छोटा दोस्त-२ (छोटा जादूगार)
3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5
तरंग ब्लॉगवर परवा हा क्रम पाहिला पत्त्यांच्या जादूचा….यात कुठलेही एका प्रकारच्या १३ पानांना या क्रमाने लावायचे. आणि मग वन ते किंग अश्या स्पेलिंगनूसार ते ते पान काढून दाखवायचे. आपण प्रत्येकाने लहानपणी अश्या कितीतरी गमती केलेल्या असतात. आपल्याला समजलेली जादू कितीतरी वेळा करून दाखवायची आणि समोरच्याने कितीही वेळा विचारले की सांग ना कसे करायचे तरी सांगायचे नाही!!!!मग एखाद दिवशी हळूच मी तुला सांगते पण तू कोणाला सांगू नकोस, नाहीतर मजा नाही येणार करत एखाद्याला सांगायची.
या बाबतील आम्ही जाम लकी होतो कारण आमचे बाबा आम्हाला हे सगळे शिकवायचे त्यामूळे मैत्रीणींमधे आमचे नाक वर !!!!! तरंग ब्लॉगवरच्या पोस्टमूळे लहानपण आठवले आणि मग आला समोर माझा छोटा दोस्त….तर आज त्याला शिकवलेल्या काही जादू.
तूम्ही नाही शिकवल्या अजून मुलांना…मग शिकवा आणि मी ज्या विसरले त्या मला कळवा.
१. 3, 8, 7, A, Q, 6, 4, 2, J, K,10, 9, 5 या क्रमाला आम्ही एक गोष्ट सांगायचो. ती अशी की ३८७ वर्षापूर्वी एक(A) राणी(Q) होती ती ६४ वर्षाची होती, तिला २ मुले होती. एकाचे नाव जॅक (J) आणि
दुसऱ्याचे नाव किंग (K) होते. जॅकचे वय होते १९ आणि किंगचे ५. आता गंमत पहा………….असे म्हणत ती पाने क्रमाने लावायची आणि मग तो गठठा उलटा धरून त्या त्या स्पेलिंगनूसार ते ते पान काढून दाखवायचे.
२.ही जादू अतिशय सोपी आहे…आणि नवशिक्या लहान मुलांसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी. यात आपल्याकडच्या पत्त्यांमधील एक पान समोरच्याला बाहेर काढून लक्षात ठेवायला सांगायचे. मग ते पान आपल्या हातातल्या पत्त्यांत सगळ्यात वर ठेवायला सांगायचे. मग आपले हात मागे घेऊन एका हाताने काळजीपुर्वक ते पहिले पान उलटे ठेवायचे. म्हणजे समोरच्याने उलट ठेवलेले ते पान आता सुलट झालेले असेल…..काळजीपुर्वक हातातले पत्ते समोर असे धरायचे की ते सुलट झालेले पान आपल्या डोळ्यासमोर यईल आणि त्याचवेळेस कॅटचे शेवटचे पान समोरच्याला दाखवून विचारायचे की हे तूझे पान आहे का????? तो मजेत ’नाही’ म्हणत असताना आपण मात्र त्याचे पान पाहिलेले असते. हात पुन्हा मागच्या बाजूला घेउन ते पान पुन्हा पुर्वव्रत उलट ठेवून पत्ते हवे तेव्हढे पिसावे आणि मग जादूने ते पान शोधून दाखवावे.
३. ही देखील आणखी एक सोपी जादू…..९ पानांची. यात हे ९ पाने ३X३ अशी मांडावी. समोरच्याला एक पान मनात धरायला सांगावे…मग आधि उभ्या आणि नंतर आडव्या कोणत्या रेषेत ते आहे विचारून ओळखावे.
४. २१ पानांची जादू…ही शिकवायला आमचा दोस्त अजून लहान आहे……पण इथे लिहून ठेवले म्हणजे हा मागे भूणभूण लावून आज नाही तर उद्या शिकणार हे नक्की.

५. पत्त्यांचे घर…..पेशन्सची कमाल मागणारा खेळ.
आमचे बाबा सुट्टीत आम्हाला दरवर्षी पत्त्यांचा एक नवा खेळ शिकवायचे. बदाम सात, रमी, चॅलेंज, नॉट ऍट होम,झब्बू,गुलाम चोर, मेंढीकोट……कितीतरी. याहीवेळेस ते मस्कतला माझ्या घरी आले तेव्हा आम्ही आवर्जून पत्ते आणले होते. बदाम सात सारखाच खेळ पण काय मजा यायची…कहर म्हणजे जजमेंट खेळण्याची…..माझी आई हातात पत्ते आले की पटकन किती हात होणार ते सांगायची मग अर्ध्या खेळात विचारायची अरे पण अमित हुकूम काय आहे रे??? हसून हसून दमायचो आम्ही….नवरा रोज सांगायचा काकू हात सांगण्याआधि थांबत जा ना जरा……
पत्ते खेळणे……तसे वाईट मानणारी अनेक जण भेटली. माझ्या एका मैत्रीणीच्या आजीला आमचा फार राग यायचा, तिचे मत घरात पत्ते ठेवू नये……पण मला मात्र मनापासून आवडणारा खेळ. बावन्न पान आणि कितीतरी खेळांचे प्रकार. मला सगळ्यात आवडायचे ’नॉट ऍट होम’ कारण त्यात बरेचदा मी जिंकायचे……माझे बाबा मला बोटाने नंबर दाखवून ते कोणाकडे आहे ते खुणेने सांगायचे, ही झाली लबाडी पण ती न करताही मला जमायचे ते. चॅलेंज खेळताना माझ्या बहिणीच्या आधि बसणारा नेहेमी जिंकायचा कारण ही सतत चॅलेंज करायची….मग काय खरे पत्ते लावा आणि सुटा. मामाला पत्त्यांना मस्त कैची मारता यायची…..ती आम्ही प्रयत्नपुर्वक शिकलो होतो. आजीकडे पत्ते खेळताना मामा नेहेमी लबाडी करायचा आणि ती नेमकी मामी पकडायची…..मग त्यांचे भांडण ठरलेले. आम्ही आपले दोन्ही एंजॉय करायचो, पत्ते आणि भांडणही
मला माझच आश्चर्य वाटत होतं आज…..मुलगा टि.व्ही. त रमतो याचा बागूलबूवा करत बसण्यापेक्षा आपण ह्या साध्या गोष्टी त्याला शिकवल्या तर तो त्या आनंदाने शिकेल. पण आमची गाडी धक्का स्टार्ट….तरंग ब्लॉगने मला धक्का दिला आणि मी मुलाला हे सगळे शिकवले………त्या पठ्ठ्यानेही एकदाच शिकवल्यावर बिनचूक करून माझा हुरूप वाढवला आहे.
आता हळूहळू ईतरही लहानसहान खेळ त्याला शिकवायचे आहेत. राजा भिकारी सारखा वेळ खाउ खेळ असो की बिस्किटसारखा स्मरणशक्तीची परिक्षा घेणारा खेळ असो…..मि. बीन नावाच्या त्या कार्टून सदृश प्राण्यापेक्षा नक्कीच जास्त रंजक आहे.
मावशी ते मेड…..
’बस हो गया मॅडम अभी हमको मुलूक जानेका….’ नुकतीच माझ्याकडे येउ लागलेली बांग्लादेशी ’मेड’ म्हणत होती. म्हटलं ’का गं काय झालं???’ तर म्हणाली की अनेक वर्ष झाली बाहेर, आता घरही सावरलयं…..मुलूकची याद येते म्हणाली.
संध्याकाळी नवऱ्याला सांगितल तर हसायला लागला, म्हणाला मस्कतला काही तुमच्या नशीबात कामवाली बाई दिसत नाही. आजवर मारे सांगायचीस ना सगळ्यांना की माझ्याकडे बाई टिकतेही आणि चांगले काम करते. गेल्या तीन वर्षात पहिल्यांदा तुला तक्रार नाही आणि आता ही पळायच्या गप्पा करतीये…….
