कागज की कश्ती …..

टर्म्स ऍंड कंडीशन्सची यादी असलेला रटाळ आणि पापण्या जडावणारा कागद हातात ….. वाचायचा प्रयत्न चाललाय . काही म्हणता काही समजत नाही…. अ की ढ कळत नाही…. कुठल्यातरी टर्म 1.1 a चा 2.4 b शी संबंध आहे, कागद सांगतोय तसं…. पुन्हा नजरेच्या गाडीचा रिव्हर्स गियर, 1.1 a वाचायचा असफल प्रयत्न…. पहिल्या वेळेस नाही आणि आताही काहिही हाती लागलेलं नाही !! इथे एका टप्प्यावरून दुसऱ्यापर्यंत पोहोचताना पहिला टप्पा डोक्यातून कधीच हद्दपार झालेला आहे , कागद मात्र पुन्हा पुन्हा उलट्या सुलट्या उड्या मारायला भाग पाडतोय नजरेला !! थोडक्यात काय, कितीही मन लावून वाचलं हे प्रकरण तरी शेवटी वाचनाला विराम देत थेट कागदाच्या टोकाला असलेल्या I agree च्या चौकोनाला गाठू्नच या प्रयत्नाची अखेर होणार….

हे मुद्दे मुळातच बोजड लिहीतात की काय देव जाणे म्हणजे वाचणाऱ्याला काही समजायला नकोच. आणि मग एकदा का कंटाळून ’I agree’ म्हटलं की अडकलो आपण सापळ्यात !! शीण वाटतो या एकापाठोपाठ एक येणाऱ्या अवघड मुद्द्यांचा….

पाठ टेकलेली उशी सरळ, मान कललेली आणि डोळे मिटलेले…. ’टर्म्स ऍंड कंडीशन्स ’ म्हणे !! काही कागद नं नको नको वाटतात…. आणि अश्या नकोश्या कागदांना जास्त महत्त्व. ते जपुन ठेवायचे… वर्षानूवर्ष…. कधी पुन्हा लागतील सांगता येत नाही !!

कागद…. जन्माच्या दाखल्यापासून मॄत्यूच्या प्रमाणापर्यंत अनेक अनेक कागद….वह्या , पुस्तकांचा कागद…. ’खाकी दराऱ्याचा ’ ,वह्या पुस्तकांच्या रंगीबेरंगी रंगांना बंदिस्त करणारा कागद … भेळ पोटात साठवता यावी म्हणून स्वत:ला दुमडून घेणारा कागद , त्या भेळेची चव स्वत:च आधि चाखणारा शबरीसारखा कागद…. आयूष्यात गणित शिरलय ह्याची साक्ष देणारा वहीचा शेवटचा कागद…..

कागदाचं महत्त्व कमी होणारं नाहीच… उलट नोटांच्या रूपातलं त्यांचं दर्शन झालं की चढत्या आयू्ष्यासोबत कागदाची ’किंमतही’ वाढते !!

काही कागद हवेहवेसे. आपोआप जपले जाणारे….’टर्म्स ऍंड कंडीशन्स ’ लागू न होणारे कागद !!

त्या पावसाच्या पाण्याने बनवलेल्या ’किंचित तळ्यांत ’ डोलणाऱ्या लहानमोठ्या होड्या. त्रिकोण चौकोन साधत , जुळवाजूळव करत बनवलेल्या…. unconditional होड्या…. लहानपणी पाण्याच्या तळ्यात अलवार तरंगणाऱ्या होड्या …..

आता काहितरी ओळखीचं वाटतय… ” टर्म्स ऍंड कंडीशन्स ” च्या चक्राला भेदून मनाला मन गाठता येतय !! त्या होड्यांनी किमया साधलीये …. आता मनाच्या डोहात मुक्त संचार करणार या होड्या  ….. या होड्या आठवल्या की तो एक सुर मनात उमटतोच ….एक गंभीर आवाज, जगजीत गातोय ’वो कागज की कश्ती ’ चा सुर उमट्तोय …मन रटाळ टप्प्याला सोडून मुक्त निघालेय …. ’मनासी टाकिले मागे’ ची किमया आपल्याच्याने साधणार नसतेच मग आपण मनाच्या वेगाशी झटापट करत त्याच्या विचारांची लय साधावी किंवा मनाचा आणि विचारांचा लढा तिऱ्हाईताच्या नजरेने पहावा …. दुसरा पर्याय सोपा , तो अवलंबणे सोपे….

मनात डोहातल्या होड्यांवर आकाशाचं निळं प्रतिबिंब… होड्यांचा रंगही निळा निळा….

निळा कागद निळीच शाई ….. आंतर्देशीय पत्राची एक घडी ….

मजकुर पोटात दडवणारी  . पत्राचे एक टोक बोटाने कापत नेत त्या पत्राच्या कुशीत शिरण्याची अस्वस्थ घाई करायला लावणारी निळ्या घडीची होडी .

डोहात एकदा उतरलं की पाण्यापासून सुटका नाही….. प्रवाह कुठे आणि कसा नेणार हा प्रवाहाचा निर्णय !!

डोहाच्या वरवर सफर झाली तर फारसा धोका नसतो…. तिथे सगळं नितळ निळं आहे….  डोह तसा लबाडच , तळ ढवळला न जाण्याची हमी तो देतच नाही …..

कागदाचा मुद्दा आणि पत्रांचा टप्पा…. या मुक्कामावर डॊहही थबकतो नेहेमी !! ’पाच’ मार्कांसाठी परिक्षेत येणाऱ्या पत्राची रुक्ष होडी… या होडीला पुढच्या, शाळेनंतरच्या प्रवासात ’बहरलेली ’ पालवी फुटलेली….

’बहर’ त्याच्या आणि तिच्या भावनांचा…..

त्याची आणि तिची अनेक अनेक पत्र…. त्या पत्रांच्या तर अनेक अनेक होड्या आहेत… एक पदरी, दोन पदरी … सातपदरी ….. सप्तपदीच्या आधिच्या आणि नंतरच्याही !! त्या डॊहातल्या सर्वांग सुंदर होड्या…. मुक्त , उन्मुक्त ….. सगळा डोह या होड्यांच्या नावाचा….

डोहात प्रवास शांत सुखाचा ……

काहितरी सुटतय ??

हो नक्कीच….

डोहाने तळ गाठलाच म्हणायचा …. विचारांची आवर्तनं आणि गोल गोल गर्ता !! या डोहाला भोवरेच फार …..

शाळेतल्या रुक्ष पत्रांनतर , त्याच्या ’बहराच्या ’पत्रांपर्यंत मधेही तर होती काही पत्र ….. कुठलाच आकार न ठरवता येणारी पत्र ….

कधीतरी अचानक आठवणारी पत्र… सरणाऱ्या प्रवाहातल्या वर्षांमधे उगाच क्षणभर डॊकावणारी ही पत्र !! क्षणिक अस्तित्वाची पत्र….

काही अपेक्षित तर काही अगदीच अनपेक्षित पत्र !!

वाट चूकलेली , हो चुकलेलीच पत्र ….हरवलेली पत्र  ….वाऱ्याच्या हेलकाव्यांवर डॊलण्यासाठी लागणारं अस्तित्वच हरवून बसलेल्या ह्या होड्य़ा ….. पृष्ठभागावर मागमूसही न ठेवता विरलेल्या होड्या ….

