर्षांचं लॉकडाऊन सांगून गेलं.

कोरोनापूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबपद्धती की विभक्तकुटुंब पद्धती व त्या अनुषंगाने होणारी मानसिकता, एकूणच समाज मनावर होणारे परिणाम, भारतीय कुटुंब व्यवस्थेचे पाश्चात्यीकरण वगैरे असलेल्या चर्चेच्या मुद्द्यांचं स्वरूप आता बदललेलं दिसून येत आहे. अर्थात ही झाली एक बाजू. कुटुंबांनी एकत्र असण्याचे अनेक फायदे दिसले तरी काही ठिकाणी कौटुंबिक हिंसाचारासारख्या किंवा एकत्र असण्यातून उद्भवणार्‍या अतिपरिचयात अवज्ञा वाटाव्या अशा समस्याही निर्माण झालेल्या दिसल्या… गेल्या वर्ष दीड वर्षात घरातच राहिलेली मुलं, वृद्ध यांच्या मनांवर व एकूणच समाजमनावर या परिस्थितीचे दृश्य-अदृश्य परिणाम हे दूरवर टिकणारे आहेत. प्राप्त परिस्थिती आपण कितीही ‘न्यू नॉर्मल’ म्हणून स्वीकारली तरीही ती सगळ्यांना सुखावह व्हावी यासाठी प्रयत्न करताना कुटुंब एकत्र असणे गरजेचं असणार आहे. वैयक्तिक कुटुंब म्हणून आणि समाज एक कुटुंब म्हणून यासाठी आपल्याला सगळ्यांनाच एकत्रितपणे प्रयत्न करावे लागणार आहेत.

आज सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता जाणवत असली तरी संपर्क, संवाद, संवेदनशीलता, समजूतदारपणा, सौहार्द यांनी परिपूर्ण असणारे आपले कुटुंब हाच आपला ऑक्सिजन आहे ही जाणीव मात्र ह्या कठीण परिक्षेच्या काळाने करून दिली. आज लॉकडाऊन दरम्यान आपल्याला वेढून असणारी घराची सुरक्षित चौकट आणि मुक्तपणे अवघे आकाश कवेत घेणाऱ्या स्वप्नांना बळ देणारी ही पृथ्वी, दोन्हीं विषयी कृतज्ञता पुन्हा वाटू लागली. इथल्या समस्त सजीवांचे एकत्र कुटुंब पुन्हा एकदा मोकळेपणाने आणि अधिक समजूतदारपणे एकत्र येईल हीच आशा या जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने मात्र पुन्हा पुन्हा व्यक्त करावीशी वाटते…. वसुधैव कुटुम्बकम हे तत्व पुन्हा एकदा खरे होताना, ‘हे विश्वची माझे घर’ म्हणणाऱ्या ज्ञानियाचं पसायदान आज आर्ततेने पुन्हा मागावं असं वाटून जातं व ते आपल्याला मिळेल तेव्हा आपण त्याकडे अधिक सजगतेने पाहू हा विश्वास दाटून येतो…

…. तन्वी अमित

क्लब 60

एकाच फ्रेममध्ये दोन अतिशय आवडती माणसं. फारुख शेख आणि सारिका. क्लब 60 नावाचा हा सिनेमा लागलेला दिसतो तेव्हा तो दर वेळी पाहिला जातो याचं कारण ही दोन माणसं. अभिनेत्यांचं म्हणून मनात पक्कं स्थान असणं वगैरे मागे सुटून गेल्यानंतरही काही मोजके लोक मनात ठामपणे राहिलेत त्यातलेच हे दोघं.

या सिनेमापाशी पहिल्यांदा थांबले यातली एक गज़ल ऐकली तेव्हा…

रुह में फासले नहीं होते
काश हम तुम मिले नहीं होते

या शेरने सुरुवात होणारी गोड गज़ल. टिनू आनंदला संपूर्ण करियरमध्ये मिळालेलं इतकं सुरेख गीत हे एकमेव असावं असं क्षणभर वाटलं. चित्रपट काहीसा रुळलेल्या वाटेवरचा असला तरी ह्या फ्रेममधली ही दोन माणसं, ही प्रेम आहेत… यांना डावलून पुढे कसं जावं.

“मला फारुख शेख आवडतो”, असं आम्ही लहान असताना एक भाऊ म्हणाला होता. सिनेमाच्या मुख्य प्रवाहातली इतर नावं सगळे घेत असताना त्याने हे नाव घेतलं आणि संपूर्ण सुट्टीभर इतरांनी त्याला चिडवलं. भाऊ खरंच शहाणा होता, आम्हाला शहाणपण यायचं बाकी होतं. घरंदाज, खानदानी वगैरे शब्द व समंजस, सहज, सौंदर्याची ओळख व्हायला आयुष्य बरेचदा पुढे जायला लागतं. सुदैवाने माझं ते तसं गेलं असावं आणि मला फारुख शेख नावाची व्यक्ती समजू लागली. दीप्ती नवलची आणि त्याची मैत्री, त्या आश्वासक मैत्रीचे अनेक कंगोरे त्यांच्या मुलाखतींमधून, एकत्र कामांमधून उलगडले तेव्हा या दोघांच्याही अजून अजून प्रेमात पडत गेले.