’मेड’ आपल्याकडची मोलकरीण, कामवाली बाई( सध्या ची Domestic Helper) ……आयूष्याचा एक अविभाज्य घटक. जिच्याशी बरेचदा ’तूझं माझं जमेना नी तूझ्याविना करमेना’चे नाते असते. ईथे आल्यावर कळले या ’बाई’ ची ’मेड’ झाल्यावर ती आमूलाग्र बदलते. ईथल्या मेड असतात श्रीलंकन, बांग्लादेशी किंवा दक्षिण भारतीय….पैसे द्यायचे तासावर. माझ्याकडची पहिली मेड हैद्राबादी होती. एका तासात वेजल्स, स्वीपिंग, मॉपिंग करणार म्हणे. म्हटलं कर बाई, मी तशीही अडलेला हरी आहे. मुळात धूणंभांडी, झाडूफरशी किंवा लादी ला या साहेबाच्या भाषेत ऐकताना मजा येत होती. ही ’मेड’ मला ताई न म्हणता मॅडम म्हणत होती. विनाकारणच मला ती परकी वाटत होती…दुसऱ्या दिवशी तर हद्द झाली, खिडकीतून बाहेर पाहिले तर ही कारमधून उतरली. म्हणे लेट हो गया तो हजबंड ड्रॉप किया. कर्म माझं इथे माझ्या हजबंडला अजून लायसन मिळालेले नव्हते…..म्हणजे मी ’बे’कार आणि ही कारवाली बाई. त्यातही माझ्या रोह्याच्या पुष्पाला मी सगळ्या कामाचे ३०० रुपये देत होते आणि हिला अर्ध्याच कामाचे ३०००रुपये……चार महिने बाई नाही लावली तर एक तोळा सोनं येतं या माझ्या युक्तिवादाला नवऱ्याने अजिबात दाद दिली नसल्यामूळे मला हे आता सहन करायचे होते. पंधरा दिवसातच कढईवर काळी पुटं चढणे, घर पुसून न पुसल्यासारखे वाटणे, डिटर्जंट संपणे सु्रू झाले. त्यातच माझे बाबा आमच्याकडे रहायला आहे…..ते तर एक दिवस वैतागून म्हणाले की मी करतो ही कामं पण ही ब्याद हाकल!!!!!
ती गेली, मग हे सगळे काम घरात घेतले. काही दिवस तो फार्स झाला आणि माहिती कळली की शेजारच्या बिल्डिंगमधे मराठी मेड आहे. मग पुन्हा तिला बोलावून दोन महिने सुख अनूभवले…..पुनश्च पहिले पाढे पंचावन्न झाल्यावर मात्र कानाला खडा लावला की पुरे आता पैश्याची नासाडी. अर्धी भांडी जर आपणच घासायची असतील तर पुर्णच घासू…..घरात व्हॅक्य़ूम केलं की झालं. शुक्रवारी नवऱ्याने मदत करायची…सगळ्ं कसं आखिव रेखीव. कागदोपत्री मस्त झाला प्लॅन. २-३ महिने पुन्हा मस्त मजेत….नवराही उत्साहाने मदत करत होता.मग भारत भेट झाली, पुन्हा महिना सुखात…..हळूहळू नवऱ्याने त्याच्या शुक्रवारच्या झोपेचे खोबरे होते या कारणाने अंग काढून घ्यायला सुरुवात केली….आणि मेलं दिवसभर आपण राब राब राबलो तरी काम ईथले संपत नाही याची मलाही प्रचिती येउ लागली.
अश्यावेळी मला आवर्जून आठवण येते ती माझ्या औरंगाबादच्या मावशींची. लग्नापुर्वी मी जॉब करत असताना माझ्याकडे येणाऱ्या या मावशी……काय काय काम करणार वगैरे काही बोली न करता माझ्याकडे यायला लागल्या, त्या आम्ही मुलाला घेउन चार वर्षानी औरंगाबाद सोडले तोवर येत राहिल्या. दिसेल ते काम झपाट्याने उरकणे, एकीकडे तोंडाचा पट्टा सुरू. मी घराबाहेर असल्यामूळे घराची एक किल्ली कायम त्यांच्याकडे असायची. संध्याकाळी दार उघडले की मिळायचे एक स्वच्छ नीटनेटके आवरलेले घर. मला मुलगा झाल्यावर मावशी सकाळी यायला लागल्या ……मुलाला आंघोळ घालणे, त्याच्या गादीवरची चादर बदलणे, त्याची दुपटी डेटॉलच्या पाण्यात भिजवणे असलं सगळ हायजिन ती अडाणी बाई पाळायची. जास्तीचे पैसे देते म्हटल्यावर मात्र त्या रागावल्या होत्या म्हणाल्या, “ताई अगं लेकरू आत्ता रांगत येइल आणि मला आजी म्हणायला लागेल…त्याला काय सांगायचे ही आजी तुझ्या कामाचे जास्तीचे पैसे घेते!!!!!” आल्याआल्या मी काही खाल्लय का ते पहाणं आणि लगेच गरम गरम बाजरीची भाकरी करणं हे त्यांच रोजचं काम……”माझा नातू मोठ्ठा साहेब होइल मला गाडीतून फिरवेल…..” माझ्या लेकाबद्दलची त्यांची स्वप्न आज लिहीतानाही माझ्या डोळ्यात पाणी येतेय!!!!! नवऱ्याशी मात्र नेहेमी वाद व्हायचे त्यांचे….ह्यानी खूंटीवर टांगलेल्या एकूण एक कपड्याला त्यांच्यामते घामाचा वास येत असायचा…आणि मग त्या ते सगळे कपडे भिजत घालून आपटुन धुवायच्या. याच्या मते काही मळत नाहीत येव्हढे माझे कपडॆ आणि मावशींना मात्र हे अजिबात पटायचे नाही, त्यांचे ठरलेले उत्तर ,”माणसाने स्वच्छ कपडा घालावा!!!! ” दर शुक्रवारी मस्त जुंपायची त्यांची!!!!!
लहान गावात तशी पटकन जुळतात ही नाती!!! साधी माणसं आणि लहान मागण्या असतात. प्रोफेशनल नसतात म्हणा ना!!! माझ्या मावशीकडे मालेगावला कामाला येणारी आमची शोभा मावशी, आज गेली २५ वर्षे बघतीये मी तिला. मावशीचे आणि तिचे अनेकदा रुसवे फुगवेही व्हायचे, पण ती तरी परत यायची नाहीतर मावशी तरी तिला घेउन यायची.
पुढे आम्ही नासिकला गेल्यावर आमचे मात्र या आघाडीवर थोडे हालच झाले…मनाजोगती बाई काही लवकर मिळेना. पण हा मोलकरणीचा ग्रह माझ्या राशीला जरा उच्चीचा असावा माझा कारण आम्ही रोह्याला गेलो…..आणि मला भेटली ’पुष्पा’. वयाने माझ्याबरोबरीची पुष्पा महिन्याभरातच माझी मैत्रीण झाली. सासर माहेर, आजुबाजूच्या बाया, भाजीपाला कुठल्याही विषयावर गप्पा मारत आमचे काम पटापट उरकायचे. मग फक्कड चहा घेतला की ती पळायची बाकीच्या कामांना. पण दिवाळी असो किंवा माझ्याकडे कोणी येणार असो लगबग पुष्पाचीच असायची. ना मला कधी तिच्या मागे घरभर फिरावे लागले ना सतत सुचना कराव्या लागल्या…..एखाददिवस तिलाही कंटाळा येणार हे मला मान्य होते, आणि ती आजारी पडू शकते, घरच्या जबाबदाऱ्यांसाठी एक तारखे आधि पैसे मागू शकते हे गृहित धरले होते. आमचे सूर जुळले होते हे खरे!!! मी दुसऱ्या डिलीवरीसाठी नासिकला गेले आणि आम्ही रोहा सोडले….मावशींसारखीच पुष्पाचीही माझ्या लेकीबद्दलची स्वप्न तशीच राहिली. लेक सव्वा महिन्याची झाल्यावर तिला आधी नेले रोह्याला कारण मी जन्मदाती आई असले तरी नऊ महिने तिची काळजी घेणारी ’ही’ आई तिची वाट पहात होती. आम्ही पोहोचण्यापुर्वी आमचे घर रांगोळी घालून लेकीची वाट पहात होते. निघताना पुष्पाने दोन्ही मुलांच्या हातात पैसे ठेवले. तिच्या त्या पन्नास रुपयांची परतफेड कशी करावी हा विचार नेहेमी मनात येतो!!!!!
या सगळ्याची सर येणारी मेड मिळणं हे एक स्वप्नच वाटते मला……इथे तर सगळा ’मोले घातले रडाया’ प्रकार आहे असे वाटत असताना आता ही बाई यायला लागली आणि लगेच दिवाळी आली. मूळची बांग्लादेशी मुस्लिम बाई पण मॅडम दिवाली का लिये घरका क्लिनिंग कबसे स्टार्ट करनेका असे विचारून माझ्या मनात जागा करून गेली. गेल्या महिन्यातला तिचा उत्साह, मुलांशी बोलणं सगळं पहाता आपला मेडशोध सुफळ संपूर्ण झालाय असे वाटत असतानाच तिने मला ’मुलूक ची याद’ चा दणका दिला. दिवाळीत एक दिवस खिडकीतल्या पणत्या उचलून त्या ठेवायच्या होत्या तिला, पण ही हात लावेना म्हणे आपको कैसे चलेगा मै हात लगाएगा तो?……म्हटलं बाई तू घासलेल्या भांड्यांमधे सगळा फराळ केला. त्यातच नैवेद्य दाखवला आणि आता हे काय नवीन!!!!! खुदकन हसली ती, पटकन पणत्या उचलल्या आणि पटापट घर आवरले.