पांढऱ्या कागदावरचे फिकट गुलाबी प्रश्न …. प्रत्येक शब्दावर प्रश्नांचं ओझं . सगळ्याच प्रश्नांची उकल होत नसतेच…. अपेक्षितांची उपेक्षा एकवेळ शक्य पण अनपेक्षित होड्यांच्या येण्याने डोहावर तरंग तरंग ….

ओझं जास्त असलं की डोहं गिळंकृत करणारच …… डोहाच्या नियमाला अपवाद विरळा…..

ओझ्याखाली दबत त्या होड्य़ांचंच विसर्जन…. पाणी शिरून ओल्या होत होत डोहाच्या तळ गाठलेल्या होड्या…

विसर्जनाच्या जागा प्रवाहात असतात … लहानसा भोवरा मुकाट फिरतो तिथे …. विस्मरण झाले तरी क्वचित कधीतरी डोहाचा तळ चाचपडताना अजूनही अस्तित्व सांगणाऱ्या होड्या !!

प्रत्येकच डोह उलगडला तर असे ’भोवरे’ सापडतात  !! हा आयूष्याच्या “टर्म्स ऍंड कंडीशन्स “चा एक भाग तर नव्हे ??  तरिही  कोणितरी ज्या कागदावर मन उलगडून मांडले होते त्यांचं कणभर असलेलं अस्तित्वही आपापल्या डोहातून क्रौर्याने पुसणे हे आपला ’डोह’ नितळ असण्याची जगाला खात्री पटवण्यासाठी गरजेचे…..

डॊहाचे हेच मोठे वाईट असते…. दमून याच्या कुशीत शिरावे तर हा अजूनच दमवतो !!

उलटसुलट सफरीमूळे जसं डोळ्यात भणाणतं वारं शिरतं !! पापण्यांच्या कडॆवर एक चुकार अश्रॄ त्याची खारी हजेरी सांगतो…… सारा डोहच क्षणभर एकवटून पापण्यांच्या कडॆवर उभा रहातो !!

आयूष्याच्या प्रवाहाला आव्हानं दिली तरी त्याच्या अफाट स्वरूपाकडे  पहाताना अचानक डोळ्यात उमटलेला डोह …. या डोहात बुडायची भिती अधिक …..

कुठून कुठे आलो आपण ? जगजीतची जागा लताबाई घेताहेत , ’ये कहा आ गये हम’ विचारताहेत ……

…………

…………

डोह गोंधळलेला आणि आपणही …..

मात्र आपला नावाडी उभा असतो….. सगळा डोह त्याच्या  ’परिचयाचा ’ असतो !! प्रवाहातले भोवरे त्याला  ’नवे  ’ नसतात , तो ते चुकवायला समर्थ असतो….

त्याला प्रश्न विचारावे लागत नाहीत…. तो ’प्रश्न’ विचारतही नाही , त्याच्या ’अलवार’ होडीची हीच खरी शक्ती असते !! … त्याच्या निव्वळ ’ असण्य़ानेच ’ प्रश्न सुटतात , मनावरचं ओझं उतरतं , हलकं होतं !!  ’अलवार’ वस्तू तरंगणारच , तरणारच ….न सांगताही आता सगळेच अर्थ समजतात ….

” प्रत्येक होडीचा डोह ठरलेला असतो अगं , त्या होड्य़ांचा डोह वेगळा हेच एक सत्य …. ” नावाडी हसत सांगतो !!

इथेही टर्म 1.1 a चा 2.4 b शी संबंध , आयूष्याच्या “टर्म्स ऍंड कंडीशन्स ” सोप्या वाटायला लागतात…. डोहाची धास्ती कमी होते !!

ज्या होडीत बसून पैल गाठायचा , तो नावाडी सक्षम असला की सुकाणू आपल्या हातात येते…..

“टर्म्स ऍंड कंडीशन्स ” फारशा अवघड नसतात म्हणजे , तर त्या समजण्याइतके आपण शहाणे नसतो…..

…………

कुठूनतरी वारं येतं… हातातले कागद फडफडतात…..

पाठ अजुनही टेकलेली , उशी सरळ, मान कललेली आणि डोळे  मात्र “उघडलेले…. ” …..

हातातले कागद आता तितकेसे परके नसतात !! “टर्म्स ऍंड कंडीशन्स ” ला आता आपण , डोह आणि कागज की कश्ती कोणीच घाबरत नसते …… :)

आपण हे करायचे का ??

पंकजच्या ब्लॉगवरील पोस्ट जशीच्या तशी इथे शेअर करतेय !!

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.

लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.

AmteFamily

त्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.

नमस्कार
इमेल बद्दल आभारी आहे .
रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.
२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.

आता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

Screen area1-001

Screen area2-001

आपल्याला काय करता येईल?

आमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे.  सगळा हिशोब आपली मदत पोचली की ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.

https://docs.google.com/forms/d/1uk0BrxZC2TqWIF9kJUrs2H3UcTNMoIQj2zPW4cQg_cc/viewform

आपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना? म्हणूनच हा प्रपंच !!!

……………………………………………………………..

मंडळी आम्ही हे करतोय … तुम्हीही यात सामिल होऊ शकता !!

राजीवजी आणि सचिन तुम्हा दोघांना आणि युनिफॉर्मची खरेदी करण्याच्या कामात पुढाकार घेणाऱ्या ब्लॉगर्स मित्रमंडळाला काम पडणार आहे आणि तुम्ही आनंदाने ही जबाबदारी स्विकारलीये त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार!!

चाकोरीबाहेर खरडलेले कागद….

मस्कतमधे येउन दोन वर्ष झालेली, साधारण सगळं मार्गी लागलेलं…. मोठ्या मुलाची शाळा आणि दोन वर्षाच्या धाकट्या लेकीची प्रगती सगळं सुरेख सुरू होतं. तृप्त समाधान देणारं चौकोनी कुटूंब माझं , आणि तरीही पोकळीची एक हलकीच जाणीव मनात डॊकावू लागली होती. रिकामा वेळ हाती लागत होता…. आणि त्याचा सकारात्मक वापर नक्की काय आणि कसा करावा हे उत्तर मिळत नव्हतं !!

चळवळ्या मनाला आणि स्वभावाला मधेच अचानक , आपण दिवसाचे रकाने भरून  ’चाकोरीचे कागद खरडतोय ’ की काय अशी शंका वाटू लागली होती…. त्या सगळ्या गुंत्यात एक दिवस हाती लागला महेंद्रजींचा ब्लॉग.  मग वाटलं आपणही का लिहू नये ? …. झालं, ब्लॉग सुरू करायला इतकंच कारण पुरेसं वाटलं आणि लिहायला सुरूवातही केली .

एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि चक्क चार वर्ष लिहीत गेले. :) . ब्लॉगबाळ आज ’चार वर्षाचं’ पुर्ण झालय !! :) :) …. माझ्या ब्लॉगबाळाचा आज हॅपी बड्डॆ आहे !! :)

wordpress anniversary

पोस्टमागे पोस्ट करता करता कधी मी ’चाकोरीबाहेरचे कागद खरडायला ’ लागले हे मलाही समजू नये इतका सहज सुंदर प्रवास झाला. चाकोरीबाहेरेचे म्हणजे काही भव्यदिव्य नाही तर माझ्या रोजच्या आयूष्याच्या ’चाकोरीबाहेरचे ’ बरं :)

चार वर्षात काय नाही मिळालं इथे …. अनेक मित्र मैत्रीणी, नाती, वाचक , आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, कृषीवल ,सकाळ पेपरमधली दखल , चारचौघी मासिकात लिहीण्याची संधी , स्टार माझाच्या ब्लॉग माझामूळे टिव्हीवर चमकून येण्याची संधी !! :) . मात्र या सगळ्या सगळ्या पलीकडे मला ब्लॉगने काय दिलं तर माझ्या आजारपणाच्या गेल्या पुर्ण वर्षात माझ्या पाठीशी खंबीर उभी रहाणारी नाती. ’हरायचं नाही ’ सांगणारे भाऊ . एअरपोर्टला दहा मिनीटाची धावती भेट होणार ही कल्पना असली तरी धावणारे भाऊ. ’तन्वे तुझी काळजी वाटतीये ’ म्हणणाऱ्या माझ्या मैत्रीणी, बहिणी …… तर एकीकडे,  ’तायडे प्रेमात पडलोय/ पडलेय ’ हे आवर्जून सांगणारी चिल्लर पार्टी ….. :) . ॠणानूबंधांबाबतची माझी श्रीमंती हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय , तो अधेमधे ब्लॉगवर न डॊकावला तर नवल.

सतत रडता येत नाही मला…. ’संकटं’ आली होती, येताहेत आणि येतीलही. डगमगायलाही होतं … मात्र दु:खाचा पुरस्कार नकोच वाटतो.  कधी कधी डोळे भरून येतात, नकळत वहायला लागतात. अश्या वेळी एखाद्या जीवलगासारखा माझा ब्लॉग अश्रॄंना अडवणाऱ्या बांधाचे काम करतो. जुन्या पोस्ट्स, त्यावरच्या कमेंट्स आधार देणाऱ्या ठरतात !!

नवं काही लिहून होत नसलं, मनातले विचार मांडता येइनासे झाले की कधीतरी वैतागून ब्लॉग बंद करायचा विचार मनात येतो आणि नेमकी त्याचवेळी एखादी मैत्रीण सहज बोलून जाते , “तुझं ठीक आहे गं, तू निदान तुझे विचार ब्लॉगवर मांडून मोकळी होतेस ’ … !! मग ब्लॉग बंद करायला निघालेल्या ’माझे’ डोळे उघडतात आणि मी पुन्हा ब्लॉगकडे प्रेमाने नजर टाकते :)

सुरूवातीच्या पोस्ट्स आणि आत्ताचं लिहीणं यात फार फरक मला स्वत:लाच जाणवतो. त्या त्या परिस्थीतीला अनूसरून, मानसिकतेनूसार आणि त्या त्या वयाच्या भुमिकेला अनूसरून मी व्यक्त होत गेले….. आणि हे असं , इतकं सोपं सहज लिहीणं व्हावं याला कारण वाचकांचा सततचा पाठिंबा , तेव्हा या सहजच प्रवासाचे श्रेय त्यांचे!!

ब्लॉग लिहीणं मला मनापासून आवडतं…. खूप काही लिहीता येत नसलं तरीही :) . जवळपास १६० पोस्ट्स लिहून झाल्या आहेत. पुष्कळ लिहीणं होतय… इथे मांडले अनेक अनूभव, आठवणी आणि मतंही !! मात्र ओंजळ अजूनही रिकामी वाटत नाहीये…. अजूनही खूप बोलायचं आहे….. ब्लॉगवर लिहायचं आहे !!

गुरूनाथ सामंतांची नुकतीच एक कविता वाचली….

आकाश तुझ्यासाठी वेडं होइल ….

खाली वाकेल आणि तू नीळा होशील ..

असं लिही ….

आकाश पेलण्याची माझी कुवत नाही , आणि विचारांची तशी काही क्षमताही नाही ….. पण म्हणूनच अजून अजून समृद्ध होता यावं यासाठी तरी वाचायला/ लिहायला हवंय !!

पोस्ट लिहून पुर्ण होताना समाधान लाभतयं तोपर्यंत लिहायला हवंय…. ड्राफ्ट माझा असतो, एकटीचा…. पोटातून आईला नाजूक लाथ मारणाऱ्या बाळासारखा…. तो ड्राफ्ट , पोस्ट होऊन बाहेरच्या जगात कसा वावरतोय हे पहाताना तो मला आणि मी त्याला सांभाळतेय तोवर लिहिण्याला अर्थ आहे !!

(त्याच  कवितेच्या पुढच्या ओळी : )

शाई , कागद, शब्द आणि तुही

निमित्तमात्र आहेस

तुझ्यातली चेतना ही भवतालच्या अखंड चैतन्याची

ॠणी आहे

याची सजगता ठेवून लिही…..

हे ॠण मान्य आहे तोवर , या अखंड चैतन्याच्या झऱ्याला सामोरे जावे म्हणतेय ….. चाकोरीबाहेरच्या माझ्या या कागदांना खरडावे म्हणते, आकाशाला वाकवता आले नाही तर निदान दिलखुश गगनाशी उदार गप्पा तरी माराव्याच म्हणते……. वेड्यावाकड्या उमटणाऱ्या, धडपडणाऱ्या, सावरणाऱ्या , स्वत:चेच गीत गाऊ पहाणाऱ्या अक्षरांचं बोट धरत ’सहजच’ म्हणून जे जसे लिहीता येइल ते लिहावे म्हणते !!!   :)

सेटिंग !!

केरवारे आटोपल्यानंतर , घरातली धूळ झटकताना ती निम्मी कपड्यांवर आणि निम्मी चेहेऱ्यावर, केसांमधे मुक्कामाला वसवल्यानंतर मी आता मोर्चा भांडी घासण्याकडे वळवणार तोच दार वाजलं, तश्याच अवतारात दार उघडले तर समोर व्यवस्थित कपड्यांतली, मेक अप केलेली बाई मला विचारत होती की माझ्याकडे मेड हवीये असं समजलं…. ती श्रीलंकन होती आणि आमच्या बिल्डिंगच्या वॉचमनने पाठवलेली होती .

स्कर्ट घातलेली ती आणि अजागळ अवतारातली मी, सगळा विरोधाभास होता. नाकापेक्षा जड असलेल्या त्या मोत्याला मी दारातूनच परत पाठवलं….

एका मैत्रीणीशी गप्पा मारताना  सहज बोलले , पुर्वी आमच्याकडे बिल्डिंगला बांग्लादेशी वॉचमन होता तेव्हा येणाऱ्या मेडही बांग्लादेशीच होत्या आणि आता श्रीलंकन वॉचमन आलाय तर येणाऱ्या मेडही श्रीलंकन असतात !!

मैत्रीण अगदी सहज बोलली , “अरे सेटिंग होता है इन लोगोंका !! ” …

’सेटिंग’ शब्दावरचा जोर आधि सामान्य वाटला पण त्याच्या नेमक्या अर्थाचा बोध झाला आणि कसंसं झालं क्षणभर ….. काही गोष्टींबाबत एकतर मी मठ्ठ तरी आहे किंवा जाणूनही दुर्लक्ष करत असते…. बरेचदा या गोष्टी माझ्या खरच लक्षात येत नाहीत किंवा जाणवल्यातरी आपला नेमका अश्या बाबतीत काय संबंध हे न उमगून मी त्याबद्दल चर्चा करायचे टाळत असते.