‘जिंदगी धूप तुम घना साया’, म्हणजे नेमकं काय हे समजलं. कथा, साथ-साथ ते लिसन अमाया सारं पाहून झालं. त्याच्या जमीनदार असण्याविषयी, गर्भश्रीमंत व्यक्तिमत्त्वाविषयी दीप्ती जेव्हा जेव्हा बोलली तेव्हा त्यातलं सत्य मनाला स्पर्शून जात होतं. ‘गर्म हवा’ पाहिला तो बलराज साहनींसाठी, कैफी आजमींसाठी मात्र फारूखही ठळक लक्षात राहिला होता. असेच माया मेमसाब बद्दलही…

‘जिंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें’ च्या सुर्ख फुलांच्या वाटेवरून ‘बात फुलों की’ पर्यंत येताना फारुख नावाच्या ह्या विलक्षण ठहरावाची ओळख पक्की झालेली होती… उर्दू अदब आणि लहेजातलं बोलणं आणि त्याचं ते अलवार अस्पष्ट हास्य… “मला फारुख शेख आवडतो”, ये जवानी है दिवानी पाहणाऱ्या माझ्या लेकाला आता मी सहज सांगितलेलं असतं. रणबीर कपूरच्या वडिलांच्या लहानशा भूमिकेत तो फारुख शेखला पाहत असला तरी त्याने माझ्याच वाटेवरून का होईना पण ह्या अभिनेत्यापर्यंत पोहोचावं असं मला मनापासून वाटत जातं…

प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी
मेरे हालात की आंधी मे बिखर जाओगी

ह्या खरंतर फारुखच्या असलेल्या ओळी पण ‘हालात की आंधी’ वगैरे सारिका या अभिनेत्रीसाठी जास्त योग्य ठरेल असं काहीसं शापित राजकुमारी सारखं आयुष्य जगलेली ही विलक्षण सुंदर स्त्री. तिच्या डोळ्यांमधली काहीशी गूढ, वेदनेने पूर्ण, काही हरवून निसटून गेल्याची भावना, तिच्या चेहऱ्यावरची औदासीन्याची छटा, हसण्यात उमटणारी वेदनेची किनार सारं समजून येतं तिच्या आयुष्याचा प्रवास पाहताना. बालकलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षापासून सिनेसृष्टीत दाखल झालेली ही मुलगी कधीही शाळेत तर जाऊ शकली नाही पण सिनेमाचे सेट हेच आपले घर झाले असं सांगणारी. लग्नापूर्वीच स्वीकारलेलं मातृत्व, लग्नानंतर नव्हे तर दोन्ही मुलींमध्ये समाजाने भेदभाव करू नये म्हणून दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर लग्न करण्याचा तिने घेतलेला निर्णय सारंच मुख्य प्रवाहापासून खूप वेगळं. पुढे कमल हसनपासून विभक्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणारी ही धीराची आई.

एखाद्या विवाहित पुरुषाच्या आयुष्यात असणारी दुसरी स्त्री असणं म्हणजे वेदनेला स्वतःहून निमंत्रण देण्यासारखे आहे वगैरे ती बोलते तेव्हा तिच्या स्वरापेक्षा तिचे डोळे खूप काही सांगून जाणारे… अर्थात आयुष्याने आपल्या वाटेवर चालायला भाग पाडलेलं असलं तरी तिने न हरवलेली ‘ग्रेस’, किंबहुना वेदनेच्या समंजस स्वीकारातून, वाचनाच्या लक्षणीय वेडातून घडलेलं एक संयमित प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणजे आताची ती…

खोकर मैंने आज तुम्हे पाया हैं
फिर से मेरे साथ मेरा साया हैं

क्लब 60 मधल्या गाण्यातल्या ह्या आवडत्या ओळी ऐकते तेव्हा विचारांच्या प्रवाहातून मी पुन्हा चित्रपट पुढे पाहू लागते, पण या दोघांची ही फ्रेम पुन्हा पुन्हा मनात डोकावत जाते.

…. तन्वी

आज कल मैं मन का करती हूँ… चित्रा देसाई

आज कल मैं मन का करती हूँ
चित्रा देसाई

काव्यवाचन
तन्वी अमित

अनुभवांना नेमकेपणाने शब्दबद्ध करू शकणारी अल्पाक्षरी कविता मनाच्या पटलावर तिची नोंद दीर्घकाळ उमटवते…

अशीच एक कविता,

आज कल मैं मन का करती हूँ

आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत….

Do like share n Subscribe to the channel ✨

…. तन्वी अमित

एक सिरफिरे बूढ़े का बयान… हरीशचंद्र पांडे

एक सिरफिरे बूढ़े का बयान
हरीशचंद्र पांडे

काव्यवाचन
तन्वी अमित

प्रथमदर्शनी सहज वाटू शकणारी हरीश चंद्र पांडेची एकूण कविता जसजशी उलगडत जाते तिची आशयगर्भ मांडणी मनात दीर्घकाळ टिकून राहते.

एक सिरफिरे बूढ़े का बयान

आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत….

Do like share n Subscribe to the channel ✨

साधना… द भा धामणस्कर

साधना
द भा धामणस्कर

काव्यवाचन
तन्वी अमित

धामणस्करांची एकूण कविता सहज, संयत, प्रवाही, अर्थगर्भ… मराठी कविता कधी वाचणार अशी विचारणा मित्र मैत्रिणींनी केली… सुरूवात माझ्या अत्यंत आवडत्या कवितेपासून 🙂

साधना

आजच्या मार्मोरिस मध्ये.

नक्की ऐका.

प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत….

Do like share n Subscribe to the channel ✨