तसही मनात येतं आपल्या आयूष्यातली मोलाची, हिंमतीची, तारूण्याची वर्ष आ्पल्या आईसाठी, भावांसाठी सहज ओवाळून टाकून दुर देशात काम करणाऱ्या या बाईच्या पावित्र्यावर मी कशी शंका घेणार!!!!!!! माझ्या आधिच्या मावशींसाठी, पुष्पासाठी काहितरी करायचे आहे हा एक विचार पण घरी जाण्यासाठी तिकीटाचे पैसे साठवणाऱ्या या सेलीनाला मात्र आज मी सांगितले की तिच्या या साठ्यातले शेवटचे काही पैसे माझ्याकडून न्यायचे आहेत तेव्हा लवकर बाकी रक्कम जमव आणि पळ तूझ्या घरी!!!!!!
जोवर आहे ही तोवर मात्र पुन्हा मस्त गट्टी जमणार हे नक्की…..मावशी ते मेड माझ्या मैत्रीणी…..नावं गावं वय वेगळं पण नातं तसचं, व्यवहारापलीकडचं…………………
आरसा……..
“मम्मा मी बाबाजवळ झोपणार……………….” —-कन्यारत्न
“नाही काल ही झोपली होती आज मी झोपणार……………” —चिरंजीव
“दादू काय आहे रे बाबाजवळ……तू लहानपणी मम्माजवळच झोपायचा. मला नाही करमत तूझ्याशिवाय!!!!!!काही नको बाबा बिबा, तू ये माझ्याजवळ…………तसंही माझं शहाणं शहाणं पिल्लूच माझं आहे!!!! बरं का छकूले दादा माझा आहे……………..”—-ईति आम्ही
“नाही दादा माझा आहे…..”—-कन्यारत्न
“माझा…”—-मी
“झोपा रे कोणीही कुठेही…………..”—–बाबाची एंट्री.
“ए बाबा तू थांब जरा!! दादा माझा आहे………..”—-कन्यारत्न
“ए छकूले आपण भांडतोय खऱ्या, पण खरा मेंबर यईल आणि आपल्या दोघींशी वाद घालेल या मालकी हक्कावरून!!!!!!!!!!!!!!!!!!!”——मी
आता छकूली शांत…तिच्या डोक्यावरून गेलय माझं वाक्य. पण चिरंजीव आडव्याचे उभे…………..
“म्हणजे माझी बायको ना!!!!!…”—- चिरंजीव
आता मी गार!!!!
“काहीतरीच काय रे…चला चला झोपा….”—-मी
“मम्मा मला माहितीये माझी बायको आली की तिचे आणि तुझे भांडण होणार…. “—-चिरंजीव
“तूला कोणी सांगितलं रे….मी आणि आजी काही भांडतो का????आम्ही नाही का म्हणत की आपण सगळे एकमेकांचे आहोत…we are a family म्हणून…..”—–मी
“नाही माझ्या क्लासमधे एक फ्रेंड आहे माझा, त्यानी सांगितलय की आपली वाईफ आली की तिचे आपल्या मम्माशी फायटींग होणार…”—- चिरंजीव
“अच्छा!!!!! अजून काय सांगतो हा तुझा फ्रेंड????…….”—–मी चांगलेच चपापले होते मी, पण पाणी किती खोल आहे अंदाज नको यायला……..मुले हे आपला आरसा असतात. घरात काय चाललय याचा मस्त आढावा घेतात आणि चारलोकात शोभा करतात. आणि याबद्दलची जागरूकता मी पाळतेच पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्या सासूबाई पाळतात. मुलं मोठी होताहेत…ते तुम्हालाच बघून शिकताहेत, एकटेच रहाता…..जपा त्यांना हे त्या दर फोनवर सांगत असतात. आम्हा दोघींमधे मतभेद असले तरी ते टोकाचे नाहीत….आणि त्यांना मुलगी नसल्यामूळे म्हणा किंवा मी त्या घरची सून होउन आज ८-९ वर्षे झाली म्हणा पण नातं गोडं झालय हे खरे!!!आणि आज हे पात्र माझीच शाळा घेत होते. म्हणजे माझ्या घरच्या पोळीभाजीला बाहेरच्या पिझ्झाचा गंध!!!! सरसावून बसले मी!!!!!!
“मी त्याला सांगितल की आई-आजी नाही पण मम्मा-बाबा नेहेमी भांडतात…..”—- चिरंजीव
“कधी भांडतो रे आम्ही????? काहीही आपलं!!! शाळेत अभ्यासाला जाता ना तूम्ही……तुमची ती बाई काय करते….पाढे पाठ करायला सांग त्या मित्राला तूझ्या!!!!!!”—-नवऱ्याची रिएंट्री
“अहो let me handle!!!!”—-मी
“हे बघ रात्रीचे दहा वाजलेत, झोपा आता!!!! सकाळी उठत नाही मग तुम्ही दोघं!!!! उद्या शाळा आहे त्याला…. लावलीये बडबड दोघांनी उगाच!!!!”—-नवरा
“थांब रे जरा…..बोलू दे आम्हाला!!!!”—मी
“हे बघा झालं तुमचं भांडण सुरू!!!!!!!”— चिरंजीव
“ह्याला भांडण नाही discussion म्हणतात रे राजा…..आता तू आणि मी पण बोलतोय ना, तसेच मम्मा बाबा बोलताहेत……”—-मी
आता ही असली discussions जरा रेग्यूलर आहेत आमच्याकडे, पण कार्ट्याने तेच पहावे…कठीण आहे.
“असो, पिल्लू मजा आहे रे तुमची. आम्ही पण लहानपणी अश्याच खूप गप्पा मारायचो स्कूलमधे!!!! अजून काय म्हणाला तूझा फ्रेंड!!!!!”……मी
आता या असल्या गप्पा मारायला आम्हाला ईंजिनीयरींगचे सेकंड ईयर उजाडले होते…लटेस्ट ट्रेंड नुसार ’बावळट’ होतो आम्ही हा भाग निराळा. एव्हाना नवरा भुवया उंचावायला लागला होता….याच्या मते मी उगाचच लहानसहान बाबी सिरीयसली घेत असते………………
“तो फ्रेंड म्हणे त्याचे पण पॅरेंट्स भांडतात!!!!”….. चिरंजीव म्हणजे हा सार्वत्रीक गुन्हा आहे तर!!!!
“पुढे……”……मी
“झोपा रे ssssssssssss………..”—-नवरा.
मी आणि पिल्लू एका चादरीत……मी विचारात, माझ्या आरश्यात हे वेगळेच प्रतिबिंब. काय करावे????? वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे व्हायचेच…..एक वेळ अशी येणारच की आई वडीलांपेक्षा मित्रांचा प्रभाव जास्त असणार. ह्या पिढीत जाणिवा गेल्या पिढीच्या आधि येताहेत….सगळं मान्य….कळतय!!!!! आता हे सगळं ’वळायलाही” हवं………
“मी त्याला सांगितलं की I love my mumma- baba, but I like my nani-babu more than anybody else!!!!!! अरे पण मम्मा तो जाम फनी आहे माहीतीये!!!!!”—-चिरंजीव
“आता हे काय मधेच!!!!…”—मी
“तुच तर विचारलं ना आम्ही काय गप्पा मारतो ते!!!!!!! Music sir म्हणाले मी चांगला म्हणतोय but I should practice more……., तू म्हणाली होतीस नवा पेन्सिल बॉक्स घ्यायचाय ना….कधी घेणार????”—–चिरंजीव
“झोपा बच्चा उद्या शाळा आहे……”—-मी
सकाळी नवरा म्हणाला, “काय मग डिटेक्टिव्ह ! समजली का सगळी रहस्य!!!! उगाच त्याच्या लेखी महत्व नसलेल्या गोष्टींना आपणच अवास्तव खतपाणी घाला……”
मला याचं पटतय…पण मी नाही ईतकी तटस्थ राहू शकत……, “अरे अस्ं कस्ं आपण पालक आहोत ना त्याचे, समजायला नको त्याचे भावविश्व !!!!!”