असे एकेकटे रहाणारे वॉचमन,  येणाऱ्या मेड यांच्याशी माझी होणारी चर्चा म्हणजे, “घरची आठवण येते का ? ” ,”कधी जाणार परत ? ” वगैरे स्वरूपाची असते. त्यापुढे जाउन काही बोलायचे, विचार करायचा तर त्यांना काही मदत हवीये का वगैरे इतपत माझी मजल जाते. या सगळ्यांशी गप्पा मारणे होते माझे नहेमी, पण त्यांच्या वैयक्तिक आयूष्याच्या काही कोपऱ्यांबाबत एक अलिप्त तटस्थता असते कायम !!

माझ्या त्या मैत्रीणीशी गप्पा (?) आटोपल्या पण काहितरी सतत सलत राहिले. एखादी जुनी जखम ठसठसावी तसे…. खपली निघाली होती कुठलीतरी !! नक्की काय ते हाती लागल्याशिवाय मनाची तगमग थांबणार नव्हती ….. मैत्रीणीचे मत हे ’तिचे’ मत होते आणि ते असण्याचा तिला पुर्ण अधिकार होता त्यामूळे त्या मताने मला दुखावले नव्हते. अशी सरळसोट जनरलाईज्ड विधानं मला पटली नाहीत तरी ते करू शकणाऱ्यांचं कौतूक मात्र नक्की वाटतं. बरेचदा असंवेदनशीलतेला जोपासत केलेली धडक विधानं काहिशी बोचतात , आश्चर्यात टाकतात हे नक्की .

विचार येतच होते… माझ्याकडच्या सगळ्या मेड्सबाबत . इथे मेड बदलण्याचे कारण म्हणजे बरेचदा आपण तरी सुट्टीवर जाणे किंवा त्यांनीतरी मायदेशी परतणे असे काहीसे जास्त असते. मात्र ज्या ज्या मेड आल्या किंवा आले ते घरचे एक होऊन गेले कायम हे नक्की !! भारतातच ठेवलेल्या लहान मुलीची आठवण येते सांगणारी हैद्राबादची ’रत्ना’ किंवा मुंबईतल्या दोन मराठी बहिणींची जोडी, बांग्लादेशची ’शेलिना’ , रशिदा…. गुढीपाडव्याला आंब्याचे, कडूलिंबाचे पानं आणून देण्यापासून ते दिवाळीतल्या साफसफाईपर्यंत सगळ्यात लूडबूड करणारे हनाभाई ….. सगळे सगळे आठवत गेले एकामागोमाग एक. बांग्लादेशातलं माश्यांच स्वतंत्र तळं, भाताची घेतलेली शेतं, भावाचं शिक्षण वगैरे गोष्टी हनाभाई सतत सांगत.

या सगळ्या आठवणींमधे मला ’शेलिना’ आठ्वली आणि जाणवलं त्या सेटिंग शब्दाची बोच नेमकी कुठे उमटतेय. शेलिना ….. याआधिच्या माझ्या दोन पोस्ट्समधे ’मावशी ते मेड’  आणि ’कोष ’ हजेरी लावून गेलेली शेलिना .  ’मुलूक ’ला जायचं म्हणून प्रचंड खटपट करणारी अशिक्षीत शेलिना . मुलूकमधल्या भावाबहिणींसाठी उमेदीची, तरूणाईची वर्ष आखातात कामाच्या रगाड्यात घालवणारी शेलिना . घरी जाण्याची अनावर आस असणारी शेलिना. “मॅडम मै तो ना आजकल उपरसे कोई प्लेन जाता है तो सोचती हूँ कब जाऊँगी मै इसमे बैठकर :)  ” … असे निरागसपणे हसत सांगणारी शेलिना.

माझ्या ’कोष’ पोस्टमधे म्हटलेली आणि मी पर्समधे राखलेली सगळी रक्कम बाकि रकमेसह मी शेलिनाच्या हातात दिली होती. माझा हसत हसत आणि रडत रडत निरोप घेऊन ’शेलिना’ मुलूकला गेलीही होती. आता कामाला बाई नसणार या दु:खापेक्षा शेलिनाला घरी जायला मिळालं याचाच आनंद झाला होता मला. काही दिवसात तिची मैत्रीण ’रशिदा’ यायला लागली कामाला, मात्र शेलिनाचा विषय कायम यायचा आमच्या बोलण्यात. एक दिवस रशिदाने सांगितले , “मॅडम शेलिनाका शादी हो गया !! ” …. विलक्षण आनंद झाला मला… वाटलं आता तिच्या सगळ्या ओढाताणीचा शेवट गोड होइल. ती तिच्या संसारात रमेल. रशिदाला मात्र अनेकवेळा शेलिनाचा फोन नंबर मागूनही ती देइना .

मला मात्र शेलिनाबद्दलचा आनंद तिच्याशी प्रत्यक्ष बोलूनच साजरा करायचा होता. शेवटी ’बांग्लादेशी’ हनाभाईंना गाठलं, म्हटलं बाबारे तिचा फोन नंबर असेल तर दे ना मला, तिचे अभिनंदन करायचे आहे !! …. हनाभाईने माझ्याकडे बघितले , हसला आणि म्हणाला ,” दिदी उसका शादी नही हुआ है….. कभी नही होगा ….. कोइ शादी नही करता इधरसे जाने के बाद ईन लोगोंसे …. मै तो कभी नही करूंगा  …. ” :( :(

हनाभाई निघून गेला आणि मला विचारात टाकून गेला होता. एक धक्का जो मला एकटीने पचवायचा होता. माझ्या कुटूंबात, आयू्ष्यात शेलिना एक कामवाली होती . जिला जाताना मी मदत केली त्यामूळे मी तिच्या ’देण्यातून’ मुक्त होते. पण कामवालीशी माझं नातं नकळत आपूलकीचं, माणुसकीचं होतं…. स्त्रीत्त्वाने जोडल्या गेलो होतो आम्ही दोघी. त्या नात्याची वीण घट्ट होती ही मला कल्पना होती पण माझ्या डोळ्यात येऊ पहाणाऱ्या अश्रॄंना माझ्या रोजच्या आयूष्यात फारशी जागा नव्हती. हे असं दुखणं काढणं हे ’व्याह्याची घोडी ’, ’लष्कराच्या भाकऱ्या ’, ’विश्वाची चिंता ’ वगैरे सदरात मोडत होतं.

रोजच्या रामरगाड्यात शेलिना मागे पडली, तिच्यामाझ्यात दोन तीन देशांच्या हद्दी आल्या तरी ती मनातून कधीच गेली नव्हती हे पुन्हा नव्याने जाणवलं मला त्या ’सेटिंग’ शब्दाने. सेटिंग …. दोन वेगवेगळ्या लोकात होणारं सेटिंग हा माझ्या मैत्रीणीचा अर्थ होता, त्यातला एक मला ठणकावून सांगून गेला होता की अश्या बायकांशी मी लग्न करणार नाही, आणि स्वत: मात्र आखातातून आलेला श्रीमंत ’वर’ म्हणून मिरवणार होता. आजवर अगदी’चांगल्या ’ हनाभाईचं वेगळं आणि प्रातिनिधीक रूप अचानक समोरं आलं माझ्या !!

या सगळ्या सेटिंगमधे दोष कोणाचा हे मला नेमके उमगत नव्हते :(

अज्ञानात सुख असतं ….. फारसे फंदात नाही पडले की त्रास कमी होतो. पण आपल्या मनाचे ’सेटिंग’ तसे नसते !! शेलिना मला कधीच सापडणार नाहीये… गुगलबाहेरचे जग आहे तिचे, तिचा शोध कसा घेणार ….

आज हा सेटिंग शब्द दिवसभर बोचत रहाणार होता…. पुढचे काही दिवस जाणवणार आणि मग हलकेच मनाच्या कोपऱ्यात दडणार होता…. :(

खिडकी उघडली आणि बाहेर पहात उभे राहिले….. पांढूरकी घरं, बिल्डिंग्स ,वाळू दिसते माझ्या खिडकीतून, फार नाही पण हे वाळवंट आहे ही जाणिव करून देणारी वाळू ….. ’वाळवंट ’ – एक आत असतं आणि एक बाहेर !! आणि मग अश्या कित्येक शेलिनांचे अश्रॄ , त्याग , कष्ट या वाळवंटाच्या आर्द्रतेत विरघळलेले असतात…. अश्या विचाराने, जाणीवेने माझा ’मोकळा श्वास’ क्षणभर घुसमटला ….. !!

अर्थात  ’वाळवंट ’ मग ते वाळूचं असो किंवा भावनांचं तिथे पाझर विरळाच…..

वाळवंटात एक म्हण आहे ’ रेताड वाळवंटात फिरताना तुमच्या नजरेला जर मृगजळ दिसत नसेल तर तुमची तहान खरी नसावी ’ . आज खिडकीबाहेर पहाताना सतत असेच काहीसे वाटतेय , कुठेतरी मृगजळ असावे …. या शेलिनांच्या अश्रॄंना , अस्तित्त्वाला काहितरी मोल असावे…. कुठेतरी कोणालातरी या सगळ्याची माझ्यापेक्षाही जास्त ’बोच’ वाटावी त्याने हे ’सेटिंग’ बदलावे…..

जिप्सींचे गाव….

” What do you want ? ” …. मेडीकलमधली मुलगी विचारत होती.

“अं …. ” …

गोंधळल्यासारखे झाले क्षणभर मला. नासिकच्या पुर्णत: मराठमोळ्या भागातला तो इंग्लिश प्रश्न अगदी अनपेक्षित होता माझ्यासाठी.

माझ्या आईच्या घराजवळचे मेडीकल…. तसे माझ्या फारसे ओळखीचे नसले तरी , ज्या भागात ते मेडीकल किंवा त्या आजूबाजूचा आत्ताचा बदललेला परिसर आहे त्या बदलाआधिपासून तिथे रहात असल्यामूळे तो भाग माझ्या ओळखीचा. लग्नानंतर माझं गाव सुटलं आणि पुर्वी जिथे हिरवीगार सुरेख शेतं होती त्या भागात अनेक इमारती , दुकानं नव्याने उभी राहिली. अर्थात हे बदल असेच सगळीकडेच झपाट्याने झाले आहेत इतपत साक्ष द्यायला मी ही भारतात होते…. भारतातच अनेक गावं बदलत असले तरी निदान देशात होते !! गेल्या सहा सात वर्षात मुळात वर्षातून एक महिना काय ते भारतात रहाणं होऊ लागलं आणि मग हे झालेले ’बदल’ प्रकर्षाने जाणवू लागले.

या मुलीच्या प्रश्नाने मात्र  गंमत केली त्यादिवशी ….  पुर्वी आमच्या भागाला एकच मेडीकल होते, एकच किराणाचे दुकान …..मेडीकलमधे कधी गेलं की तिथले काका काकू आवर्जून विचारायचे , कोणाला बरं नाहीये गं ?… औषधं देताना ,डॉक्टर काय म्हणालेत? वगैरे विचारपुस सहज व्हायची. किराणा दुकानात माझ्या मुलाचे ’नातू’ म्हणून लाड करणारे काका होते. कदाचित या अश्या सगळ्या लोकांमूळेच हा भाग माझ्या अगदी ’ओळखीचा’ आहे असे मला वाटत होते. ह्या ओळखीत माझा भाग कमी आणि आई-बाबांचा जास्त ही जाणिव कुठेतरी असली तरी बोचली वगैरे कधी नव्हती.  यावेळेस मात्र इंग्लिशमधून तटस्थ विचारपुस करणाऱ्या या मुलीने एक परकेपणाची, आमच्या भागात वेगाने होणाऱ्या बदलांची जाणिव करून दिली मला.

अर्थात एक अनामिक ’उपरेपणा’ माझ्या हक्काच्या माहेरी अधेमधे जाणवतो आजकाल. तो जितका नजर अडवणाऱ्या नवनव्या बिल्डिंग्सच्या उपस्थितीने वाटतो तितकाच अनेक अनोळखी चेहेऱ्यांमूळेही आहे असे वाटते. अनेक अनेक आणि अटळ बदल. बिग बजारने शेजारी येणे, मग एरवी फ्रॉकमधे पाहिलेल्या , आता कॉलेजात गेलेल्या सगळ्या चिमुरड्या एकजात स्लिम फिट नावाच्या जिन्समधे दिसणे…. एक न अनेक लहानमोठे बदल !!

माझ्या जून्या गावात गेले की मी जुन्याच ओळखीच्या खुणा शोधू लागते. त्या सापडायला लागल्या की गाव ओळखीचं वाटू लागतं. झालेले बदल जितके मला जाणवतात , कधी खटकतात तितके ते तिथे कायम रहाणाऱ्यांना नवेही वाटत नाहीत. ते बदलांसहित त्या भागात, गावात रूळलेले असतात. मला मात्र काही कारणाने अशी ’रूळण्याची’ , ’रुजण्याची’ चैन साधत नाही . मग असे कधीमधी बाहेरून येणाऱ्या माझ्यासारख्याला या बदलांमूळे परकेपण येतं. आणि तरीही एका गावात मात्र फार काळ मन रमत नाही. सतत नाविन्याची हौस म्हणावं की व्यक्तिमत्त्वातला दोष कळत नाही . बरं ज्या नव्या गावी जावं ते नवं गावही मग हलकेच आपलं होऊ लागतं.

पुन्हा एक नवा प्रश्न पडतो मग की प्रत्येकच नवं गाव ’माझं’ कसं होतं ?

दरवेळेस एक अनोळखी गाव…. तिथे रहायला लागल्यानंतर ’ऒळखीची’ माणसं भेटतात. म्हणजे जी भेटल्यानंतर ’ओळख’ वाटावी अशी माणसं भेटू लागतात. त्या गावात नेहेमी एक मुख्य बाजारपेठ असते. तिथे गेल्यावर , त्या गल्लीबोळांमधे पाउलखूणा उमटवताना कुठेतरी मला आमचं ’मेनरोड’ गवसतं . काय कुठे मिळतं वगैरे चौकश्या करत हक्काचा, प्रेमाचा शेजारपाजार मिळतो.हळूहळू गावातल्या भागांची कोणी नावं घेतली की मला ’उपऱ्यासारखं’ वाटतं नाही. मी ही पत्ता सांगताना, अमक्या गल्लीतून तमकी लेन वगैरे ठामपणे सांगायला लागते. किराणा कुठे चांगला, कुठे जेवण चांगलं, दुधवाला, भाजीवाली वगैरे नित्याचे व्हायला लागतात. त्या गावातल्या देवळांमधल्या मुर्तीपुढे आता श्रद्धेने हात जोडले जाऊ लागतात.  अनोळखी गाव ’ओळखीचं’ होतं… आणि हीच ती वेळ हाच तो क्षण येतो आणि आमचा त्या गावातला मुक्काम आटोपता घेण्याची वेळ येते.