“अगं पण त्याला अशी प्रश्नावली झाडून काय साध्य होणार आहे?????”—–नवरा
“असं नाही जमत मला…..आपण मारे संस्कार म्हणायचे आणि बाहेर असा घोळ!!!! त्याचा गोंधळ नाही का होणार????”—–मी
“होईल ना!!!! होणारच….आपला नव्हता होतं????? यासाठीच तर आपण घरात पक्के रहायचे ना….त्याची मुळं पक्की असली की येउदेत ना वादळं वारे…….हबकून जाउ नकोस!!!!!”—–नवरा
“नाही हो नाही…..मला पटतं तुझं नेहेमी पण मला वाटलं काही सिरीयस की तू घे ते एकदम लाईटली!!!!!”…..मी
“मॅडम या केसमधे converse is also true!!!!!”—-नवरा
“झालास सुरू तू !!!! एक वाक्य खाली पडू देउ नकोस….”—-मी
“आपण पुन्हा भांडतोय का!!!!!”—- हसत हसत नवरा म्हणाला. आम्ही दोघेही हसायला लागलो ……
तेव्हढ्यात पिल्लू ओरडले, “मम्मा बाबा मी उठलोय….Good Morning!!!!!”
“Good Morning!!!!!” आम्ही एकदमच म्हणालो…………
सकाळच्या कोवळ्या उन्हात माझ्या आरश्यातले प्रतिबिंब स्वच्छ दिसत होते पून्हा!!!!!!!!!!!!!!!!!!!
जय हो!!!!
मराठी, हिंदी गाणी आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय……भारतात क्रिकेट,राजकारण आणि बॉलीवूड म्हणजे आवडीचे मुद्दे.
जुनी नवी हिंदी गाणी आवडीने ऐकणे हे न करणारा माणुस सापडणे दुर्मिळ. आता ह्या हिंदी सिनेमांच्या कथा आणि गाण्यांच्या चालींबाबत बरेचदा उचलेगिरी केली जाते हे ही सर्वश्रृत. स्वर सात आहेत त्यामूळे साधर्म्य असू शकते, किंवा प्रेरणा घेणे वगैरे स्पष्टीकरणही आपल्या परिचयाचे. यावर भाग्यश्रीने एक मस्त पोस्ट टाकली आहे, तुम्ही वाचलेली असेलच तरिही मी लिंक देतेय. असाच एक लेख वाचलाय शिरिष कणेकरांचा लोकसत्ताच्या दिवाळी अंकात, “चालचोरांची घराणी” नावाने.
असे डोळे उघडले तरी आपण काही गाणी ऐकणे बंद करणार नाहीये मला कल्पना आहे. आपले आनंदाचे, दुखा:चे, भेटीचे, विरहाचे सगळे सगळे प्रसंग आपण या संगिताच्या संगतीत साजरे करतो…….आपले हिंदूस्तानी संगीत भारतातच नव्हे तर जगभर सगळी कडे आवडते. मुळात संगीताला भाषा नसते……याचेच एक उदाहरण YouTube वर सापडले…..
हे गाणे पाहिले आणि पटले चाली स्वत:च्या असू दे वा चोरलेल्या आपल्या संगिताची आवड जगभर आहे…..थोडक्यात काय जय हो!!!!
ह्या गाण्यातले चायनीज कमेंट्स जर कोणाला समजले तर जरूर कळवा….कारण ज्या कोणा महाभागाने हा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याने भयंकर कमेंट्स टाकलेले आहेत…….
आ बैल मुझे मार….२
मागे एकदा माझी एक तेलगू मैत्रीण (या मैत्रीणीचा संदर्भ देण्यासाठी ही लिंक टाकत आहे…..त्या पोस्टमधली ती परिचित म्हणजे ही मैत्रीण) सांगत होती की आपके घर के वॅल्यूज देखके ऐसा नही लगता की आप नॉर्थ ईंडियन हो!!!!!! म्हट्लं, “अच्छा!!!!!” खरं सांगू का मी या लोकांच ज्ञानप्रबोधन करण्याच्या सहसा फंदात पडत नाही…….आता महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य देशाच्या पश्चिमेला येतात हे सामान्य भौगोलिक ज्ञान ज्यांना नाही अश्यांना काय समजावणार?????
आता हीच बाई परवा सकाळी माझ्याकडे आली आणि म्हणाली की ’हमलोग दिवाली पे नही आए आपके घर, pl. don’t misunderstand… वो क्या है की मेरे हजबंड किसी नॉर्थ ईंडियन फॅमिलीसे फ्रेंडशीप नही करना चाहते!!!!!!वो बिल्कुल कंफर्टेबल नही होते है नॉर्थ ईंडियन्स के साथ!!!!!’ कमाल आहे की नाही ज्या व्यक्तीला आपण बोलावलेलेच नसते ती येउन आपल्याला असले काही समजावयाला लागते………..आता याच बाईची मुलगी माझ्या घरी संध्याकाळी खेळायला आली की, “Aunty I’ll eat at your house”, म्हणून अनेकवेळा थांबलेली आहे….आमच्या घरच्या बिघडलेल्या नॉर्थ ईंडियन(?) वातावरणात त्या चिमूरडीचे काय हाल होतील अशी शंका या मात्यापित्यांना रात्री साडेआठ वाजताही येत नसे…..आणि आता चोराच्या उलट्या बोंबा सुरु होत्या. मला अजिबात आठवेना की मी हिला निमंत्रण कधी दिले होते….तरिही तासभर तिची बडबड ऐकली आणि तिला निरोप दिला.
भारताबाहेरून भारताकडे पाहिल्यावर दोन प्रमुख भाग दिसतात…..एक दक्षिण भारत आणि उरलेला भारत…..कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू सोडून बाकीचा भारत हा नॉर्थ ईंडिया असतो ही नुकतीच मिळालेली माहिती नवी होती. आणि या नॉर्थ ईंडियन लोकांना संस्कार, चालिरीती तत्सम काहिही नसून देशाचे नाव बदनाम करण्याचा सार्वत्रिक ठेका यांनी घेतलाय हे देखील समजले…….आखाती देशांमधे राहून या दक्षिण भारतीय लोकांकडे दुर्लक्ष करणे ही सोपी बाब नाही……तुमची कितिही ईच्छा नसली तरी संबंध येणारच. देशप्रेम, अखंड भारत वगैरे संज्ञा आपल्यासाठी, ते यांच्या खिजगणतीतही नसतात……केवळ आपली मातृभाषा माहित असलेले हे लोक कुठेही कसेही काम करण्याची चिकाटी या गुणावर जगभर पसरले आहेत.
एकीकडे हे विचार आणि दुसरीकडे का आली ही मला हे सांगायला ह्या संभ्रमात कामे उरकली आणि संध्याकाळी रहस्याची उकल झाली. दुसरी शेजारीण (ही तामिळ) आली माझ्याकडे……(यांना आम्ही दिवाळीत बोलावले होते) तिने सांगितले, “अरे तुने उसे नही बुलाया तो उसे बुरा लगेगा ना ईसलिये मैनेही invite कर दिया तेरी औरसे!!!!!!!” म्हणजे घ्या आता ……..आम्ही पाहूणचारासाठी येव्हढे प्रसिद्ध झालोय की आमच्या घरी येण्याबद्दल लोक परस्पर निमंत्रण देताहेत………………. आता मात्र अवाक झाले होते मी!!!!!!! मग मी या बाईला सकाळी घडलेला प्रसंग सांगितला. आम्हा दोघींच्या त्या तिसऱ्या मैत्रीणीने उधळलेल्या मुक्ताफळांची कल्पना दिली……….त्यावर हिने जे स्पष्टीकरण दिले ते ऐकता माझे डोळे खाडकन उघडले…………..त्यांना म्हणे कुठल्याश्या सत्संगामधे असे जाणवले होते की तिथे उपस्थित उत्तर भारतीय हे देवापेक्षाही शो ऑफ़ करण्यात मग्न होते. आता मात्र माझ्या कंटाळ्याचे रागात रूपांतर होत होते……..आणि हा चेहेऱ्यावर दिसत असावा. मुळात महाराष्ट्र हे देशाच्या पश्चिमेचं राज्य, आणि उगाचच कुठल्यातरी सत्संगाच्या सुतावरून ही लोक माझ्या घराचे (राज्याचे) संस्कार ठरवायला निघाले होते.
पुढे मला हे सांगण्यात आले की तुम महाराष्ट्रीयन्स बहूत प्रॉउड होते हो अपने आप पे, सिंपल कांदा पोहे खाके ऐसे बात करोगे जैसे पता नही कौनसा बडा डिश खा लिया………….सहनशक्तीचा अंत होता तो माझ्या!!!!! म्हटलं हो बाई आहोत आम्ही असे पण आमच्या वागण्यातले ईतके बारकावे तुम्हाला कळतात कारण तुम्हाला आमच्या राज्यात यावे लागते…….आम्ही नाही येत तुमच्या कडे, आमचे राज्य स्वत: संपुर्ण राज्य आहे. आमच्या राज्यात तुम्ही येता आणि तिथे राहून राज ठाकरेंविषयी बोलता पण आम्हाला तुमच्या राज्यातले येव्हढे नेतेमंडळी माहितच नाहीत, कारण ते कळण्याईतके देखील आम्ही अवलंबून नाही तुमच्यावर!!!!! येस्स्स!!!! आम्ही आहोत अभिमान बाळगून आमच्या राज्याचा, त्याच्या संस्कृतीचा…….कांदेपोह्याचा, थालिपिठाचा आणि वडापावाचाही……वाटतात ते आम्हाला अमृताहून गोडं!!!!!!!!!!!!!!!