पुन्हा एक नवं गावं, आणि जूनीच असलेली शोधमोहिम सुरू होते. मग वाटतं मी ’माझं गाव’ शोधते दरवेळेस. म्हणजे हे गाव माझ्या मनात पक्कं असतं दरवेळेस …. माझ्या ’मनातलं गावं’ !! मनातली माणसं , ओळखीची लोकं म्हणजे माझे विचार मांडणारी तरी. दरवेळेस नव्या गावात मी जुनं गाव शोधते, ते तसं मला सापडतही .

मात्र या जुन्या गावांमधे परतल्यानंतर ही गावं मला ’परकी’ का वाटू लागतात. अचानक एक अनोळखीपणा दाटायला लागतो. जर हे गाव माझ्या मनातलं गावं होतं तर या परकेपणाचं, अनोळखीपणाचं, उपरेपणाचं कारण काय हा प्रश्न अस्वस्थ करतो अश्या वेळी !!

का होतं हे असं ???

गावात झालेले बदल याला कारण असतात की बदलांना आपण ’साक्ष’ नसल्याने परकेपणा येतो हा प्रश्नच आहे एक. आणि विचार करता हे कारण तसं वरवरचं वाटतं . काहितरी अंतर्गत बदललेलं असल्याशिवाय ,ज्या रस्त्यांवर मी सहज फिरत असते , आजही ज्या गल्लीबोळाने माझ्या मनात अचानक विनाकारण कुठल्यातरी संदर्भात जाणिवपुर्वक वा अजाणता हजेरी लावलेली असते तिथे प्रत्यक्ष गेल्यावर का चाचपडायला होतं?? काहितरी चुकल्यासारखं का वाटतं ?

फार छळवादी वाटायचा मला हा प्रश्न . जरा अजून विचार केल्यावर जाणवलं ,प्रत्येक गावाची वेस ओलांडून जाताना माझ्यातच काही बदल झालेले असतात.  दर गावात भेटतात काहितरी वेगळं मांडू पहाणारी लोकं. आणि मग हा वेगळा विचार कधी कधी असा काही पटतो की तो अगदी नकळत अंगवळणी पडतो. साध्या भाजीच्या फोडणीच्या पद्धतीपासून ते आयूष्याच्या मोठमोठ्या निर्णयांकडे पहाण्याची नवी नजर असणारे लोक. मलाही मग नवं काही सापडतं आणि जून काही गळून पडतं…. म्हणजे माझ्यात बदल होताना त्या बदलांची मीच साक्ष असल्याने मला ते जाणवतं नाहीत इतकचं . हलके हलकेच मनातलं गावही बदललेलं असतं …. आणि मग जुन्या गावात माझं गाव शोधताना मला त्या गावातल्या स्थापत्य बदलाचा तितका त्रास होत नाही जितका माझ्या मनातल्या बदलांची जाणिव नसल्याचा होतो.

सगळं तसं सरळ असतं … आपण फारसा विचार करत नसतो इतकेच. आणि आधिच गुंतागूंतीच्या आयूष्यात , एकाच ठिकाणी राहून स्थैर्य मिळवण्याची मनोप्रवृत्ती नसते, माझी तरी निश्चित नाही . सतत आपलं ’भटक्यांसारखं’ पाठीवर बिऱ्हाड बाळगण्याची तयारी असते. वाटेत जिथे थांबावे वाटेल तिथे पाल टाकायचे आणि मग तंबू उचलून पुढच्या गावी निघायचे.

काहितरी अनामिक ओढ सतत असते… काहितरी अज्ञात शोध पाठपुरावा करतो…. घरीदारी सगळे ओरडले की ’पुरे आता ही फिरफिर, परत या आता कायमचे ” , तरी ’कायमचे’ कुठेच टिकायला होत नाही. एक डाव मांडायचा, आणि भातूकलीसारखा तो मोडत पुन्हा पुढे निघायचं. एक स्वभावच असावा हा … भटकेपणाची आंतरिक वृत्ती . आपण कुठलेच नाही ही जाणिव, बोच मनाला लागली तरी पुढे नेणारी वृत्ती.

या भटक्या वृत्तीबद्दल विचार करता शेवटी एकच जाणवतं , थोड्याअधिक फरकाने वरकरणी स्थैर्याला महत्त्व दिले तरी मन असते जिप्सींसारखे. आयूष्याच्या प्रवासात जिथे जिथे काही विलक्षण अनूभव हाती लागतील तिथे थबकणारे. त्या अनूभवांची अनूभुती स्वत:त झिरपत ठेवत पुढला मार्ग चालणारे. कालचे आपण आणि आजचे आपण यात काहितरी बदल असणारे….. या ’जिप्सींना’ गाव नसते …. गावातही ते वेशीवर कुठेतरी विसावतात. ते गावाचे असतातही आणि नसतातही…. गावही मग त्यांचे असतेही आणि नसतेही  . इंग्लिशमधे त्यांना प्रश्न विचारणारी मुलगी क्षणिक विचारात टाकेलही एकवेळ पण पाळंमूळं रुजण्याची जिप्सींना मुभा नसतेच  !! :)

मन एके मन….

मन नं बेटं हाफमॅड असतं बरं….

दारूबिरू माझ्यासाठी नाय, वाईनबिइनही जमली नाय ब्वॉ…

भविष्यात कधी जमायचं नाही …

हे बेटं झिंगतं कसं राम जाणे पण ??

काय तर म्हणे ’आठवणींचीही’ नशा असते ….

कायपण !!

कधी इथे कधी तिथे… याच्या पायालाच भिंगरी ….

धरू गेलं नं आपण , बरं का … बेशिस्तासारखं डोलतं ते !!

बरं आता आठवणी चांगल्या निवडाव्या किनई….

याचं मेलं सिलेक्शनच बकवास …. समदी हाणामारी च्यामारी!!

जुगारबिगार आपलं काम नाय ब्वॉ….

भविष्यात कधी ….. नाय ना राव!!

हे मन आहे नं मन….

ह्याला गॅंबलिंगचा नाद ना पण …. नवनव्या मैत्रीची रिस्क आणि नव्या माणसांचा जूगार…..

इथे फसतं , तिथे हरतं …. पुन्हा पुन्हा सगळं पणाला लावतचं ना पण ..

बिनडोक लेकाचं … जग चांगलं असतय म्हणे ..

येडचे !!

माझ्याच्याने नं दगदग होत नाही बरं का ….

भविष्यात करायची इच्छाही नाही…..

हे मन आहे नं मन ….

याचा मेला स्टॅमिनाच जबरीये पण ….

बेणं इथे आपटतं तिथे धडकतं… सोडत नाय पण कुठलीच गल्ली बोळ ….

याचा एरिया कव्हरेज पहाल नं …. सॉलिड एकदम…

सगळा घोळे घोळ  !!

फसवणूकीचा धंदा आपलं काम नाय ब्वॉ …

भविष्यात कधी जमायचं नाय ….

हे मन आहे नं मन ….

येडचॅपच आहे बरं का … जगाला सोडतं आणि स्वत:लाच फसवतं नं  ….

घरघालू उद्योग बिनबूडाचे नं काय …

आहे बेअक्कलच ये !!

काल नं गाठलचं या मनाला ….

म्हटलं बाबारे तुझा होतो खेळ आणि मला का वैताग …. तुझा मॅडनेस तुझाच प्रॉब्लेम इथून पुढे …

माझ्यापर्यंत मॅटर आणायचं नाय ….आठवणींचं व्यसनं नाय की मैत्रीचा जुगार नाय ….

कुठलीही ’मन’ मानी खपणार नाय !!

बांधलं त्याला पक्कं … वाटलं वैतागेल चिडेल बेणं …..

कसचं काय नं कसचं काय.. मुकाट नं ते.. त्रागाबिगा काय नाय…

ते बेटं हसतं होतं ….

नीट पाहिलं आणि समजलं नं … एकदम रिअलायजेशन….

सगळी व्यसनं परवडली ,अगदी सगळीच….

ह्या खोट्या हसण्याच्या जहराला उतारा नाय ….

बिघडलंय हो मन…. हातातून गेलयं पार ….

खोट्या हसण्याच्या नादात ’ खरं ’ रडायलाही विसरलं हाय !!!

सवय…

पहिल्यांदा MRI करायला गेले तेव्हा मुळातच सगळ्या प्रकाराची प्रचंड भिती वाटत होती. ते मशीन, ऑपरेटरची तटस्थ हालचाल,  MRI रूमबाहेर उभे असलेले नजरेआड झालेले नवरा आणि बाबा , आणि ते दिसेनासे झाल्यामूळे अचानक दाटलेला प्रचंड एकटेपणा , सगळ्याचा ताण वाटत होता आणि तो ताण क्षणोक्षणी वाढतही होता.

त्या ऑपरेटरने तितक्यात कापसाचे दोन बोळे हातात कोंबले आणि ते कानात कोंबा अशी सुचना केली. माणूस घाबरलेला, भेदरलेला वगैरे असला की कॉमन सेन्स जागृत होत असावा कारण एरवी माझं एकूण वागणं म्हणजे, वय आणि शिक्षण या गोष्टींचा कॉमन सेन्सशी कसा काडीचाही संबंध नसतो हे पटवण्यासाठी देवाने जन्माला घातलेलं मी हेच आदर्श उदाहरण असं असतं. मात्र हातातल्या त्या बोळ्यांनी म्हणा किंवा वाटलेल्या भितीने म्हणा त्या ऑपरेटरला मी विचारलं, “फार आवाज येतो का रे दादा ? आणि वेळ किती लागेल रे? ” ….. एरवी असं चौकसं वगैरे वागणं माझ्या स्वभावात नसलं तरी त्याला या प्रश्नांची , भितीची वगैरे व्यवस्थित सवय असणारच , त्याने शक्य तितक्या निवांत आवाजात सांगितले, “आवाज नं , येतो बऱ्यापैकी …. लागतील पंचवीस एक मिनीटं !!” …. ’ तुम्ही हालचाल केली तर वेळ वाढेल” अशी धमकीवजा सुचनाही त्याने तितक्याच सहज आवाजात ऐकवली आणि मला मशिनमधे पोहोचता करून तो गायब झाला. अर्थात गायब झाला की नाही हा माझा तेव्हा अंदाजच होता कारण मी ज्या बोगद्यात होते तिथून काहिही दिसणं शक्यच नव्हतं.

mri-scanner

(फोटो सौजन्य : नेट )

सभोवार धप्प पांढरा सभोवताल आणि त्या बोगद्यात मै और मेरी तनहाई …. तनहाईशी मी बातेंबितें करू इतक्यात कुठेतरी ठक ठक असा आवाज आला. ’आवाज आला’ म्हणजे कानावरच्या कापसाचे बोळे, त्यावर लावलेले जाडजूड ईयरपॅडस, त्याभोवती मी हलू नये म्हणून केलेली तटबंदी या सगळ्याला भेदून आलेला आवाज. त्या ठक ठक च्या मागे माझ्यावर काय आवाजाचं संकट येणार आहे यापासून पुर्णत: नाही तरी अंशत: अनभिज्ञ मी , नाईलाज असला की कितपत उत्सूक असू शकतं माणूस तितक्या उत्सूकतेने तिथे पडले होते. आणि काय एक एक आवाज यायला लागले म्हणून सांगू …. भयानक !!

’हिच्या माहेरी ज्या आवाजात बोलतात किंवा टिव्ही पहातात, त्यात ऐकायचं ठरवलं तर कानात amplifier बसवायला हवा आपल्या’ असं माझा नवरा नेहेमी म्हणत असतो. थोडक्यात आमच्याकडे कोणालाच जोरात बोलणे, मोठ्याने टिव्ही लावणे वगैरे न आवडणाऱ्या गटाचे सदस्य रहातात. आज मात्र माझ्या आजवरच्या आयूष्यात मी ऐकायचे बाकि असलेले सगळे ’मेगाहर्टीय आवाज’ एकत्र माझ्या कानात कोंबायचा निर्णय देवाने घेतल्यासारखा प्रकार सुरू होता. दर ’ठक ठक’ मागे आवाजाची तऱ्हा आणि प्रकार बदलली तरी तीव्रता मात्र तीच, तितकीच किंबहूना वाढती.

आधि दाटलेला एकटेपणा मला अजून अजून वाटायला लागला. ’नको… पुरे… थांबवा हे सगळं’ करून ओरडावं वाटायला लागलं. पु्नश्च म्हणून मी जन्मात या फंदात पडणार नाही असा एक निर्णय घेतल्यानंतर मला वाटतं माझी निर्णयाचीच काय पण विचाराचीही क्षमता मंदावत गेली. थंड एकटेपणा….आणि पांढरी चादर यात फक्त आतली व्यक्ती जिवंत हाच काय तो फरक असंही वाटून गेलं एकदा!! :(   हळूहळू आई-बाबा, नवरा आणि मुलं एकामागे एक मिटलेल्या नजरेसमोर येऊ लागली. आवाजाच्या वैतागापलीकडे, स्वत:च्याच विचारांच्या चक्राला भेदून येणारी ही आठवण दिलासा देणारी वाटत होती. मुलांना आता यापुढे ’किती आवाज करता रे ’ असं म्हणता येइल का असाही विचार आला…… ऑपरेटरने सांगितलेली पंचवीस मिनीटं संपायला अजून किती अवकाश असेल असा ताळेबंद मनातच मांडला गेला. स्वत:बद्द्ल फाजील सहानूभुती वगैरे वाटत नसली तरी प्राप्त परिस्थिती फारशी आवडण्याजोगीही नव्हती. एकदाचा तो गेलेला ऑपरेटर आला आणि माझी सुटका झाली. एक अगदीच न आवडलेला अनूभव अशी त्या दिवसाची नोंद झाली.