म्हणजे विषय काय, आम्ही बोलतोय काय!!!! शेवटी घरी आले, नवऱ्याशी बोलले आणि एक निर्णय घेतला, पुनश्च या अश्या मंडळींना आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करू द्यायची नाही!!!!! प्रांतिय वाद घालण्याची आपल्याला गरज नसते कारण आपण जातच नाही कुठे पण आपल्यावर अवलंबून असणारी ही मंडळी आपल्यावर तोरा गाजवतात तेव्हा मात्र नको वाटायला लागतात!!!!!!!!!!!! महाराष्ट्राबाहेर जाणारे मराठी आणि महाराष्ट्रात येणारे अमराठी यांचे प्रमाण किती विसंगत आहे याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करून या मंडळींना आपल्यावर अरेरावी करण्याची सवय लागलेली आहे हेच खरे!!!!!!!!!!!!!
माझ्या आधिच्या पोस्टचा उत्तरार्ध म्हणून ही पोस्ट टाकतीये…….कदाचित विसंगतही वाटेल, पण या चर्चेमुळेच माझ्या मनात आधिची पोस्ट आली………आजही माझ्या घरी येणारे अनेक दक्षिण भारतीय आहेत, ज्यांच्याविषयी मला आपूलकी वाटते. या अश्या काही लोकांच्या शितामुळे मी संपुर्ण भातावर आक्षेप घेणार नाही…….कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीत पण म्हणून अघळपघळ चांगुलपणाही सरसकट करत सुटायचा नाही हा धडा घेतलाय……
आ बैल मुझे मार………..
२/४ दिवसापुर्वी माझी एक शेजारीण संध्याकाळी साधारण साताच्या सुमारास येउन बसली……गप्पा झाल्या, चहा झाला, मुले/ नवरा यांची जेवणही झाली……होता होता साडेआठ झाले पण हिची काही हलण्याची चिन्ह दिसेनात. आम्हा सगळ्यांची चूळबूळ, मुलांवर माफक चिडचिड सगळं झालं. मला स्वत:ला संध्याकाळी कोणाचे नवरे घरी आल्यावर विनाकारणच त्यांच्याकडे ठिय्या देउन बसायला आवडत नाही…..आजच्या आमच्या पाहूण्याची मात्र अशी काही अट असल्याचे दिसत नव्हते.
नवाच्या सुमारास माझे आई-बाबा ऑनलाईन आले, मग सासूसासरे- जावई, नातवंड- आजी आजोबा अश्या चॅटिंगच्या जुगलबंद्या झाल्यावर मला मैदानात पाचारण करण्यात यावं असा उभयपक्षी ठराव पास झाला…….त्यानूसार बेडरूममधून मला आवतण देण्यात आले…..पण हा ही प्रयत्न फोल ठरवून माझी शेजीबाईरुपी मैत्रीण जागीच होती.नवऱ्याच्या कपाळावरचं आठ्यांच जाळ आणि ही बाई गेल्यानंतरच माझ्यावरच शाब्दिक संकट मला स्पष्ट दिसत होतं………..आज पहिल्यांदाच तो माझ्याजागी होता, नाहीतर एरवी हा त्रास त्याच्या मित्रांपायी मला होत असतो. तरिही एकिकडे असेही वाटत होते की हिचं घरात काही बिनसलं तर नाही ना!!!!!!! ईथे परदेशात उठ्सूट, ’मै मायके चली जाउँगी’ ची धमकी घालता येतं नसल्यामुळे हिचा नाईलाज तर नाही ना झाला???? शेवटी न रहावून मी तीला विचारलेच तर ती म्हणे, “अरे कुछ भी नही, मेरे घर मे मेरे हजबंड मेरे बेटे की पढाई करवा रहे है तो ये सिरियल्स मै वहाँ नही देख सकती!!!!!!!!!!!!!” म्हटलं कप्पाळ माझं…….स्वत:चाच राग येतो अश्यावेळी. आपल्या अघळपघळ चांगूलपणाचा ( सर्किटचा शब्द), भिडस्तपणाचा लोक अक्षरश: गैरफायदा घेतात, आणि आपण काहीही करत नाही.
मस्कतला आल्यावर तर मला प्रकर्षाने हा अनुभव आलाय. आपल्या चांगूलपणाला आपला वेडेपणा म्हणण्याची वेळ अनेकदा आलीये…….आता हा परवाचा ’माझ्या’ मैत्रीणीचा एखादा किस्सा सोडला तर याप्रकारे बळीचा बकरा माझा नवराच अनेकदा बनत असतो. मी इथे आले तेव्हा मुलगी साडेपाच महिन्याची आणि मुलगा पाच वर्षाचा होता माझा. आल्यानंतर महिन्याभराच्या आतच नवऱ्याच्या बॅचलर मित्रमंडळींच्या गप्पा सुरू झाल्या, “अरे भाभीजी आ गयी है तो कब बुला रहा है खाने पे???” बरं नवरोजींनी व्रत घेतल्यासारखे त्या सगळ्यांना ईमाने ईतबारे बोलवायला सुरुवात केली. सकाळी ९/१० वाजता नवऱ्याचा फोन आला की मला धडकीच भरायला लागली, कारण हा फोन यायचाच मुळी त्याच्याबरोबर जेवायला कोणकोण येतय याची यादी द्यायला……घरात लहान मुलं, जागा नवी, कामाला बाई नाही फजिती व्हायची नुसती…..
मला स्वत:ला स्वयंपाक करायला आणि वेगवेगळे पदार्थ करून खाउ घालायला आवडतं पण ही परिस्थिती वेगळी होती, मुळात यात माझा नवराच फितूर होता. माझी बायको कशी सुगरण आहे हे जणू साऱ्या जगाला पटवायला निघाल्याच्या अविर्भावात तो वावरत होता. बरं त्याला काही म्हणावं तर याचे ठरलेले उत्तर, हे बघ मी काही स्वत:हून आमंत्रण वाटत फिरत नाही, लोक स्वत:ला self invite करतात त्याला मी काय करणार. यथावकाश यापैकी अनेक उपटसूंभांच्या फ्यामिलीज आल्या आणि त्यापैकी एखादा अपवाद वगळता बाकी कोणीही आम्हाला बोलावणे तर सोडाच पण ओळख दाखवण्याचेही कष्ट घेतले नाहीत………आता ’सोनारानेच कान टोचलेले’ असले तरी नवऱ्यात १००% सुधारणा होणार नाही याची मलाही जाणिव आहे…….
आम्हा दोघांनाही कोणाला आपल्या घरी बोलावून बाहेरचे जेवण द्यायला आवडत नाही, अगदीच नाईलाज असेल तर गोष्ट वेगळी पण केवळ कंटाळा म्हणून असले काही आम्ही करत नाही……याविषयी लोकसत्तामधे मुकूंद टाकसाळेंचा एक छान लेख आलेला आहे…… पण मग करा मेहेनत आणि बरेचदा तर भाजा लष्कराच्या भाकऱ्या. काहीही असलं तरी आता मात्र मी हे असले एकतर्फी नाते ठेवण्याबद्दल आवाज वाढवायला सुरुवात केली आहे…….यावेळेस भारतात गेल्यावर सासूबाईंशी बोलताना त्या म्हणाल्या, “अगं बाई वेळीच आवर घाल त्याला, बदलला नाही गं बाई हा अजून!!!!!!!” कधी नाही ते नवऱ्याबाबत आम्हा दोघींचे ऐतिहासिक दुर्मिळ एकमत झाले.