……………………

’Let’s do the MRI again and see what are the changes ‘ हे डॉक्टरांचं वाक्य आघातासारखं पुन्हा एकवार माझ्यावर कोसळलं, आणि पुन्हा एकदा मी त्या MRI रुमकडे पाठवले गेले. गेल्या वेळचा अनूभव होताच आठवणीत. तेच बोळे, तोच पांढरा रंग, तेच आवाज , तीच मी मशीनमधे सरकवली गेलेली पण मनात वेगळे विचार…. चक्क …. चक्क म्हणजे चक्क…… ’धाड धाड.. थाड थाड’ वगैरे काहितरी आवाज कानात आल्यावर चक्क युद्धभुमीवर मशिनगन्स चालल्या आहेत असा खेळ लहान मुलं खेळताहेत वगैरे विचार मनात आला. त्रयस्थ की चक्क मी , गोळ्यांच्या आवाजाला मीच ’गोळी’ घातल्यासारखी जराशी निवांत !! आता हा आवाज येइल, मग तो, वगैरे विचार, ’ठक ठक’ चा तो चितपरिचित आवाज या सगळ्या चक्रात ऑपरेटर आलाही परत. वेळ तर तितकाच लागला होता , त्या पांढऱ्या बोगद्याच्या बाहेर आले मी . त्याने विचारले, ’ठीक आहात ना, काही त्रास तर नाही नं होत ? ’ ….. तेव्हा त्याला दिले गेलेले उत्तर मात्र विचारात टाकून गेले, चक्क हसले त्या ऑपरेटरकडे पाहून मी आणि त्याला म्हटले, ” अरे बरीये मी अगदी, Don’t worry…. ’सवय’ झालीये रे आता !!  तू तेव्हढा रिपोर्ट चांगला दे हं !! “

त्या पठ्ठ्याने काही माझी लहानशी मागणी ऐकली नाही आणि आधिपेक्षा बिघडलेल्या डिस्कचा MRI दिला हा मुद्दा वेगळा पण मला ’सवय’ झाली…. कसली ’सवय’ … MRI ची सवय ????? नव्हता नं आवडला मला तो अनूभव, तरी सवय होते ????

’सवय’ …… सवयीनेच अगदी सहज वापरला जाणारा शब्द!! सगळा ’सवयीचा मामला’ असतो. आपण अगदी ’आदत से मजबूर बिजबूर’ असतो !!

मागे एकदा सात-आठ महिन्यांनी माहेरी गेले. अंगणात नव्या फरश्या बसवलेल्या दिसल्या. जूनं सवयीचं अंगण आठवत आठवत पायरीकडे गेले, पायरीवर पाय टाकताना ती पायरी फार लवकर पायाला लागल्याचे जाणवले. लक्षात आले की या फरशी प्रकरणामूळे मुळ अंगणाची उंची वाढलेली असली तरी माझे पाय मात्र जुन्या ’सवयीच्या’ उंचीवरून अगदी सहज नकळत लँड होऊ पहात होते !! :)

सवय असते नाही आपल्याला ’सवय’ असण्याची. म्हणजे सवय बदलता येते एकवेळ पण नव्या बदलाचीही ’सवय’ लागतेच :)

सकाळी उठल्यापासून रात्रीच्या ’सवयीच्या’ गादीवर पाठ टेकून , सवयीचं पांघरूण पांघरलं की दिवस सार्थकी लागतो. एरवी change is inevitable म्हणणारे आपण सवयीच्या यादीतली एकही बाब बदलली की कसे अस्वस्थ होतो. ’सवयीचे गुलाम’ हा शब्द शब्दश: पटतो.

२०१२ तसे वेदनेचे गेले माझे. संपुर्ण आयूष्याच्या कॅलेंडरमधल्या जरा ’गडद’ नावडत्या रंगासारखे. आताशा वेदनाही ’सवयीची’ झाल्यामूळे ओळखीची वाटते. आणि संकटांवर मात करायची जुनी ’सवय’ असल्यामूळे फारशी तगमग होत नाही हल्ली .

तसे काय आहे अर्थात की एकामागे एक साखळीने येण्याची श्वासांना एक ’सवय’ असतेच , वेदना आली की येताना ती एक ’भान’ घेऊन येते सोबत याचे. त्यातून सावरताना, त्यावर मात करताना एक उल्हास दाटतो. आपण पळपुटेपणा केलेला नसला की बरं वाटतं !! ’जगण्याची मग काही और मजा येते’ आणि ’नाही मी कोणाचा आहे तुझा’ असं आपण आयुष्याच्या नजरेला नजर देऊन जोमात म्हणू शकतो :)

जुने वर्ष सरणार नवे येणार याचीही आताशा सवय झालीये. २१ डिसेंबरची जगबूडी काही आली नाही , हे ही नित्याचेच. आपण तयारीत असताना आले तर त्याला ’संकट’ म्हणता येत नाही त्यामूळे आपल्याला सरप्राईज देउन कोपऱ्यात गाठायची संकटाचीही आपली एक ’सवयच’ :) .

२०१३ चे कॅलेंडर आता कोरे आहे…. यातल्या दिवसांची नवी डायरी लिहायची आहे. पहिला महिना ओलांडताना हे वर्षही ’सवयीचे’ होऊन जाईल. सवयीने नवे संकल्प केले जातील , सवयीने मोडलेही जातील. गुन्हे होणार, चो्ऱ्यामाऱ्या, अपघात बिपघात, बलात्कार वगैरे, कधी एकट्याने कधी सामूहिक, घोटाळे होणार, झाकले, लपवले , जनतेला फसवले जाणार, मेणबत्त्यांचे मोर्चेबिर्चे सगळे सगळे आता सवयीचे….. :( … मागल्या पानावरून पुढे!!

माझी एक मैत्रीण म्हणायची गैरसोय सवयीची झाली की तीचा त्रास होत नाही…. पण गैरसोय सवयीची होतेच कशी ??? तिला प्रतिकार न करता उलट तिची ’सवय’ करून घेतो माणूस !!

इतक्या सगळ्या वाईटात कुठेतरी एखादी कळी मोकळा श्वास घेणार, एखादी पिसांची म्हातारी अलगद वाऱ्यावर डोलणार, कोणितरी कोणाच्या प्रेमात पडणार आणि निखळ निर्व्याज प्रेमही करणार, मुलं खेळ्णार बागडणार, कोणितरी जुन्या वाईट सवयी मोडणार आणि नव्या छान सवयी  लावूनही घेणार ….. वाईट आणि चांगलं हातात हात ’सवयीनेच’ गुंफणार!!

’सवय’ एके सवय आणि सवय दुणे सवय करताना एकच जाणवलं , आपल्याला नं खरं तर ’जगण्याची’ सवय असते. प्रत्येकाला अगदी अगदी प्रत्येकाला. ती सवयच सारं बळ देते आणि. फार सुरेख सवय आहे ही. या सवयीच्या गुलामांना आयूष्य जगता येतं. काहितरी ’हसरं’ सापडतच त्यांना, नव्हे ते शोधतातच…

तशी मोठमोठ्या पोस्टांची लामण लावायची मलाही अलिकडे ’सवय’ लागल्याचं जाणवतय मला :) . नकोच ते … थांबते इथे… नाही म्हणजे MRI कितीही सवयीचा असला तरी असली संगत आम्हा ’कुलकर्ण्यांनाही’ नको रे बाप्पा :) (बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा :) ) .

तेव्हा पाल्हाळ आटोपताना इतकंच की हे नवं वर्ष ब्लॉगच्या सगळ्या वाचकांना (पुन्हा स्पष्ट करावे लागेल- कमेंटणारे आणि न कमेंटणारेही ), त्यांच्या कुटूंबियांना , मित्रमंडळाला सुखाचे-समाधानाचे-आरोग्याचे जावो ही सदिच्छा !!

आयूष्य भरभरून जगण्याची सवय असेलच तुम्हाला , नसेल तर सल्ला ऐका लावून घ्या ही सवय ….. व्यसनं का म्हणेना, बरं आहे :) …..मज्जानू जिंदगी!!!