गेल्या वर्षी आम्ही भारतात गेलो त्याचसूट्टीत नवऱ्याच्या मित्राचे आई-वडिल येणार होते, आता ईतर बॅचलर लोकांमधे त्यांना रहायला का भाग पाडायचे, एवीतेवी आपले घर रिकामेच आहे तर राहू दे त्यांना ईथे सुखाने या विचाराने प्रवृत्त होउन आमचे घर त्यांना सुपुर्त करण्यात आले. आम्ही परत आल्यावर घरात मी आल्या आल्या गैरसोय नको म्हणून भरून ठेवलेल्या किराण्याचा खातमा झालेला, आयर्न बोर्ड जळालेला, वॉशिंग मशिनच्या ड्रायरची रिंग तुटलेली अश्या अनेक लहानसहान बाबी आढळल्या. कहर म्हणजे मस्कतसारख्या ठिकाणी जिथे प्रचंड घरभाडे आहे तिथे आपली सोय झाली याबद्दल त्या मित्राने अवाक्षरही काढले तर नाहीच उलट आलेल्या लाईटबिलाची ब्यादही आमच्या गळ्यात घालण्याचा त्याचा हेतू होता………तेव्हा मात्र मी खडसून सांगितले की हे चालणार नाही……..सरतेशेवटी एक मान्य आहेच की आपलेच नाणे खोटे…….
या सगळ्या पाहुणचाराची ही नावडती बाजू असली तरी काही अशीही नाती लाभलीत जी नुसती टिकावी नाही तर जोपासावी असे कायम वाटते. कदाचित त्याच मंडळींमूळे असावं की माणूसकीवरचा आणि नात्यांमधल्या गोडव्यावरचा विश्वास काही उडत नाही.
थोडक्यात काय माझा नवरा जोवर मोकळ्या मनाने ’आ बैल….’ म्हणतोय तोवर ’मुझे मात्र मार’ खावा लागणार आहे……कारण कितीही ठेचा खाल्ल्या तरी म्हणतात ना, ’त्याचा येळकोट राहिना…मुळ स्वभाव जाईना………’
क्रमश:
(हा लेखप्रपंच सहजच घडलेला नाही, त्याला असलेले कारण पुढच्या लेखात……)
सुरज एक चंदा एक……
सुरज एक चंदा एक……तारे अनेक…….निवांत गात गात मी पोळ्या लाटत होते. अचानक ह्या ओळी मनात का आल्या ह्याचे उत्तर नव्हते माझ्याकडे……घरापासून दुर दिवाळी साजरी करत असल्यामुळे असेल कदाचित मन वारंवार बालपणात पळत होते……तेव्हाची दिवाळी सगळ्या नातेवाईकांसोबत होती आणि आताची शेजारासोबत……..आनंद आहेच निश्चित पण मनाला आवर घालावा कोणी, बरं एका कारणाने भुतकाळात गेलेले मन तेव्हढ्याच भोज्ज्याला शिवून परत येण्याईतके शहाणे नाही, ते वेगवेगळ्या आठवणीत हजेरी लावून येते.
अश्यावेळेस मुलांना सोबत नेले नाही या सहलीला तर ते अचानक वास्तवात आणतात त्यामूळे मन मागे पळाले की मी मुलांनाही सांगते आमच्या वेळी असं होतं…तसं होतं च्या गोष्टी………तर कालच्या त्याच आठवणींच्या राज्यात माझ्या हाती लागले होते ते ह्या ओळी…
सुरज एक चंदा एक तारे भये अनेक…
एक तितली एक एक एक अनेक तितलियाँ…..
’पर दिदी ये ब्याल क्या होता है?’ ला मुलाने एंट्री केली, “मम्मा ब्याल म्हणजे काय गं?”
“ब्याल…..ब्याल होता है पंछी पकडनेवाला……………..” ….अस्मादिक.
मुलाच्या चेहेऱ्यावर स्पष्ट लिहीले होते मला काही समजत नाहीये, आणि तू हे जे काही मनापासून एंजॉय करतीये त्यात मला काही विशेष रस वाटत नाही. मागे हेच चेहेऱ्यावरचे भाव मी वाचले होते “मिले सुर मेरा तुम्हारा” गायल्यावर…….गाणं म्हणुन त्याला ते आवडलं असाव पण त्यामागचा संदेश पोहोचला नसावा…….मग मी विचार केला हे नुसते सांगून मजा येणार नाही आणि शरण गेले Youtube ला…..
पुर्वी दुरदर्शनवर येणारे एकतेचा संदेश देणारे हे व्हिडिओ आज पुन्हा नव्याने पहाताना मनात एक वेगळीच उर्मी दाटत होती……
हे व्हिडीओ देत आहे, माझ्या मुलाला आवडले……आणि नवराही खुष झाला, आपण जुन्या पोतडीत हात घालावा आणि काहितरी खुप आवडते हाती लागावे तसे झाले होते त्याचे. काही गोष्टी समोर येत नाहीत म्हणून आठवत नाहीत पण विस्मरणात जात नाहीत हेच खरे!!!!!
दूबई-४
चौथा दिवस…..सकाळी आमचा अर्ध्या दिवसाचा दुबई दर्शन कार्य़क्रम होता….यातले मुख्य आकर्षण होते ते ’पाम जुमैरा’ चे…. हे मानवनिर्मीत बेट एका पाम (Palm) च्या झाडाच्या आकाराचे आहे. ’नकील ग्रूप’ या कंपनीने बनवलेले हे मानवनिर्मीत आश्चर्य अवकाशातूनही दिसते. याबरोबरच ’द वर्ल्ड’ हे जगाच्या नकाश्याच्या आकाराचे बेट हेदेखील या कंपनीने बनवलेले आहे…….ईंटरनेटवर या बेटाची माहिती मिळवली होती, या बेटावरचे ’अटलांटिस हॉटेल’ पहाणे हे देखील प्रमूख आकर्षण होते…….

याचबरोबर आम्ही जाणार होतो ते ’जुमैरा बिच’ वर….या बिचवर स्वच्छ सुंदर किनाऱ्याबरोबर दुबईतील दोन मुख्य स्थळे ’ बुर्ज-अल-अरब’ व ’जुमैरा बिच हॉटेल’ आहेत…….गौरी झोपलेली असल्यामुळे मी गाडीतच बसले तरी बाकीच्या सगळ्यांनी मात्र पाण्यात जाण्याची संधी सोडली नाही. ईथून पुढे आहे ते ’अटलांटिस हॉटेल’……पाम जुमैरा च्या अर्धवर्तूळाकार परिघावर समूद्राच्या पार्श्वभूमीवरचे हे हॉटेल खरच पहाण्यासारखे आहे……..जाताना आता आपण पामच्या बुंध्यातून जातोय वगैरे माहिती ड्रायवर देत होता……मस्त अनुभव होता तो एक……संपुर्ण जग जेव्हा मंदीच्या खाईत लोटले गेले तेव्हा या हॉटेलचे भव्य उदघाटन केले गेले…..त्यावेळी झालेल्या आतिषबाजीचा अंदाजे खर्च होता २० मिलीयन डॉलर्स……..एरवी असल्या गोष्टींना विशेष न भूलणारी मी थक्क होत होते हे सगळे ऐकून आणि याची देही बघून………….या आतिशबाजीचे साक्ष ग्रह तारेही ठरले कारण थेट अंतराळातूनही हे सगळे दिसत होते……..
तिथून मात्र आम्ही थेट हॉटेलवर आलो कारण पुढचे काम होते ’डेजर्ट सफारी’……… मला आधिपासूनच या प्रकाराची भिती वाटत होती कारण मला सरळ रस्त्यावर चालणाऱ्या गाडीतदेखील त्रास होतो आणि ईथे तर भर वाळवंटात मोठमोठ्या गाड्या उलटसुलट चालवणार…….म्हणजे माझे मळमळणे नक्की होते, पण आपल्यामूळे ईतरांचा हिरमोड नको म्हणून गप्प बसले…….तुम्ही ती महिंद्र स्कॉर्पिओ ची जाहिरात पाहिलीये का ज्यात एक ललना वाळवंटात उभी असते आणि तिकडून वाळूवरून उड्या मारत स्कॉर्पिओ येते तोच हा प्रकार…..पण प्रत्यक्षात ती जाहिरात अतिशय सौम्य वाटावी अश्या जोरजोरात दणके बसतात……..आमच्या गाडीत बसलेला कंपनीचा माणूस अर्ध्या रस्त्यात म्हणाला ’अभी ईन लोगोंको जोर का धक्का लगने वाला है!!!” झालं माझी भिती अजूनच वाढली पण काय करणार…..जवळच्या लवंगांच्या भरवश्यावर करू म्हटलं आपण वाळवंट पार, अर्थात उत्सुकता तर होतीच……..


मधे एका ठिकाणी गाड्या थांबल्या…..ईथे नेहेमी ग्रूप बुकिंग होते, एकाच वेळेस अनेक गाड्या निघतात, मग एकाने एका उंच टेकडीवरून उडी मारली की दुसरा आपली गाडी त्याच्याही वरच्या टेकाडावर नेतो…….मधल्या थांब्यावर गाड्यांच्या टायरमधली हवा काढण्यात आली……जास्त दणके बसायला नको म्हणे…’नानाची टांग’ म्हटलं तुमच्या……बसायचे तेव्हढे दणके बसलेच सगळ्यांना……..
एकदाचे आम्ही वाळवंटात अवतरलो……रेसकोर्स वरच्या घोड्यांसारख्या गाड्या लावल्या गेल्या……जोरजोरात गाणे लावले………आणि मग झाली ती धुमश्चक्री सुरू………गाडी सुरु झाल्यानंतर पहिल्या ५/१० मिनीटातच मी ओळखले आपले काही खरे नाही आज……आणि तेव्हढ्यातच लेकीने रडायला सुरूवात केली आणि जाहीर केले या माणसाला गाडी चालवता येत नाही तो वेडीवाकडी चालवतोय, मला बसायचे नाही…………तिचे रडणे मिनीटागणिक वाढतच होते….शेवटी बाकीच्या गाड्यांना बाय बाय करून आम्ही थांबलो…….ड्रायवर आपला काश्मिरी होता, त्याच्याने लेकीचे रडणे पहावेना, त्याचे मत की ती घाबरलीये पण आपण भर वाळवंटात आहोत ईथून मागे फिरणे शक्य नाही. मग काय कार्टीने या नव्या काकाला गाडी धड न चालवल्याबद्दल बदड बदड बदडले…..दोन मुलींचे वडील असलेल्या त्या सद्गृहस्थाने आनंदाने तो मार खाल्ला……कसेबसे ते ४० कि.मी. पार केले आणि एका ठिकाणी सुर्यास्त पहायला थांबलो. तोच मागच्या गाडीत कोणीतरी म्हणे ओकून गोंधळ घातला होता, कोण म्हणून पाहिले तर मस्कतहून आलेले दुसरे गुजराती कुटूंब….मग आम्ही लवंगांची वाटावाटी केली……..


तिथून पुढे होता डेजर्ट कँम्प……….तिथे रात्रीचे जेवण आणि बरोबरच्या पुरूष मंडळाचे मुख्य आकर्षण ’बेले डान्स’ होते…….गप्पा टप्पा, अरेबिक मेंदी काढणे सुरू असतांना जेवण सुरु झाले आणि मग अवतरली ’नॅनी’ नावाची बेले डान्सर……. तिच्या थिरकणाऱ्या पावलावर ग्रूपमधल्या पन्नाशीच्या काकू नाचल्या मग सगळ्यांनाच उत्साह आला आणि माझ्या नवऱ्यासहित अनेक जण नाचण्याची संधी साधून आले.
परतीच्या वाटेवर या काश्मिरी ड्रायवरशी बऱ्याच गप्पा मारल्या…..मला काश्मिरीचा थोडाफार गंध असल्यामुळे त्यानेही खूप गप्पा मारल्या…..त्यांच्या पुढच्या वर्षीपर्यंत राजस्थान मधे जेसलमेरला अशी डेजर्ट सफारी सुरू करण्याच्या कल्पनेविषयी भरभरून बोलत होता, श्रीनगरमधले घर, बायको, मुली सगळे सांगत होता……उतरतांना म्हणाला खूप दिवसानी ईतके बोललो…..माझा नवरा म्हणे माझी बायको दगडालाही बोलायला लावेल…..हसून तो म्हणाला, “ऐसा कुछ नही औरते हर जगह ऐसीही होती है…….”…..
थोडक्यात काय भरपूर श्रम झालेले असले तरी थकवा न येता सगळे प्रसन्न झाले होते……..
(या पोस्टमधे मी ’अटलांटिस हॉटेल’ आणि ’डेजर्ट सफारी’ चे व्हिडिओ टाकले आहेत, पण पाम जुमैरा निश्चितच पहाण्यासारखे आहे, YouTube वर अनेक व्हिडिओ आहेत त्याचे…नक्की पहा.)
दुबई-३

आजची पोस्ट आहे दुबई म्युजियमबद्दल……
सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या आपल्या देशाला जतन करण्यासारख्या अनेक ऐतिहासिक,कलात्मक वास्तू आणि वस्तुंचा तोटा नाही. आणि त्याविषयीची आपली आणि आपल्या राज्यकर्त्यांची अनास्था या पार्श्वभूमीवर दुबईतले हे लहानसे म्युजियम मात्र खुपच आवडले…… जुन्या किल्ल्याचे आता म्युझियम केलेले आहे….साधारण तिकिट आहे, पण ते देणाऱ्या माणसाचे मात्र कौतूक वाटले. आमच्या बरोबर दोन लहान मुले आहेत हे पहाता त्याने आधिच कसे फिरा याविषयी सुचना केली. मुलांच्या हातात ऑरेंज गोळ्या ठेवल्या आणि त्यांना गोड हसुन समजावून सांगितले की बाहेर उन्हात उगाच पळु नका…..
’दुबई म्युझियम’………बाहेरच्या भागात असलेले दोन खोल्यातले म्युझियम पाहून नवरा चिडचिड करत होता….मुले पण वैतागले. हे काय आणि किती वेळ पहायचे…..
बाहेर निघालो आणि एक रस्ता लहानश्या अंधा
ऱ्या बोगद्याकडे जात होता…..तिथे थोडे आत गेल्यावर मी ओरडले ’युरेका’ कारण खरे म्युझियम ईथे होते…बाहेर थोडी तोंडओळख होती केवळ. आत गोल गोल उत
रत्या रस्त्यावरून जाउ लागलो….दुबईच्या प्रगतीचे वर्णन करणारे बोर्डस जागोजागी लावलेले आहेत….गेल्या पन्नास वर्षातील प्रत्येक दशकात दुबई कशी होती याचे सविस्तर वर्णन आहे इथे……ह्या सगळ्या बोर्डसच्या मधे एका प्रोजेक्टर वर हीच माहिती चित्र स्वरूपात दाखवली जात होती, एकीकडे अरेबिक व दुसरीकडे ईंग्लिशमधे असलेली ही माहिती सगळे वेळ काढून मनापासून पहात होते. दर दहा मिनिटाने ती माहिती पुन्हा पुन्हा दाखवली जात होती.
तिथून पुढे गेल्यावर भेटले ते अरबांच्या जीवनमानाबद्द्ल सांगणारे पुतळे……..जागोजागी मांडलेले हे पुतळे अगदी खरे वाटत होते…….एका ठिकाणी खेळणारी आणि बोट बनवणारी लहान मुलं होती तर पुढे गप्पा मारत बसलेले अरब होते. लहानपणी गोष्टींच्या पुस्तकात दिसणारे किंवा पपेट शो मधून दिसणारे अरब आत्ता मुलांना दाखवतांना मजा येत होती……. एका दुकानात ’मसाले’ विकणारा अरब होता तर दुसरीकडे ’कापड दुकानदार आणि ते खरेदी करत असलेली स्त्री’……..पुर्वी इथे मोत्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असे त्या मोत्यांची पारख करणारा दुकानदार …..खजूर विकणारा, जरीकाम करणारी बाई सगळे सगळे हजर होते…… बरं हे ईतके हुबेहुब होते की त्यात असलेल्या खऱ्या सिक्यूरिटीला सुद्धा मुलाने हात लावून पाहिले…..एका खोलीत अभ्यास करणारे मुलं आणि त्यांना कुराण शिकवणारे गुरू होते…….खरे खजुराचे झाडही होते एक…….

या पुढचे दालन होते समूद्राशी निगडित व्य
वसायांचे….यात मोती वेचणारा पाणबुडा आणि पाण्यामुळे अंगाला जागोजागी चिकटलेला ड्रेस अतिशय बारकाव्याने बनवलेला होता……..त्याला पहात असताना अचानक वर लक्ष गेले तर हा पाणबुडा ज्या होडीतून आलेला होता ती होडी आणि त्यातून पाण्यात येणारा दुसरा पा
णबुडा दिसत होता……आहाहा!!! डोळे दिपत होते सगळे पाहून…चक्क मुले आणि नवरा कंटाळत नव्हते…….बोट बनवणारा कारागिर तर असा खरा वाटत होता की आत्ता बोलेल!!!!पुढे होते कोळी कूटूंब, मासे विकणारे नवरा बायको……..
पुढे होते ती जुन्या काळची भांडी……अवजारं……काही अस्थींचे नमूने…..जुनी नाणी…..
आणि एक छोटेखानी दुकान जिथे दुबई आणि अरब संस्कृतीशी निगडीत वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या….ईथून मात्र नवरा पळ काढू पहात होता…….पण मी चतूराईने स्वत:जवळ काही करंसी ठेवलेली असल्यामुळे आणि मनापासून त्यालाही तिथल्या वस्तू आवडल्यामुळे व्हायची ती खरेदी झालीच…….
संध्याकाळ होती ती शारजा मधे रहाणाऱ्या मैत्रीणीच्या भेटीची…..दुसरा दिवस होता तो सिटी टूर आणि ’डेजर्ट सफारी’ चा…….
दुबई-२
दुबईतला दुसरा दिवस…….सकाळी आम्ही निघालो ते ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ पहायला. मला स्वत:ला उगाचच मुलांची फरपट करत विंडो शॉपिंग वगैरे आवडत नाही…….कुठल्यातरी मॉल मधे जा आणि ज्या वस्तू आपण बापजन्मात घेणार नाही त्या कशाला पहा अशी माझी मतं मी मांडत होते……पण बरोबरच्या वाटाड्याने मला गप्प बसायला सांगितले……हा आमचा ’होस्ट आणि दोस्त’ म्हणजे सुबी नावाचा माझ्या नवऱ्याचा मित्र……आ
धि मस्कतला असलेली ही स्वारी सध्या दुबईत असते. मुलांचा लाडका सुबी मामा त्यांना वर्षभराने भेटलेला असल्यामुळे माझी बडबड त्यांच्या भरतभेटीत व्यत्यय आणत होती. मेट्रो हे मुलाचे मोठे आकर्षण…….वाळवंटातली सगळीच आश्चर्य आणि प्रगती खुल्या मनाने पहायची होती त्यामूळे आम्ही मुंबईतल्या लोकल पहाणारे लोकं, मेट्रो काही नवी नाही वगैरे कद्रूपणा कोणी करत नव्हतं!!!!! ही ट्रेन सुरू झालीये ती ०९/०९/०९ या दिवशी सकाळी ०९:०९:०९ वाजता……कुतुहल होतं हिच्याविषयी…..
दोन वेगवेगळ्या टॅक्सीमधून आम्ही सगळे बर्जूमन या जवळच्या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. दुबईत सरळं हिंदी बोलले की काम भागते…..इथले टॅक्सी ड्रायव्हर्स भारतीय ,पाकिस्तानी वा बलुची असतात त्यामूळे अरेबिक आलेच पाहिजे असे नाही. ही सोय मस्कतला नाही….इथे जुजबी तरी अरेबिक आलेले केव्हाही सोयिस्कर ठरते. दुबईत फिरताना वारंवार जाणवत होते ते वैभव…….बराच भाग हा पुण्या मुंबईसारखा असला तरी अरबांचे वैभव आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीशी असलेली बांधिलकी जाणवत होती. दोन वेगवेगळ्या टॅक्सी असल्यामुळे स्टेशनच्या दोन टोकांना उतरणे…..ए्कमेकांचे पर्सनल नंबर नसणे……मग तू गोंधळ घातलास की मी वगैरे माझे आणि नवऱ्या
चे वाद….सगळे सोपस्कार पार पाडतांना लक्षात आले की आपले हुशा
र चिरंजीव दुसऱ्या कुटूंबाकडे आहेत ते निस्तरतील हा गोंधळ. आणि लेकाने माझ्या विश्वासाला पात्र ठरत त्यांच्याकडच्या मोबाईल वरून मला फोन लावून आम्हाला शोधून काढले. एकदाचे आम्ही ट्रेनमधे चढलो…..’बुर्ज दुबई’ ही जगातली सर्वाधिक उंच बिल्डींग दुबईतल्या कुठल्याही टोकातून दिसते…….साक्षात आकाशाला गवसणी घालणारे ते वैभव आता जवळून पहात होतो आम्ही……
२०-२५ मिनिटांच्या ट्रेन सफारी नंतर पोहोचलो ’मॉल ऑफ़ द एमिराट्स’ मधे…..सुबीचे ऐकून आपण काहीही चूक केली नाही याची प्रचिती आली. प्रचंड मोठा आणि ऐश्वर्यसंपन्न मॉल……याचे आणि एक वैशिष्ट्य असे की या ठिकाणी एक ’आईस लॅंड’ बनवलेले आहेत…..शुन्य डिग्रीपेक्षा कमी तापमान राखून तयार केलेले हे आईसलँड पहाणे ही एक पर्वणी होती, ईग्लू, पोलर बेअर, एस्किमो सगळे हजर होते तिथे. वाळवंटातल्या मॉलमधे लोक मस्तपैकी आईस स्किईंग करत होते….एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकत होते…….मनात ईच्छा आणि हातात पैसा असेल तर काय काय होउ शकते!!!!! २१ सप्टेंबर जागतिक शांती दिवस म्हणुन या मॉलमधे एक मोठी मेणबत्ती ठेवली होती ज्यावर ’शांती संदेश’ लिहायचे होते……जवळपास ३/४ तास या मॉलमधे फिरून आम्ही निघालो ते ’दुबई मॉल’ कडे……एक आश्चर्य तिथेही वाट पहात होते……..
’दुबई मॉल’ यात काय आश्चर्य असेल ते असो माझ्यासाठी हेच महत्वाचे होते की हा ’बुर्ज दुबई’ च्या जवळ होता…….हा मॉलमधे एक प्रचंड मोठे अक्वेरियम बनवलेले आहे……लहानमोठे विविध आकाराचे रंगाचे मासे पहाणे सगळ्यात जास्त एंजॉय केले माझ्या लेकीने……मनसोक्त बागडत होती ती. आणि तीच का आम्हाला ही मजा येतच होती……रोजच्या त्याच त्याच रूटिनमधून मिळालेला बदल सुखावत होता……… अक्वेरियम मधल्या बोगद्यातून मासे अजून जवळून बघितले……मस्कतहून आमच्याबरोबर आ
लेले नवरा बायको हे नविनच लग्न असल्यामुळे मासे, बोगदे तत्सम गोष्टींपेक्षा एकमेकांचे फोटो काढण्यात रमलेले होते……
आता संध्याकाळचे सात वाजत आले होते…फिरून फिरून पाय दुखत होते. साडे आठ वाजता निघायचे होते क्रुजसाठी…..आम्ही परतलो हॉटेलवर. चहा पिउन फ्रेश झालो……मी आणि सुबी रमलो होतो शिळोप्याच्या गप्पात…या दोन दिवसात आम्हाला वर्षभराच्या गप्पा मारायच्या होत्या……आठ वाजता गाडी आली आणि आम्ही निघालो क्रूजसाठी…..भारतात क्रुज काही नवे नाही, गोव्याला केरळमधे क्रुज असतेच. आमचा हा अनुभव तितकासा सुखद होणार नाही याची जबाबदारी क्रुजवर असणाऱ्या गुज्जू ग्रुपने घेतली. बोट दुबई क्रीकमधे फिरायला लागल्यानंतर सुरु झालेली गाणी बंद करून या गुज्जू गँगचा म्होरक्या त्यांना गुजरातीमधे अनेक सुचना करत होता, त्यांच्या ट्रीपचे संपुर्ण प्लॅनिंग त्याने समजावले……आमच्या बरोबर असलेले ’गोरे’ आणि मल्लू मात्र वैतागले…..कसेबसे त्याची बडबड थांबली आणि डिनर लावण्यात आले……त्याबरोबरच ही सगळी फौज त्यावर तुटून पडली……बोट बॅलन्स होत नाहीये हे अनेक वेळा सांगुनही ते ऐकेनात. शेवटी गेलेल्या आम्हाला त्या डिनर मधे नक्की किती पदार्थ आहेत हे समजणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली होती. आम्ही मात्र सभोवतालचे दुबई पहाण्यात रमलो होतो, शेजारी असलेल्या गोऱ्यांची एव्हाना ईशानशी मैत्री झालेली होती….. ह्याने फोटो काढतो म्हटल्यावर त्या पन्नाशीच्या गृहस्थाने समोरच्या टेबलवरची फूले देऊन त्याच्या सौ.ना देण्याची पोज देउन त्याच्या तरूण मनाचे दर्शन घडवले……सौ. नेही ती फुलं लाजून स्विकारली. तेव्हढ्यातच आगमन झाले ’जादुगाराचे’, हा मल्लू जादुगार त्याच्या भयाकारी ईंग्लिशमधून त्याच्या ट्रिक्स समजावत होता……त्या गोऱ्यांनाच काय आम्हालाही समजेना, मग त्याला सल्ला दिला तुला हिंदी येत असेल तर त्यातूनच बोल!!!!! पण चाचपडतच त्याने केलेल्या जादू मात्र सगळ्यांना आवडल्या…… अंगठी गायब करणे आणि क्रूजच्या दुसऱ्या टोकाहून ती सापडणे….या जादुसाठी मी अंगठी दिली आणि तेव्हढ्यातच थोडं लाईमलाईट मधे येण्याची संधी साधली……
दमून थकून परतत आम्हाला अकरा वाजले होते…….पुढचा दिवस होता ’दुबई म्युझियम’ चा…….




ताज्या प्रतिक्रिया